वटपौर्णिमा

अशीच एक वट पौर्णिमा

आज वटपौर्णिमा सकाळी लवकर देवपूजा झाली आणि सुलभा आणि मी बाजारामध्ये गेलो बाजारामध्ये वटपौर्णिमेच्या साहित्याचा दुकानात गेलो त्या ठिकाणी एक वाटा 50 रुपये असा होता मग सुलभा आणि पूजा दोघींना जायचं असल्यामुळे दोन वाटे घ्यायचे होते परंतु त्यामध्ये अंबा मात्र खराब झालेला होता आता हे पाहिल्यावर सुलभाने लगेच हुज्जत घालायला सुरुवात केली मला मात्र कंटाळा आला होता ऊन वाढत होते मी म्हटलं चला घ्या मिळल तो आंबा परंतु ते म्हटले पूजेसाठी खराब आंबा कशाला घ्यायचा शक्यतो देवाला चांगलंच फळ दिले पाहिजे, हा विचार तिच्या मनात आला आणि मग दुसऱ्या दुकानातून आंबे खरेदी केले ते जरा महाग पडले पण तरीसुद्धा दुसरे आंबेच घेतले म्हणजे देवपूजा करताना मनामध्ये असं की नको असतो की देवाला आपण चांगल्या वस्तू दिल्या नाही. त्यामुळे देव नाराज होईल देवाचा कोप होईल आपली पूजा व्यर्थ जाईल या भावनेतून असं घडत असतं पण खरे तर तसं पाहिलं तर त्या वडाच्या खाली असलेला तो आंबा कोण खातो का ?ते सगळे निर्माल्य होत असतं ,परंतु जो पूजा करतो त्याची भावना फार महत्त्वाची हे यातून मला समजलं मी जरी रागावलेला असलो तरीसुद्धा सुलभाच्या त्या वागण्यातून सत्यता मला दिसलीं . आणि ही सत्यता फार महत्त्वाची आहे ही धार्मिकता महत्त्वाची आहे आणि हीच खरी पूजा असते समजा आपण खराब फळ घेतल असतं तर मनात कुठेतरी राहिलं असतं की आपली पूजा व्यर्थ गेली ,आणि देवाला काय वाटलं असतं यांनी चांगलं फळ दिले नाही शेवटी आत्मा व परमात्मा याचं एकत्र व्हायचं असतं हे यातून आपल्याला दिसतं आणि हे आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे तरच माणसाचं जीवन हे सार्थकी लागतं मग करायचे म्हणून पूजा केली करायचा खर्च म्हणून केला परंतु हा खर्च व्यर्थ जात नाही ना याचा शांतपणे विचार करायला हवा रागावल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टीचा भान राहत नाही परंतु मन शांत असेल तर यातून योग्य तेच घडत असतं म्हणून मन शांत हवे व्यवहारात कुठेतरी गेलो तरी मन शांत पाहिजे चित्त शांत पाहिजे चित्त ईश्वर नष्ट पाहिजे म्हणून देवाला सद्भावनेची फुल वाहन गरजेच आहे आणि ते फुल स्वच्छ असावं मनासारख असाव ते फुल जस आहे तसंच आपलं मन आहे असं ईश्वर मानत असतो अशी भावना असते म्हणून दुकानदाराने सुद्धा विकायचं म्हणून काहीही विकायचं हे बरोबर नाही केवळ स्वतःचा नफा पाहायचा परंतु गिऱ्हाईकाचा भक्त भाव सुद्धा पाहणं गरजेचं आहे यातूनच मला हे सांगायचं की भावना कशी असावी सदभावना कशी असावी प्रत्येकाने ओळखणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ती खरी पूजा घडत असते. मंदिराभोवती खूपच गर्दी होती बऱ्याच महिला नटून सजून वडाला दोरा गुंडाळण्यासाठी आल्या होत्या अंगावर लाखो रुपयांचे दागिने बरोबर आपल्या पतीला घेऊन आले होते .त्या वडाच्या साक्षीने सेल्फी काढण्याचा प्रोग्राम चालू होता या भक्तीमध्ये कुठेतरी फेसबुकला व्हाट्सअप ला आपला फोटो गेला पाहिजे आणि मी किती छान वटपोर्णिमा साजरी केली याचं सुंदर प्रदर्शन त्या करत होत्या आमचा नातू साई तर मंदिरामध्ये इकडं तिकडं धावत होता आणि प्रत्येकाकडं कुतूहलाने पाहत होता बऱ्याचशा बाया बापड्या आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना समोर घेऊन फोटो काढत होत्या आणि हे शांतपणे तो वड पहात होता प्रत्येक जण स्वतः अतिशय सुंदर दिसण्याचे प्रयत्न करत होत्या यामधील आदर कुठे दिसत नव्हता भक्ती भाव कुठे दिसत नव्हता समोर वडाला मात्र करकचून दोरा गुंडाळलेला होता आणि त्याच्या पायाशी आंबा फुलं आणि ओटीचे सामान ठेवलेलं होतं आणि अशा रीतीने एक वेगळी अशी वटपौर्णिमा सध्या साजरी होत आहे यामध्ये किती भारी साड्या किती भारी दागिने आणि किती सुंदर नटन मुरडणं हे दिसत येत होतं आणि ते वडा साक्षीने तो वड सुद्धा मनातल्या मनात विचार करत असेल कारण ते झाड फार पुरातन आहे की ज्या फोटो काढत होत्या त्यांच्या सासवा पण आजसासवा सुद्धा या ठिकाणी प्रदक्षिणा करून गेल्या होत्या आणि त्यांना प्रत्यक्ष या वडाने पाहिलेलं होतं आणि तो भक्ती भाव होता तो आदर होता तो आदर इथं कुठे दिसतच नव्हता आदर असावा कुठे हे आपण मनातच ओळखलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की वडाचे फांदी तोडून ती एका कुंडीत लावली जाते आणि स्टूल वर ठेवायचं आणि तिच्या भोवती शहरांमध्ये फेऱ्या मारायच्या आणि अशा रीतीने ती वटपौर्णिमा साजरी करायची हे सत्य आहे का हे पर्यावरण आहे का पर्यावरण पूरक आहे का ? याचा विचार केला पाहिजे हिंदू संस्कृतीमध्ये जे काही घडलेला आहे त्याचा गूढ असा अर्थ आहे ज्यामध्ये पर्यावरण संस्कृती वाढली पाहिजे असं आहे आणि या वाढण्याचे प्रतीक म्हणजे तो वड आहे हा वड अविरत वाढत असतो त्याच्या पारंब्या जमिनीमध्ये जाऊन त्या परत रुजत असतात आणि अशा रीतीने तो वड फार मोठा होत असतो परंतु आपण काय वाढवायचं आणि काय कमी करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे परंतु नवीन पिढीला हे समजलं तर फारच छान होईल परंतु आपण समजावण्याचा प्रयत्न केला एवढाच आपला प्रयत्न असतो समजून घेणं त्यांचं काम आहे आणि जी वैराग्यता आहे आपल्या भक्ती भावांमध्ये वैराग्यत आहे ही वैराग्य त्यात दिसल पाहिजे भगवद् गीते मध्ये सत्व गुण, राजच गुण आणि तमो गुण सांगितलेले आहे यामध्ये ही वडाची पूजा सत्वगुणात येते परंतु तिथं राजच गुण आणि तमोगुण सुद्धा आलेला दिसतो म्हणून आदर करा सासूचा आदर करा नंदेचा आदर करा आपल्या ज्येष्ठांचा आदर करा त्याचप्रमाणे मना मध्ये द्वेष असू नये आई-वडील म्हातारे झाले म्हणून त्यांचा उपयोग नाही मग त्यांना काहीतरी टोमणे देणे आणि तुम्ही काय केलं आमच्या साठी असं बोलणं हे चुकीच आहे शेवटी हे जग आई-वडिलांनी आपल्याला दाखवलेल आहे तेच खरे आधार वड आहेत त्यांच्याविषयी आपण सद्भावनेने आदरानेच वागायला हवं आणि या जगात खरा ईश्वर आई आणि वडील आहे ज्यांचे ईश्वर कृपेने ते जिवंत आहेत त्यांनी त्यांना कधीही विसरू नये धन्यवाद.



शिवलीलामृत बेचाळीस ओव्या

(नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ॥
ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरु ॥६१॥
ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिद्धा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा जगत्पते ॥६२॥
जयजय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या ॥ मनोजदमना मनमोहना ॥ कर्ममोचका विश्वंभरा ॥६३॥
जेथे सर्वदा शिवस्मरण ॥ तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण ॥ नाना संकटे विघ्ने दारुण ॥ न बाधिती कालत्रयी ॥६४॥
संकेते अथवा हास्येकरून ॥ भलत्या मिषे घडो शिवस्मरण ॥ न कळता परिस लोहालागुन ॥ झगडता सुवर्ण करीतसे ॥६५॥
न कळत प्राशिता अमृत ॥ अमर काया होय यथार्थ ॥ औषध नेणता भक्षिता ॥ परी रोग हरे तत्काळ ॥६६॥
जय जय मंगलधामा ॥ निजजनतारक आत्मारामा ॥ चराचरफलांकित कल्पद्रुमा ॥ नामा अनामा अतीता ॥६७॥
हिमाचलसुतामनरंजना ॥ स्कंदजनका शफरीध्वजादहना ॥ ब्रह्मानंदा भाललोचना ॥ भवभंजना महेश्वरा ॥६८॥
हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा ॥ अर्धनारीनटेश्वरा ॥ गिरुजारंगा गिरीशा ॥६९॥
धराधरेंद्रमानससरोवरी ॥ तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी ॥ तव अपार गुणासी परोपरी ॥ सर्वदा वर्णिती आम्नाय ॥२७०॥
नकळे तुझे आदिमध्यावसान ॥ आपणचि सर्व कर्ता कारण ॥ कोठे प्रगटशी याचे अनुमान ॥ ठायी न पडे ब्रह्मादिका ॥७१॥
जाणोनि भक्तांचे मानस ॥ तेथेंचि प्रगटशी जगन्निवास ॥ सर्वकाळ भक्तकार्यास स्वांगे उडी घालिसी ॥७२॥
सदाशिव ही अक्षरे चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ तो परमपावन संसारी ॥ होऊनि तारी इतरांते ॥७३॥
बहुत शास्त्रवक्ते नर ॥ प्रायश्चित्तांचे करिता विचार ॥ परी शिवनाम एक पवित्र ॥ सर्व प्रायश्चिता आगळे ॥७४॥
नामाचा महिमा अद्भुत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यांसी सर्व सिद्धि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥७५॥
जयजयाजी पंचवदना ॥ महा पापद्रुमनिकृंतना ॥ मदमत्सरकाननदहना ॥ निरंजना भवहारका ॥७६॥
हिमाद्रिजामाता गंगाधरा ॥ सुहास्यवदना कर्पूरगौरा ॥ पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा ॥ त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥७७॥
नीलग्रीवा अहिभूषणा ॥ नंदिवाहना अंधकमर्दना ॥ दक्षप्रजापति मखभंजना ॥ दानवदमना दयानिधे ॥७८॥
जय जय किशोर चंद्रशेखरा ॥ उर्वीधरेंद्रनंदिनीवरा ॥ त्रिपुरमर्दना कैलासविहारा ॥ तुझ्या लीला विचित्र ॥७९॥
कोटि भानुतेजा अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥ समाधिप्रिया भुतादिनाथा ॥ मूर्तामूर्ता त्रयीमूर्तै ॥२८०॥
परमानंदा परमपवित्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ पशुपते पयःफेनगात्रा ॥ परममंगला परब्रह्मा ॥८१॥
जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ती ॥ तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती ॥ शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती कथिलीस ॥८२॥
जय जय भस्मोध्दूलितांगा ॥ योगिध्येया भक्तभवभंगा ॥ सकळजनरआराध्यलिंगा ॥ नेई वेगी तुजपाशी ॥८३॥
जेथे नाही शिवाचे नाम ॥ तो धिक् ग्राम धिक् आश्रम ॥ धिक् ग्रहपुर उत्तम ॥ आणि दानधर्मा धिक्कार ॥८४॥
जेथे शिवनामाचा उच्चार ॥ तेथे कैचा जन्ममृत्युसंसार ॥ ज्यांसी शिव शिव छंद निरंतर ॥ त्यांही जिंकिले कळिकाळा ॥५॥
जयाची शिवनामी भक्ती ॥ तयाची सर्व पापे जळती ॥ आणि चुके पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥८६॥
जैसे प्राणियांचे चित्त ॥ विषयी गुंते अहोरात ॥ तैसे शिवनामी जरी लागत ॥ तरी मग बंधन कैचे ॥८७॥
कामगजविदारकपंचानना ॥ क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ॥ लोभांधकार चंडकिरणा ॥ धर्मवर्धना दशभुजा ॥८८॥
मत्सरविपिनकृशाना ॥ दंभनगभंदका सहस्त्रनयना ॥ लोभमहासागरशोषणा ॥ अगस्त्य महामुनिवर्या ॥८९॥
आनंदकैलासविहारा ॥ निगमागमवंद्या दीनोद्धारा ॥ रुंडमालांकितशरीरा ॥ ब्रह्मानंदा दयानिधे ॥२९०॥
धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत पठण ॥ किंवा श्रवण करिती पै ॥९१॥
सूत सांगे शौनकांप्रति ॥ जे भस्म रुद्राक्ष धारण करिती ॥ त्यांच्या पुण्यासी नाही गणती ॥ त्रिजगती धन्य ते ॥९२॥
जे करिती रुद्राक्ष धारण ॥ त्यांसी वंदिती शक्रद्रुहिण ॥ केवळ तयांचे घेता दर्शन ॥ तरती जन तत्काळ ॥९३॥
ब्राह्मणादि चार वर्ण ॥ ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण ॥ स्त्री बाल वृद्ध आणि तरुण ॥ याही शिवकीर्तन करावे ॥९४॥
शिवकीर्तन नावडे अणुमात्र ॥ तो अंत्यजाहूनि अपवित्र ॥ लेइले नाना वस्त्रालंकार ॥ तरी ते केवळ प्रेतचि ॥९५॥
जरी भक्षिती मिष्टान्न ॥ तरी ते केवळ पशूसमान ॥ मयूरांगीचे व्यर्थ नयन ॥ तैसे नेत्र तयांचे ॥९६॥
शिव शिव म्हणता वाचे ॥ मूळ न राहे पापाचे ॥ ऐसे माहात्म्य शंकराचे ॥ निगमागम वर्णिती ॥९७॥
जो जगदात्मा सदाशिव ॥ ज्यासि वंदिती कमलोद्भव ॥ गजास्य इंद्र माधव ॥ आणि नारदादि योगींद्र ॥९८॥
जो जगद्गुरु ब्रह्मानंद ॥ अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ शुद्ध चैतन्य जगदादिकंद ॥ विश्वंभर दयाब्धी ॥९९॥
जो पंचमुख दशनयन ॥ भार्गववरद भक्तजीवन ॥ अघोर भस्मासुरमर्दन ॥ भेदातीत भूतपती ॥३००॥
तो तू स्वजनभद्रकारक ॥ संकटी रक्षिसी भोळ्या भाविका ॥ ऐसी कीर्ति अलोलिका ॥ गाजतसे ब्रह्मांडी ॥१॥
म्हणोनि भावे तुजलागून ॥ शरण रिघालो असे मी दीन ॥ तरी या संकटातून ॥ काढूनि पूर्ण संरक्षी ॥२॥
(ओव्या बेचाळीस समाप्त ॥)



महाराष्ट्राचा चित्ररथ २६.जानेवारी २०२३

महाराष्ट्राच्या चित्ररथातून नारीशक्तीचा जागर..!!

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्यपथावरील पथसंचलनात विविध राज्य आपापली लोकसंस्कृती सादर करण्याचा प्रयत्न करीत असतात. यातून राष्ट्रप्रेमाची उन्नती तर होतेच, शिवाय आपल्या लोक संस्कृतीची ओळख अधिक ठळक होत असते.

या वर्षी महाराष्ट्र राज्याने प्रसिद्ध असणारे साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा आहे. कोल्हापूरची श्री अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता तर वणीची सप्तशृंगी माता अशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन या चित्ररथाच्या माध्यमातून समस्त भारतवासीयांना झाले. शिवाय महाराष्ट्रातील लोककलांचेही दर्शन या माध्यमातून झाले.

महाराष्ट्रवासीयांना अभिमान वाटणारा आणि समस्त भारतवासीयांना भारावून सोडणारा, नारीशक्तीचा जागर करणारा हा चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान वाटतो.



भारतावरील संकट म्हणजे २६/११

२६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला 

भारताच्या इतिहासातील अतिशय भयानक असा हल्ला होता याचे स्मरण आजच्या या दिवशी प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.हे फार दुर्दैवी आहे.हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.[
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल अमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला.परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.
या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.



मा.आमदार कर्मयोगी झांबरशेठ

जुन्नर तालुक्याचे शिल्पकार -----
कै. श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबरशेठ तांबे
(माजी आमदार)
----------------------------------------------

ऐसे गोत्र पवित्र उत्तमापूर तीर्थक्षेत्र, चैतन्य सद्गुरु समाधिस्थ.
तज्ज राघव चैतन्य केशव चैतन्य, व्यासांची कृपा तेथे असे.

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याकडून सर्वसामान्यांच्या मुक्तीसाठी मिळालेला,
राम कृष्ण हरि‌‌हाच मंत्र
व दृष्टांताचा साक्षात्कार ह्याच पावन पवित्र भूमीतला".
ओतूरचा आरा
अन्
पिंपळवंडी चा सारा
असा हा सुख संपन्न आनंदी पसारा"
तो याच भूमीतला.

ह्याच भूमीने महाराष्ट्राच्या धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक साहित्यिक व राजकीय वैभवात भर टाकलेली आहे.
हेच ओतूर गाव आज घडीला महाराष्ट्राच्याच काय पण देशाच्या इतिहासात अजरामर होऊन गेलय.

भारताचे पहिले शिक्षक व थोर समाजसेवक :"महात्मा ज्योतिबा फुले व महाराष्ट्राच्या पहिल्या महिला स्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने ओतूरच्या भूमीत चरण स्पर्श केला.
आणि त्या दोघांनी ह्या भूमीला एक कानमंत्र दिला.

पाटी दप्तर हातात घ्या, अन ज्ञानाच कुंकू कपाळी लावा"
मगच दिवाळी दसरा साजरी करा

सुज्ञ अन् ज्ञानाची आवड असणाऱ्या सर्व ओतूरकर मंडळींनी त्यांचा शब्द झेल्लाच नाही; तर तात्काळ अमलातही आणला.
आणि खरोखरच एक चमत्कार झाला. ग्रामीण भागातील शिक्षणाची गंगा ओतूरकडून पुणे जिल्ह्यात ज्ञानाने, कर्तृत्वाने आणि आणि अभिमानाने वाहू लागली व ओतूरच्या शिक्षकांना त्यांच्या स्वकर्तुत्वाने आदरपूर्वक मान-सन्मान प्राप्त होऊ लागले.
कर्तुत्वाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कला- कौशल्यांनी बहरलेली नानाविध माणसांची मांदियाळीच ओतूरला पाहायला मिळाली.

कोणी पोलीस सेवेत सर्वोच्च स्थानी पोहोचलय,
कोणी डॉक्टर म्हणुन नामांकित झालय,
कोणी क्रिकेटचे मैदान गाजवतोय,
तर कोणी शालांत परीक्षेत सर्वोत्कृष्ट ठरलय
कोणी दूरदर्शन पडदा गाजवलेला,
कोणी साहित्यिक म्हणून नावाजलेले,
कोणी शब्द पंढरीच्या वारकर्‍यांनी राष्ट्रपतीपदका पर्यंत गवसणी घातलेली,
तर कोणी सृजनशील नेतृत्व करून जनमानसात लोकप्रियता मिळवलेली.

पूर्वीच्याकाळी गावच्या गाव गाड्याचा प्रगतीचा आढावा खुलेपणाने व पारदर्शी पद्धतीने नागपंचमीच्या दिवशी पांढरीच्या मारुतीच्या मंदिरासमोरील व्यासपीठावर चालायचा.(तीच जपलेली परंपरा आजही अखंडपणे सुरू असलेली दिसून येते.) जेव्हा गाव गाड्याची चर्चेची बैठक असायची, तेव्हा कोणीही तरुण तिकडे फिरकत नसायचा त्याला अपवाद होता फक्त छोटा श्रीकृष्ण.लोकांच्या विश्वासाला व आदराला पात्र असलेल् जुन्या गाव गाड्यातील एकमेव नाव होतं हरी गेनुजी तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भिका आप्पा तांबे, भाऊ मास्तर डुंबरे या गाव पुढाऱ्यांनी श्रीकृष्णाची तल्लीनता, सामाजिक कार्याची आवड, पाहून त्यांना अगदी पारखून निरखून घेतलं. संपूर्ण गावच्या एकमुखी निर्णयामुळे ओतूरच्या सरपंच पदाची माळ श्रीकृष्णाच्या गळ्यात पडली.------------अन इकडे सुद्धा -----------. लताबाईंनी श्रीकृष्णालाच माळ घातली.

उंब्रजच्या दांगट घराण्याची पुण्याई फळा आली
लेक लाडकी या घरची तांबे घराण्याची सून झाली.

नऊवारी साडीतला घरंदाजपणा ज्यांच्याकडे पाहिल्यावर दिसत होता, डोक्यावरचा पदर जणू शालिनीतेचाच महिमा गात होता. तेव्हा लताबाई एखाद्या राजघराण्याची राजमाता शोभायची आणि झांबरशेठच्या बेरजेचे राजकारण जवळून पाहायची.
पती धर्माचं पालन करता करता चार पुत्र प्राप्तीच्या आनंदात रममाण व्हायची. गावच्या सरपंच पदाच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपद ही त्यांनाच प्राप्त झाले होते.
विकासाचा ध्यास,सकारात्मक दृष्टिकोन व संघटन कौशल्य यांच्या बळावरच जुन्नर तालुक्याचे १ले सभापती पदाचा मान
आणि
त्याच दर्जाचे केलेलं काम "
अजूनही स्मरणात राहते.जुन्नर पंचायत समितीच्या दगडी इमारतीची सुरेख वास्तू आजही सर्वांचं लक्ष वेधून घेते.
ओतूर- मढ गटाचे बिनविरोध सदस्यपद पुणे जिल्हा परिषदेत गाजत होते;
कारण नवनवीन कामे मार्गी लागत होती; म्हणून जिल्हा परिषदेचे उपसभापती पदीही त्यांचीच वर्णी लागली आणि जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सुसज्जता प्राप्त झाली. विजेचा लपंडाव थांबला गेला. वीज नियमित केली गेली. रस्त्याची डागडुजी व नवीन रस्त्यांची कामे मार्गी लागली.
नवीन- नवीन प्राथमिक शाळा इमारतींमधून
सरस्वतीची आराधना सुरू झाली.

१९५२ सालापासून झांबरे शेठ हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाचा व पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास निर्माण झाला होता; त्या काळी जुन्नर काँग्रेसचा सात्विक चेहरा म्हणजेच श्रीकृष्णशेठ उर्फ झांबरशेठ (नाना) होय.धनाची श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी असलेला माणूस म्हणजे झांबरेशेठ होय.
काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकीची उमेदवारी दिली खरी; परंतु आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने संपूर्ण गावकऱ्यांनी कंबर कसली मग प्रचाराची वर्गणी जमा झाली, सुंदर नियोजन केले गेले, एकीचे बळ त्यामुळे मिळालेले फळ म्हणजेच झांबरे शेठ आमदार झाले.

जुन्नर तालुक्यात प्रगतीची पावले वेगाने पडायला सुरुवात झाली.

ज्याचे घरी नाही धन,
त्याची विद्या असे धन,
शिकावयाचे कारण,
हेचि असे जाण पां.

जगण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता घेता येणे म्हणजेच खरे शिक्षण.
. हाच शिक्षणाचा संस्कार माझ्या तालुक्याच्या घराघरात व लोकांच्या मनामनात पोहोचला; तरच समाजाची खरी उन्नती.
हा मंत्र सजग असलेल्या झांबरशेठला मनोमन पटला,
व त्यांच्या अंतकरणात जोरदार ठसला.
शिक्षणा विना कोणी विद्यार्थी वंचित राहणार नाही ही अंतरीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना.

वाटेल ती किंमत मोजू,
पण सरस्वतीचे मंदिर आनंदाने खोलू.
ही खूणगाठ मनाशी बांधली गेली, ‌निर्धार ठरला,
मग शिक्षण गंगेचा गोवर्धन उचलण्यासाठी अनेकांनी हातभार लावला.
तरीही वर्गणी कमीच पडली,
मग बँक आडवी आली,
तेव्हा झांबरशेठ ने स्वतःची जमीन बँकेला तारण ठेवली."
म्हणूनच म्हणावेसे वाटते,

समाजाचे दूर केले त्यांनी अज्ञान,
उत्तर पुणे जिल्ह्यात
सुरू केले
ग्रामीण भागातील
पहिले महाविद्यालय विज्ञान

त्यानंतर ओतूर, उदापूर, डिंगोरे व धोलवड या ४ ठिकाणी विद्यालय सुरू केली.
त्यानंतर आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्याही जीवनामध्ये प्रगतीची गंगा यावी. हा उदात्त हेतू ठेवून गाडगे महाराज विद्यालय सुरू करणे कामी खूप प्रयत्न केले ; प्रसंगी चैतन्य विद्यालयाचे ४ शिक्षक त्या ठिकाणी पाठवले व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
ओतूर कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय शिक्षणप्रेमी आमदार झांबरेशेठकडुन करण्यात आली होती. ओतूर मधील मराठी शाळेचे उद्घाटनासाठी सन्माननीय बाळासाहेब देसाई यांना निमंत्रित करून शिक्षणाचा श्रीगणेशा त्यांनी गावागावात सुरू केला.

प्राथमिक शाळेच्या गावां गावांमध्ये नवीन इमारती उभ्या राहिल्या,
तेव्हाच विद्यार्थ्यांच्या चांगल्या पिढ्या
निर्माण झाल्या.

अशा प्रकारे कै.कर्मवीर भाऊराव पाटील ,
कै.बा रा घोलप साहेब,
कै. प्राचार्य सबनीस साहेब,
कै. चांदमल भाऊ बोरा साहेब,
या शिक्षण महर्षी प्रमाणेच
छोट्या गावचा,
मोठा शिक्षणमहर्षी
झांबरशेठ ठरले.
मद्यांलयाऐवजी विद्यालयांची
उभारणी करणारा,
स्वच्छ प्रतिमेचा व
प्रचंड प्रतिभेचा" असा हा
सुसंस्कृत नेता. त्याकाळी खूप लोकप्रिय ठरला.

आज हजारो विद्यार्थी व ओतूर महाविद्यालयांमधून व या चार विद्यालयामधून शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात यशस्वी होताना दिसत आहेत ही झांबर शेठची पुण्याई आहे.
(आज घडीला ओतूर महाविद्यालय व धोलवड विद्यालय ग्राम विकास मंडळ ओतूर या संस्थेच्या ताब्यात नाहीत.)

जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर बरीचशी मान्यवर मंडळी होती; त्यामध्ये झांबर- शेठही होते. पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी व ४ जिल्ह्यांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प होऊ घातलेला होता; परंतु सरकार व प्रकल्पबाधीत शेतकरी यांचा समन्वय न बसल्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

तेच पवित्र पाय सरस्वतीच्या प्रांगणामध्ये घेऊन येणारे झांबरे शेठ होते.
त्यावेळेस ओतूर महाविद्यालयाचे उद्घाटन करताना प्रास्ताविकामध्ये आमदार श्रीकृष्णशेठ म्हटले, गोरगरिबांच्या मुलांना पुणे-मुंबई सारखे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी मी हे कॉलेज स्थापन करण्याचा प्रयत्न केला; यासाठी मला अडचणीही आल्या, त्या सर्व अडचणींवर मात करत- करत मी इथपर्यंत आलो आहे.
आता इथून पुढे मात्र माझ्या कॉलेजला एकही पैसा कमी पडणार नाही, कारण देशाच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये आहे; तेच देशाचे अर्थमंत्री चव्हाण साहेब माझ्यापुढे बसलेले आहेत.असे म्हणताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबही खळखळून हसले. लोक उलटीपालटी होऊन एकमेकांना टाळ्या देत सुटली होती.
नंतर चव्हाण साहेब उठले व भाषणात म्हटले की झांबरे शेठ
हे एक हजरजबाबी व प्रेमळ व्यक्तिमत्व आहे.
त्यांनी खूप सुंदर वाक्य वापरलय, आता मलाही कुठेतरी वाटतय; की एखादी घोषणा करून तिजोरी खोलावी. मी १०००० / रुपये देशाच्या तिजोरीतून महाविद्यालयासाठी देणगी जाहीर करतो. पुन्हा पाच मिनिटे टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.
असा हा शिक्षण प्रेमी आमदार फक्त नेत्यांच्याच नाही; तर संपूर्ण समाजाच्या पसंतीस उतरलेला होता.

सह्याद्रीच्या या भूमिपूत्राच्या कर्तृत्वाचा आणि प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढताच राहिला. १९७२ च्या प्रचंड दुष्काळाच्या झळा संपूर्ण महाराष्ट्रावर पडल्या होत्या, दुष्काळा आ वासून पुढे उभा होता, आकंड तांडव करत होता. प्रसंग मोठा बाका होता,
संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे,

बुडता हे जन, न देखवे डोळा.
येतो कळवळा म्हणऊनी.

तेव्हा वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना मंत्रालयातून सर्वात जास्त रोजगार हमीच्या योजना जुन्नर तालुक्यात घेऊन येणारा पहिला कार्यसम्राट आमदार म्हणजेच श्रीकृष्णशेठ तांबे होय.

निसर्गाची साधी भोळी लेकरं म्हणजेच आदिवासी समाज होय
.कारण गोरगरीब आदिवासी जनतेच्या हाताला काम पाहिजे, त्यांना पोटभर अन्न मिळाले पाहिजे.
ही भावना त्यांच्या अंत:करणात होती. म्हणूनच कोपरे- मांडवे- मुथाळणे या नागमोडी घाटाचं काम अतिशय सुंदर पद्धतीने रोजगार हमीच्या योजनेतून त्यांनी करून घेतलं. लोकांची दळणवळणाची सोय झाली.
पोटा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला होता. म्हणूनच आदिवासी जनता खूश झाली होती.
म्हणूनच अजूनही या आदिवासींच्या घरांमध्ये झांबरशेठ यांचे फोटो पहायला मिळतात.
त्यानंतर पुणे व नगर हे २ जिल्हे जोडण्याचं काम बदगी - बेलापूर ह्या घाटाने पूर्ण केलं.
लोकांचा जाण्या- येण्याचा प्रश्न मिटला होता. काळाची गरज ओळखून, ओतूर- पुणे ही एसटी सुरू करण्यासाठी झांबरे शेठ यांनीच त्यावेळी प्रयत्नांची शिकस्त केली. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे यासाठी छोटा साखर कारखाना (खांडसरी )काढण्याचेही प्रयोजन होतं; परंतु तो प्रयत्न अपूर्ण राहिला.

संपूर्ण आयुष्यभर सायकलवर व
एस टी ने प्रवास करणारा,
प्रवासातही सतत पुस्तके वाचणारा, कणखर मनाचा व परखड विचारांचा हा नेता सर्वांच्याच अंत:करणात जाऊन बसला
त्यावेळी शंकराव चव्हाण साहेब, मामासाहेब मोहोळ, डि के राजर्षी साहेब (माजी आमदार ठाणे) या व इतरही अन्य नेत्यांसमवेत श्रीकृष्णशेठ यांनी माळशेज घाटाचा शुभारंभ केला.
सतत २ महिने घाटावर थांबून, कामाचा दर्जा राखणारा व वेळोवेळी कामगारांनाही प्रोत्साहन देणारा जुन्नर तालुक्याचा हा पहिला विकास पुरुष ठरला.

फोडून माळशेज घाट,
तयार केली नवीन वाट,
बांधकामाला नाविन्याचा थाट
प्रगतीची फुटली पहाट
झांबरशेठची ही दूरदृष्टी----
आज पाही सर्व जीवसृष्टी
आनंदाने -- -- - --- -सुखा समाधानाने

अत्यंत कल्पक, मेहनती व आत्मनिर्भर व अभ्यासू तसेच संपूर्ण आयुष्य जनतेच्या सुखासाठी त्यागणारा एक कर्तबगार व जबाबदार आमदार म्हणजे झांबरेशेठ होय.
सतत पायीपीट,एस टीचा प्रवास, जीपचा प्रवास, कामांचे नियोजनाची जबाबदारी, दुष्काळाचे सावट, त्यासाठी झालेली प्रचंड शरीराची ओढाताण व दगदग, नाजूक प्रकृतीच्या झांबरशेठ चे कामाच्या नादात स्वतःच्या प्रकृती कडे झालेले दुर्लक्ष त्यामुळे तब्येतीवर प्रचंड ताण आला. व प्रकृती खालावली म्हणतात ना! एका सुखाच्या मागे दुःख लपलेलं असतं - - - -- -- --
अमावस्या भाद्रपद पोळ्याचा तो दिवस होता. (माळी, पाटील डुंबरे, चौगुले -गाढवे ) यांच्यापैकी आत्माराम रामचंद्र गाढवे (मामा )यांची मानाची व इतरही मानकऱ्यांची बैल रंगवून, सजवून मारुतीच्या चौकात येऊन थांबली होती.
- - - - अचानक मुंबई वरून आलेल्या निरोपाने ओतूरच्या काय ? पण संपूर्ण महाराष्ट्रावर काळीकुट्ट अमावस्या पसरली.
कारण झांबरशेठ ( नाना ) आपल्याला सर्वांना सोडून गेले होते.
कैलासवासी झाले होते. (मृत्यु दि. २६ सप्टेंबर १९७३) त्यादिवशी लोकांनी पोळ्याचा स्वयंपाक तसाच ठेवून, लोक उपाशी झोपली होती.
कोणीही त्या दिवशी सण साजरा केलेला नव्हता; एवढे तीव्र दुःख झालेलं होतं.

भाद्रपद अमावस्ये ला होता बैलपोळा,
झांबरेशेठच्या मृत्यूच्या बातमीने
लोक झाली गोळा
ओतूर आणि तालुक्याच्या स्वप्नांचा झाला चोळा-मोळा
लोकं रडता रडता म्हणत होती
आमच्या माणसातला देव गेला.......
आमच्या माणसातला देव गेला....

संपूर्ण आमदार मळा शोकसागरात बुडाला.......
नातेवाईक खिन्न, ओतूर सुन्न, आज खऱ्या अर्थाने गावकी- भावकीच पांघरुन गेल. लोकांचा हक्काचा आधार गेला; आणि संपूर्ण जुन्नर तालुका पोरका झाला.

हा- हा म्हणता वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली.
मांडवी नदीच्या पवित्र किनारी कै.
झांबरशेठचा ( नानांचा) पवित्र पार्थिव देह ठेवला गेला. लोकनेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते चंदनाचा हार घातला गेला.मांडवी नदीला आलेला पूर ओतूरकरांनी अनेक वेळा अनुभवला; परंतु कै. झांबरशेठ च्या अंत्यविधीच्या वेळी गावाला आलेला लोकगंगेचा महापूर लोकांनी पहिल्यांदाच डोळे भरून पाहिला. तेव्हा शरद पवार साहेब म्हणाले की,
,"झांबरेशेठ म्हणजे जनाधार लाभलेला एक असामान्य व्यक्तिमत्त्व होय.
असा हा निस्वार्थी व लोकप्रिय आमदार सदैव जनतेच्या स्मरणात राहील."
आज घडीला पवार साहेबांचे शब्द खरेच ठरत आहेत.

"शिक्षणाची गंगा घरोघरी आणून शिक्षण महर्षी ठरलेला,
दुष्काळाच्या वेळी रोजगार हमीची योजना संपूर्ण जुन्नर तालुक्यात आणून लोक जगवणारा कार्यसम्राट आमदार. त्याकाळी कोणताही मोठा निधी
उपलब्ध नसताना दुष्काळातही मोठमोठ्या घाटांची काम करणारा, जुन्नर तालुक्याचा हा पहिला विकास पुरुष ठरला."

संपूर्ण जुन्नर तालुक्या तर्फे झांबरशेठ या कार्यसम्राट आमदाररास विनम्र अभिवादन.

आज रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी श्रीकृष्णशेठ उर्फ झांबरेशेठ (नाना ) यांची ४९ वी पुण्यतिथी त्यानिमित्त ग्राम विकास मंडळ, ओतूर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व झांबरशेठ यांच्या कार्या सारखच काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.आजही कै. झांबरशेठच्या कार्य कर्तुत्वाच व स्मृतींचं स्मरण अतिशय गौरवास्पद पद्धतीने सुरू आहे.ही खूप अभिमानास्पद व स्तुत्य बाब आहे.
-----------------------------------------------
महेंद्र मल्हारी बोऱ्हाडे ( सर)
महालक्ष्मी विद्यालय उंब्रज १
ता. जुन्नर जि. पुणे
(लेखक, व्याख्याते, कवी, निवेदक,
चित्रपट व नाट्य कलाकार,
इंग्रजी भाषा तज्ज्ञ मार्गदर्शक
(जुन्नर तालुका व पुणे जिल्हा)
(वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा परीक्षक)
पुणे विद्यापीठ व राज्य पातळी.
-----------------------------------------------



स्वर्गीय झांबर शेठ

एक महान कर्मयोगी......कै. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे [झांबरशेठ
लाखो वर्षांनी एखादाच सुर्य क्षितिजावर आपल्या प्रखर किरणांनी तळपताना दिसतो,हजारो वर्षांनी एखादाच चंद्र आपल्या शितलतेने आपल्याला मोहवून टाकतो,कित्येक वर्षांनी एखादाच कोहिनूर झळकताना दिसतो त्याप्रमाणेच समाजकारणात व राजकारणात देखील अनेक वर्षांनी एखादा महान कर्मयोगी जन्माला येतो अगदी त्याप्रमाणेच कै. रामजी सखाराम तांबे व कै.रेऊबाई रामजी तांबे यांच्या पोटी 21 सप्टेंबर 1928 ला एक रत्न जन्माला आले ते म्हणजे श्रीकृष्ण.साहित्य-कला-क्रीडा,शिक्षण,संस्कृती, धार्मिकता, सामाजिकता या विविध अंगाने नटलेल्या या ओतूरगावात नावाप्रमाणेच श्रीकृष्ण हे आपल्या वक्तृत्व- कर्तृत्व-नेतृत्व या गुणांनी झळकू लागले.गुण हे कधीच लपत नसतात. ते प्रत्येक क्षणी न दाखवताही दिसून येतात.पंरपंरागत शेती व्यवसाय सांभाळणा-या शेतकरी कुंटुबात आपल्या कष्टमय व वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या आई-वडिलांच्या संस्कारावर ते लहानाचे मोठे झाले.
घराला घरपण हे मनात घर केलेल्या संस्कृतीमुळेच येते आणि ते त्या घरात राहणा-यांनाच कळते.आपलं घर हे ज्याला कळले ते जगाला नेतृत्व देऊ शकतात.आणि माणसंही जोडू शकतात.याच बळावर त्यांनी अनेक मित्र व माणसं जोडली.माणसांच्या याच साखळीने त्यांना ओतूर गावचे सरपंच केले.नेतृत्व हे सर्वसमावेशक असलं कि बहरत जातं-फुलत जात आणि विकसित होत.1952 ते 1970 या 18 वर्षात ते ओतूर गावचे सरंपच म्हणून राहिले.ते ही अतिशय कार्यक्षम म्हणूनच !
जीवन जगण्याची खरी मजा ही त्यागातच आहे.आणि माणसाचे जीवन हे त्यागानेच परिपूर्ण होते.त्यासाठी माणसाजवळ असावा लागतो विचार.आणि विचार जर सुसंस्कृत बनवायचे असतील त्याला शिक्षणाची जोड असायला हवी.कारण शिक्षणानेच मनुष्य हा आपले ध्येय बळकट करु शकतो. हे त्यांनी ओळखले होते.माझ्या तळागाळातील मुलांची जर प्रगती करायची असेल तर शिक्षणासारखा दुसरा कोणताच पर्याय नाही हे त्यांनी ओळखले होते म्हणूनच सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत पुणे विद्यापीठाची वारी ते करत होते.1968 पासून माझ्या गावाला महाविद्यालय व्हावं हे स्वप्न ते पहात होते.
माणसाच्या कार्यक्षमतेला समाजकारणाची जोड मिळाली कि त्याचा ठसा राजकारणावर उमटतो.त्याच काळात 1962 ला स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली.जिल्हा परिषद अस्तित्वात आली.काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना ओतूर मढ मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली.1967 मध्ये आळे पिंपळवंडी गटातून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले.त्यावेळी जुन्नर पंचायत समितीत उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले.काही माणसं संधीचं सोनं करतात.आणि इतिहासाचे साक्षीदार बनतात.आपल्या अध्यात्मिक,पौराणिक-सामाजिक-शैक्षणिक पंरपंरेच्या बळावर ते जुन्नर पंचायत समितीचे पहिले सभापती बनले.जुन्नरच्या इतिहासात आजही ते नाव कोरले गेलेले आहे.
समाजाभिमुख काम आणि शांत व मनमिळाऊ कामामुळे ते लोकमान्य असे लोकनेते झाले होते.1972 मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती व त्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडुन आले होते.मुंबई- पुणे असा नेहमीच प्रवास असल्याने शैक्षणिक प्रवाहाशी कायमच संबंध येत असे.हा प्रवास ते नेहमीच एस. टी. ने करत.सायंकाळी 6.00च्या सुमारास पुण्याहून ओतूरला निघायचे प्रवासात ते फक्त वाचन करत असायचे. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच त्यावेळचे जिल्हयाचे नेते मामासाहेब मोहोळ, कुलगुरु आपटे साहेब व स्व. मधुकरराव चौधरी यांच्याकडे त्यांनी गावाकडे महाविद्यालय उभारणीसाठी सारखा पाठपुरावा केला होता.
कनवाळू-मायाळू-दयाळू आणि प्रेमाची मुर्ती म्हणजे स्व.झांबरशेठ! आज अनेक उपाध्या व सांजशृंगार आपल्याया लोकप्रतिनिधींमध्ये पाहिला मिळतो. दादा-शेठ- साहेब म्हटल्याशिवाय लोकप्रतिनिधी उमगतच नाही.आज पैसा हीच ओळख झाली.कालायतस्मैनमहा!! परंतु साधी रहाणी उच्च या विचारसरणीकडे त्यावेळी होती विनयशीलता. काळ बदलत गेला आज अशा सामान्य परंतु आदर्श व्यक्तींना आपली जनता सुद्धा उभी करत नाही .पण हे सत्य आहे की आपल्या कामाच्या कर्तृत्वावर तुम्ही जनतेच्या गळ्यातील ताईत बनू शकता.यासाठी तुमची कामाची पावती फार महत्वपूर्ण ठरते.आपल्या कामसू व अभ्यासू वृत्तीच्या बळावर त्यांनी आपल्या गावापासून ते तालुक्याच्या विविध गावांच्या तळागाळापर्यत विकासाची गंगा नेण्याचा प्रयत्न केला.आपल्या विचारांचा दर्जाच इतरांच्या सुखाचा दर्जा निश्चित करत असतो.यासाठी लोकांचे प्रश्न हे त्यांनी स्वतःचे प्रश्न समजले.शिक्षणाबरोबरच त्यांनी आरोग्यला प्राधान्य दिले.तालुक्याच्या प्रत्येक गावात आरोग्यकेंद्र उभे रहावे हे त्यांच स्वप्न ! ओतूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे जणू त्याच द्योतकच.
जगातल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीच्या कळसाकडे प्रथम पाहू नये त्यासाठी आधी पायाकडे पहावे.कारण पायाकडे पाहून स्फूर्तीचा साक्षात्कार घडतो. 1970 साली हा महाविद्यालयाचा पाठपुरावा करताना अखेर महाविद्यालयाला परवानगी मिळाली आणि विशेष आनंद म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील गाव पातळीवरचे ते पहिले कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ठरले.कोणतीही चांगली गोष्ट ही त्या गावासाठी व लोकांसाठी भूषणावह बाब असते.अशावेळी दानशूर ग्रामस्थांनी महाविद्यालयासाठी 20 एकर जमिनीचे क्षेत्र उपलब्ध करुन दिल्याने जागेचा फार मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली. आजही त्या दानशूर जमीन मालकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.जागेचा प्रश्न सुटला होता परंतु इमारतीचा प्रश्न पुढे उभा राहिला होता. कारण सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग किंवा नाटक नाही करता येत.कोणतही पाऊल हे धाडसाने टाकल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. कारण आता पुन्हा देणा-यापुढे पैशासाठी जाता येत नव्हते. शेवटी स्वतःची जमीन एक लाख रुपयांना त्यांनी गहाण ठेवली व इमारतीचे काम नेटाने पूर्ण केले.स्व. यशवंतराव चव्हाण मा.मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाचे उदूघाटन केले आणि ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांसाठी ज्ञान गंगेचे प्रवेशद्वार मुक्त केले.त्यामुळे आज या महाविद्यालयाच्या प्रागंणातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी महाराष्ट्र राज्याच्या सेवेत उच्च पदावर , अधिकारीपदावर ,प्राचार्य,प्राध्यापक,शिक्षक, अभियंता,अनेक विभाग ,लेखक-कवी, साहित्य-कला-क्रीडा,विधी-न्याय,संरक्षण दल,पोलिस दल आदि अनेक विभागात कार्यरत आहेत.हे सर्व अभिमानास्पद आहे. परंतु हे सर्व घडले ते केवळ स्व. आ. झांबरशेठ यांच्यामुळे.
मातीने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी मातीसाठी काय करु शकतो हे तर प्रत्येकाचेच प्रश्न असतात. त्यावेळी मराठवाडा विदर्भ या भागातील पाण्याचा प्रश्न हा खुप मोठा गंभीर प्रश्न कि जो आजही आपणास दिसतो.अशावेळी कुकडी प्रकल्प उभा ठाकला.त्यावेळी या प्रकल्पाचे साक्षीदार म्हणून ते पुढे होतेच! त्यांच्या काळापासुनच या गोष्टींना पुढे चालना मिळत गेली.
कारण एवढ्या कष्टाने तसेच दानशुर व्यक्तींच्या बळावर आणि सर्वसामान्य गोर गरीबांच्या दानावर हे काँलेज त्यांनी उभे केले होते.त्यासाठी दिवसरात्र ते स्वतः झटले होते.पण सर्व काही हातातून निसटत चालले होते. अगदी आपटे नावाच्या कुलगुरुंकडे त्यांनी त्याचा भरपुर असा पाठपुरावा केला होता.
त्यातूनच येडगाव धरण, पिंपळगाव धरण व इतर धरणंही नावारुपाला आली.तालुक्याचे प्रश्न इथेच थांबले नाहीत तर या प्रश्नांसाठी अधिक जोमाने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.स्व. मामासाहेब मोहोळ यांचे ते मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे.त्यावेळी मामासाहेब हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते तर स्व. बाबुराव घोलप हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव होते.कर्जाचे ओझे वाढतच होते.अशावेळी ग्रामविकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी,व ग्रामस्थांनी काळजावर दगड ठेवत काँलेज चालू राहिले पाहिजे आणि बहुजन समाजाबरोबरच तळागाळातील सर्व विद्यार्थी शिकले पाहिजेत यासाठी जड अंतःकरणाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्वाधीन हे महाविद्यालय करायचे असा निर्णय घेतला. त्यावेळी हे कर्ज फेडण्यासाठी वाघिरे नावाचे गृहस्थ पुढे आले आणि त्यांच नाव देण्यात आले.हा त्यांनी आपला स्वतःचा पराभव मानला.
गर्वामुळे ज्ञानाचा,स्तुतीमुळे बुद्धीचा,आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो हे ते पुरते जाणून होते म्हणूनच आपल्या शांत- निगर्वी स्वभावाने त्यांनी माणसांची मनं जिंकली होती.तालुक्यातील वीज, पाणी, आरोग्य, रस्ते,शिक्षण या सर्व गोष्टींकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले होते. तालुक्यातील सर्वांगीण गरजा पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र ते झटत होते. आज राजकारण पुर्णपणे बदलेले आपल्याला दिसून येते. पैशासाठी राजकारण आणि राजकारणासाठी पैसा हे सुत्र सगळीकडेच दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य माणसाकडे फक्त मतदार म्हणूनच पहावयास मिळते.अर्थात ही परिस्थिती आणण्यासाठी मतदारच जबाबदार असल्याचं चित्र आपण पाहतो. परंतु तो काळच वेगळा होता.सर्वसामान्य मतदार किंवा माणूस हा त्या व्यक्तीच्या कामावरच प्रेम करत होता. याच प्रेमाच्या बळावर त्यांना उर्जा मिळे व ते अधिक जोमाने त्या सर्वांसाठी काम करत.आपल्या आमदारकीच्या काळातच मुंबई ही मुख्य बाजारपेठ जर आपल्या ग्रामीण गावांना जोडली गेली तर शेतकरी, उद्योग व व्यवसाय करणा-या सर्वांचाच फायदा होईल यासाठी अणे- माळशेज होण्यासाठी त्याअगोदर त्यांनी अनेक आंदोलने केली.त्यानंतर मराठवावाडा, विदर्भ व इतरही भागांचा त्यामुळे फायदा होणार होता. म्हणूनच स्व.शंकरराव चव्हाण हे त्यावेळी या घाटाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले.त्यांच्यासमवेत मामासाहेब होतेच. यामुळे सर्वसामान्य वर्गाचा खुपच फायदा झाला. नोकरी-उद्योग-व्यवसायाची द्वारे खुली झाली.
त्यामुळेच अणे-माळशेजचे प्रणेते म्हणूनही त्यांची ओळख झाली.संसारात तुझ-माझ असे कोणाचेच काही नसते.जे काही असते ते सगळ्यांचेच असते. म्हणूनच आपल्या आमदारकीच्या काळात 1972 ला जो दुष्काळ पडला त्यावेळी या तालुक्यामध्ये कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले.आणि रोजगार हमी योजने अंतर्गत सगळ्यात जास्त रस्त्यांची कामे त्यांनी हाती घेतली.कोपरे-मांडवे, मुथाळणे- जांबुळशी,इंगळून-पासून ते नाणेघाटापर्यत रस्त्याच्या खडीकरणाची कामे त्यांनी हाती घेतली.अहोरात्र ते आपल्या मतदारसंघातील गाववोगाव आणि वाड्यावस्त्यांना भेट देत होते. सरकारी मदत व सहकार्य सर्वोतोपरी देत होते.या धावपळीमध्ये शाररीक अतिश्रम होत होते.पण जीवाची पर्वा न करता माणसांमधला हा माणूस केवळ माणसांसाठीच पळत होता.याच अतीश्रमामुळेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र असा झटका आला. बाँब्मे हाँस्पिटलला त्यावेळी स्वतःची तब्बेत व्यवस्थित नसतानाही काठी टेकवत टेकवत आपल्या मानसपुत्राला भेटण्यासाठी मामासाहेब मोहोळ आले होते.तो दिवस भाद्रपद पोळ्याचा होता.पवारसाहेबांवर व त्यांच्या शब्दावर त्यांची अपार श्रद्धा होती.परंतु काळ थांबण्यास तयार नव्हता.अखेर 26 सप्टेंबर 1973 ला जुन्नर तालुक्याचा हा कर्मयोगी व ओतूरचा भुमीपुत्र अनंतात विलीन झाला.त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना पवारसाहेब त्यांचे पार्थिव ओतूरला घेऊन आले आणि अंत्यविधी पारपडेपर्यत परिवाराचे सांत्वन करत राहिले.त्यानंतर मात्र पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचेमा.अध्यक्ष मामासाहेबांनी दिलेला शब्द मा.अध्यक्ष तथा मा. खासदार स्व. रामकृष्णजी मोरे यांनी तो शब्द पाळला त्यांचे नाव ग्रंथालयाला तर पवारसाहेब यांच्या शुभहस्ते संरक्षणमंत्री असताना त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पण त्या भाद्रपद पोळ्याला मात्र ओतूरकरांनी जे दुःख भोगले त्याचे शब्दात वर्णन करता येणं शक्य नाही. पण हजारोंच्या उपस्थितीत या लोकनेत्याला साश्रुनयनांनी जनतेने निरोप दिला होता.त्यानंतर 1974 ला जुन्नर व सोलापूरची पोटनिवडणूक झाली.सोलापुरच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे तर जुन्नरच्या पोटनिवडणूकीत स्व. आमदार झांबरशेठ यांच्या पत्नी श्रीमती लतानानी या प्रचंड मताधिक्याने जुन्नरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या.परंतु हे सगळ होत असताना जनतेने आपल्या लोकनेत्याला निरोप दिला होता. रविवार दि.25.09.2022त्यांचा स्मृतिदिन.अशा या महान कर्मयोग्यास त्यांच्या 49 व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन...!!!



Charcoal Drawing

Horse Drawing
Charcoal
With chalk



Chatrapati Shahu

मोठ्या दिलाचा राजा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मोठ्या दिलाचा राजा म्हणून त्यांची ख्याती होती. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणत.



प्रबोधन कालीन चित्रकार रॅफेएल

रॅफेएल : कलेचा अभ्यास करतांना प्रबोधन काळ म्हटल्यावर लिओनार्दो,मायकेल इंजेलो त्याप्रमाणे रॅफेएल हे नाव घेतले जाते.(६ एप्रिल १४८३−६ एप्रिल १५२०). श्रेष्ठ इटालियन चित्रकार व वास्तुकार. त्यांचे संपूर्ण नाव राफ्फाएल्लो सान्ती किंवा सान्तस्यो. इटालियन प्रबोधनाच्या उत्कर्षकाळातील तो एक महत्त्वाचा कलावंत मानला जातो. ऊर्बीनो या गावी त्याचा जन्म झाला. त्याचे वडील जोव्हान्नी सान्ती हे एक चित्रकार होते आणि चित्रकलेचे प्राथमिक धडे त्याने आपल्या वडिलांकडूनच घेतले. त्याच्या मातापित्यांच्या अकाली निधनानंतर त्याच्या चुलत्याने त्याचा प्रतिपाळ केला. तत्कालीन ऊर्बीनोमधील सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या समृद्ध वातावरणात रॅफेएलच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. फेदेरीको-द-माँतेफेल्त्रो या सरदारच्या कारकीर्दीत ऊर्बीनो हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले. तो रोमन व ग्रीक संस्कृतींचा अभ्यासक होता व त्याच्याकडे त्यावेळची समृद्ध अशी परिपूर्ण अभ्यासिका होती. रॅफेएलच्या व्यासंगी मनाला येथेच खतपाणी मिळाले. रॅफेएलने १४९५ मध्ये पेरूजाला प्रयाण केले व तो पेरूजीनोच्या कलाशाळेत दाखल झाला. १५०४−०५ ह्या सुमारास त्याने निर्माण केलेल्या कलाकृती उल्लेखनीय आहेत. उदा., व्हिजन ऑफ अ नाइट (सरदारास झालेला दृष्टांत), द थ्री ग्रेसेस, सेंट मायकेल अँड द ड्रँगन इत्यादी. ह्या कलाकृती जरी आकाराने लहान असल्या, तरी रॅफेएलच्या स्वतंत्र व समर्थ प्रतिभाशक्तीची साक्ष देण्यास त्या पुरेशा आहेत. रॅफेएल व पेरूजीनो यांनी १५०० मध्ये एकत्ररीत्या काही चित्रनिर्मिती केल्याचे उल्लेख आढळतात परंतु आज ती चित्रे अस्तित्वात नाहीत. मात्र पेरूजीनोच्या काही खास चित्रवैशिष्ट्यांचा तरुण रॅफेएलच्या मनाp0 एक कायमचा ठसा उमटला. उदा., त्याच्या चित्रांतील आकृतिबंधांची समतोल मांडणी, निःस्तब्ध व विशाल निसर्गचित्राची पार्श्वभूमी इत्यादी. रॅफेएलची स्वाक्षरी व तारखेचा उल्लेख असणारी आद्य कलाकृती द मँरेज ऑफ द व्हर्जिन (१५०४) ही होय. सध्या हे चित्र मिलान येथे आहे. ह्या चित्रामुळे त्यास खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रातील मांडणीचे पेरूजीनोच्या सेंट पीटर रिसिव्हिंग द कीज ह्या चित्राशी साधर्म्य दिसून येते. तथापि मांडणीचा आराखडा जरी पेरूजीनोसदृश असला, तरी काही बाबतींत रॅफेएल सरस ठरतो. उदा., रॅफेएलच्या रंगलेपनातील सफाई व चित्रातील विविध आकृत्यांची सघनता अधिक लवचीक व आनंददायी आहे. रॅफेएल १५०४ मध्ये फ्लॉरेन्सला गेला. प्रबोधनाच्या उत्कर्षकाळात फ्लॉरेन्स हे कला व सांस्कृतिक दृष्ट्या खूप भरभराटीला आलेले केंद्र होते त्यामुळे साहजिकच रॅफेएल फ्लॉरेन्सकडे आकृष्ट झाला. फ्लॉरेन्समधील त्याच्या वास्तव्याचा १५०४ ते १५०९ हा कालखंड त्याच्या पुढील कलाजीवनाचा पाया मजबूत करण्यास साहाय्यभूत ठरला. तेथील वास्तव्यात त्याने लिओनार्दो दा व्हिंची व मायकेलअँजेलो ह्या श्रेष्ठ समकालीनांच्या कलाकृतींच्या मूळ रेखाटनांचा चित्रमांडणीच्या तंत्र-संदर्भात कसून अभ्यास केला. ह्या कालावधीत त्याने ‘मँडोना’ ची (कुमारी माता मेरी व बालक ख्रिस्त) अनेक उत्तमोत्तम चित्रे निर्माण केली. मँडोना हा त्याचा अत्यंत आवडता विषय होता. रॅफेएलच्या मॅडोना ह्या स्त्रीसुलभ नाजुकता व लवचीकपणा घेऊन चित्रफलकावर अवतरतात. रॅफेएलच्या मॅडोनांनी स्वतःचे दैवीपण दूर सारले आणि भौतिक जगाशी नाते व जवळीक साधली, असे म्हणता येईल. त्याच्या मॅडोना-चित्रांत मॅडोना डेल ग्रँड्युका (सु. १५०५ पहा : मराठी विश्वकोश : खंड २ चित्रपत्र ४३) मॅडोना ऑफ द गोल्ड फिंच (१५०७) ला बेल्ले जार्दिन्येर (१५०७) टेम्पी मॅडोना (१५०८) द सिस्टाइन मॅडोना (१५१५) मॅडोना देल प्रातो (१५०६) इ. विशेष उल्लेखनीय आहेत. त्याने १५०८ मध्ये कॉपर मॅडोना ही कलाकृती निर्माण केली व फ्लॉरेन्स सोडले. दुसरा पोप जूल्यस ह्याच्या १५०८ मधील निमंत्रणावरून रॅफेएल रोमला गेला. जानेवारी १५०९ मध्ये त्याने दुसरा पोप जूल्यस ह्याच्यासाठी काम सुरू केल्याचे उल्लेख सापडतात. आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याचे वास्तव्य रोममध्येच होते. रोम येथील जुनी ‘व्हॅटिकन’ दालने सुशोभित करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले. सर्वप्रथम त्याने ‘स्तांझा देल्ला सिन्यातुरा’ (१५०९−११) हे दालन चित्रित करावयास घेतले. ह्या ठिकाणी त्याच्या चार सुप्रसिद्ध कलाकृती आहेत : स्कूल ऑफ अथेन्स, डिस्प्युटा, पार्नासस आणि ज्यूरीस्पूडन्स. ह्यातील स्कूल ऑफ अथेन्स हे चित्र सर्वाधिक प्रसिद्ध, श्रेष्ठ दर्जाचे व उठावदार आहे. (पहा : मराठी विश्वकोश : खंड १२ चित्रपत्र ४६). या चित्राचा विषय तसा नवा नाही परंतु ज्या कल्पकतेने हा विषय येथे मांडला गेला आहे, त्यास कलेतिहासात दुसरी जोड नाही. अवकाशाचा व चित्रमांडणीच्या अभिजात मूल्यांचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे चित्र ओळखले जाते. तत्त्वज्ञान व विज्ञान हे मुख्य सूत्र घेऊन, रूपकात्मक पद्धतीने, एका कमानीखाली भव्य अशा रोमनकालीन दालनांची प्रचिती आणून देणाऱ्या वास्तूत तत्त्वचिंतक, कवी, गणिती, संगीतज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, व्याकरणकार इत्यादींचा जणू मेळावाच भरलेला आहे, असे दर्शविणाऱ्या अत्यंत यशस्वी प्रयत्न ह्या चित्रात दिसतो.
रॅफेएलने व्यक्तिचित्रणकलेस उच्चतम दर्जा प्राप्त करून दिला व त्या प्रकाराची व्याप्ती वाढवली. व्यक्तिचित्रांचे अनेक नवीन प्रकार त्याने निर्माण केले. चित्रविषय असलेल्या व्यक्तीसाठी त्याने वेगवेगळ्या मानसिक अवस्था कल्पून व्यक्तिचित्रे रंगविली. दुसऱ्या जूल्यसचे बैठ्या स्थितीतील व्यक्तिचित्र (१५११) हे सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्याच्या चित्रांमध्ये वैश्विकता हा प्रधान गुण आढळतो.
रॅफेएल हा १५१४ ते १५२० च्या दरम्यान इटलीतील सर्वांत प्रमुख व्यावसायिक वास्तुशिल्पी होता. वास्तुशिल्पज्ञ ब्रामांतेच्या मृत्यूनंतर सेंट पीटरच्या नव्या प्रार्थनागृहाच्या बांधकामाचे नियंत्रण ‘शिगी चॅपेल’ (सु. १५१३-१४ स्ता मारिया देल पोपोलो, रोम) ‘सान्त एलिजियो देग्ली ऑरेफिसी’ (सु. १५१६, रोम) ‘द व्हिला मादामा’ (१५१६, रोम) तसेच रोम व फ्लॉरेन्स येथील प्रासादसमूह ही त्याची महत्त्वाची वास्तुनिर्मिती होय.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे १५१५ ते १५१६ या काळात सिस्टाइन चॅपेलची सजावट पूर्ण करण्यासाठी रॅफेएल चित्रजवनिकांच्या मालिकेसाठी आरेखने करीत होता. त्यांतील दहा चित्रजवनिका अद्यापही अस्तित्वात आहेत. त्यांत सेंट पीटर व सेंट पॉल ह्यांच्या कथा चित्रित केल्या आहेत. सात मूळ आकृतिबंधांचे नमुने आजही पहावयास मिळतात. ते अभिजात मांडणीचे उत्कृष्ट नमुने मानले जातात. रोम येथे त्याचे निधन झाले. (चित्रपत्र १७).

संदर्भ : Cocke, Richard Vecchi, Pierluigi de, The Complete Paintings of Raphael, London,
1969.



लिओनार्दो द व्हिंची

लिओनार्दो_दी_सेर_पिएरो_दा_विंची यांचा जन्मदिन.
जन्म. १५ एप्रिल १४५२ आंकियानो, फ्लॉरेन्स, इटली येथे.
लिओनार्दो हे १५ व्या शतकात रेनेसान्स काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होते. कलेच्या इतिहासात त्यानी संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्डो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राउन या लेखकाने नुकतीच दा व्हिंची कोड या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली. लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला , शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला. चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात. लिओनार्दो दी सेर पिएरो दा विंची यांचे निधन २ मे १५१९ रोजी झाले.



मायकेल एंजेलो

मायकल ॲन्जेलो (मार्च ६, इ.स. १४७५ – फेब्रुवारी १८, इ.स. १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. लिओनार्दो द व्हींची, राफाएल इटालियन रेनिसांस मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकल ॲन्जेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएता व डेव्हिड ह्या रानिसांमधील मोठ्या कलाकृती मानल्या जातात.वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी मायकेल दाखल झाला. त्याने डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यांत विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढ्य आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मायकेलचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींची निर्मिती करण्यासाठी बोलावले.त्या काळात अप्रतिम शिल्पाकृती निर्माण झाली.
१४८९ ते १४९२ या काळात लॉरेन्झचा वरदहस्त लाभल्यामुळे मिकेलेंजेलोचा संबंध तत्कालीन विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. बॅटल ऑफ लॅपीत्झ हे मिकेलेंजेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प होय. त्यानंतरच्या आयुष्यात मायकेलने असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापैकी व्हॅटिकनमधील पिएता, डेव्हिड, टुम्ब ऑफ लॉरेन्झो दि मेदिची, डे अँड नाइट, डस्क ऑफ डॉन ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. याच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे. प्रमाण बद्धतेच्चा आदर्श त्याने निर्माण केला आहे.
१५३४ साली मिकेलेंजेलो रोमला आला. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे तिसऱ्या पोप पॉलच्या आग्रहाखातर मिकेलेंजेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी मायकेलेने आधी लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथेड्रलचा अभ्यास केला. सेंट पीटर्स चर्चमधील सिस्टीन चॅपेलच्या छतावरील चित्रकृतींसाठी मिकेलेंजेलो प्रसिद्ध आहे. या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मायकेलने ३०० मानवाकृती रंगविलेल्या आहेत.या छताशिवाय मायकेलच्या द लास्ट जजमेंट, क्रुसिफिकेशन ऑफ सेंट पीटर्स आणि कन्व्हर्शन ऑफ सेंट पॉल या चित्रकृती प्रसिद्ध आहेत.



गणपती स्तोत्र

गणपतीस्तोत्र

जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।

तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।
विष्णु शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥

तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।
सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥

मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।
देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥

माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे ।
संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥

तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय ।
तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती ॥

गजवदना श्री लंबोदरा, सिध्दीविनायका भालचंद्रा
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥

भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥

विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥

नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता ।
नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥

नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥

मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण ।
लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥

मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक ।
भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥

मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।
अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥

हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन ।
विद्यासिध्दीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥

त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात ।
स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥

होईल सिध्दी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥

इती श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्।
श्री गजाननार्पणमस्तु।



मारुती स्तोत्र

मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 3

श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥

ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥

त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥

मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥

आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥

आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥

॥ श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम्॥



मारुती स्तोत्र

मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 2

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥

वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥

स्थिितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥

सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥

धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥

वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥

धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥

देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥

गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥

अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥

देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥

कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥

माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥

केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥

चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥

स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥

पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥

दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥

विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥

सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥

संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्‍यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥

पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥

परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥



मारुती स्तोत्र

श्री समर्थ रामदास स्वामिकृत :- मारुती स्तोत्रें : - अनुष्टुप छंद

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥

वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥

स्थिितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥

सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥

धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥

वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥

धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥

देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥

गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥

अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥

देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥

कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥

माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥

केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥

चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥

स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥

पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥

दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥

विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥

सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥

संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्‍यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥

पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥

परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥



अंतरीची बुद्धी खोटी

काय सर्प खातो अन्न |काय ध्यान बकाचे ||१||
अंतरीची बुद्धी खोटी | भरलेपोटी वाईट||ध्रु||
काय उंदीर नाही धावी |राख लावी गाढव||२||
तुका म्हणेसुसर जळी |काऊळी का न न्हाती||३||



अर्थ:……
अंतरीची बुद्धी खोटी आहे तो पर्यंत बाह्य साधने निष्फळ आहेत .सर्प वायूभक्षण करून रहातो,बग़ळा
ध्यानस्थ दिसतो , उंदीर बिळात रहातो,गाढव राखेत लोळतो , सूसर जलाशयात विहार करतो व कावळा
पुष्कळ बुचकळ्या मारतो ,त्यांना कोणी साधू म्हणत नाही,वायूभक्षण ,ध्यान , एकांत
वास , विभूती चर्चन , जलात अनुष्ठान किंवा स्नान ही ईश्वर प्राप्तीची साधने नाही असे नाही , ही कर्म
करूनही बुद्धितले दोष गेले नाहीत हे आचरून व्यर्थ आहे.



अथ करन्यास:

अथ करन्यास:
ॐअस्य श्री मद्भगवद्गीतामालामन्त्रस्य भगवान् वेदव्यास ऋषी:।अनुष्टुप् छन्द:।श्रीकृष्ण परमात्मा देवता।अशोच्यानन्वशोचस्वं प्रज्ञावादांश्च भाषसे इति बीजम।।सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज इति शक्ति
:।।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्क्षयिष्यामि मा शुच इति कीलम्।।नैनं छिन्दन्ति शस्राणि नैन दहति पावक इत्यन्गुष्ठांभ्यां नम:।।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारूत इति तर्जनीभयां नम:।।अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च इति मध्यमाभ्यां नमः।।नित्य:सर्वगत:स्थाणुरचलोऽयं सनातन इत्यनामिकाभयां नम:।।पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रश इति कनिष्ठिकाभयां नम:।।नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च इति करतलकरपृष्ठाभ्यां नम:।।इति करन्यास:।।



शंकराचार्यांचे चरित्र्य व कार्य

शंकराचर्यांचे चरित्र्य व कार्य
शिवलीलामृत
अध्याय १५ वा
कवी म्हणतो ,कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यावर जनकल्याणार्थ वेद ,शास्रे व पुराणे यांची निर्मिती झाली .कालांतराने कलीप्रभावामुळे शृती,स्मृती पुराणे यांना कोणी विचारीनासें झाले .याला मंडणमिस्र अय्या सारखा सनातन धर्माविरुद्धचा अपप्रचारही कारणीभूत ठरला.या जैन साधुला शारदा प्रसन्न होती .तो अभ्यासू ,उत्तम वक्ता व वादविवाद पट्टू असल्याने त्या काळच्या विद्वानांनाही त्याचा धाक वाटत होता .त्याने नवीन शास्रांची रचना करुन वेदोक्त मार्ग अधर्माचा असून आपला मार्गच उत्तम असल्याचे सांगीतले .त्यामुळे पुराणोक्त पंथ व धर्म शास्रे मागे पडु लागली .लोक त्याच्या मता प्रमाणे वागू लागले . म्हणून त्याच्या प्रभावाला निष्प्रभ करुन लोकांना सन्मार्गी करण्या साठी भगवान शंकरानी ब्राम्हण कुळात शंकर या नावाने अवतार घेतला .मुंज झाल्यावर सर्व विद्याभ्यास पूर्ण करुन त्यांनी सन्यास दीक्षा घेतली .शंकराचार्य झाल्यावर सर्वत्र संचार करुन लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली .जैनग्रामी आल्यावर त्यांनी मंडनमिस्रला वादविवादासाठी बोलाऊन त्याला पराभव झालेल्याने स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुड़ऊन दूसऱ्याची शास्रे शिकावी अशी घातली.
वादविवादास आरंभ होण्यापूर्वी मंडनमिस्र ने पडद्याआड़ मद्याच्या घटात सरस्वतीची स्थापना करुन ठेवली .प्रतिज्ञा करुन दोघेही वादविवादास बसले तेव्हा शंकराचार्याच्या आव्हानानुसार त्याने चारही वेद क्रमाने म्हटले .त्या नंतर शंकराचार्यानी क्रम बदलून पूर्वीच्या वेदातील ऋचा म्हणून त्यांचा अर्थ सांगण्यास सांगीतले ,पण ते त्याला जमले नाहीं .यावरून शारदा प्रसन्न असल्यानेच हा वेदपठण करतो हे त्यांच्या लक्षात आले .त्या वेळी सरस्वतीचे कपट ओळखून त्यांनी जैन शास्रे स्थापण्यास तीच कारणीभूत झाली.म्हणून तिला शाप दिला .तेव्हा तिनेही शंकराचार्यांना शाप दिला.
त्या नंतर स्वतःचा पराभव मान्य करुन मंडनमिस्र त्यांना शरण गेला .तेव्हा आचार्यांनी जैन शास्राची गाठोडी बांधुन समुद्रात टाकली त्यानंतर लोकांना पूर्वी प्रमाणे स्वधर्माचारण करा . असे सांगीतले .त्या प्रमाणे लोक त्यांच्या आदेशाला उपदेशाला अनुसरुन वागू लागले .सनातन धर्मानुगामी झाले .अशा प्रकारे शंकाराचार्यांनी जैनांच्या पाखंडी मतांचा उध्वस्त करुन धर्माची पुनस्थापना केली .



शबरी पार्वती व श्रियाळाची कथा

शबरी पार्वती व श्रियाळाची कथा
शिवलीलामृत
अध्याय १४ वा

सूत म्हणाले ,सज्जनहो !
एके दिवशी शिव पार्वती कैलासावर सारीपाट खेळत असताना नारदांचे आगमन झाले .त्यांनी त्या दोघांना पण लवून खेळण्यास सांगीतले .ते मान्य क़रून ती दोघ खेळू लागली .त्या वेळी पार्वतीचीच सरशी होत गेली .आणि शंकरांना आपले व्याघ्रांबर,गजचर्म,आयुधे ,भूषणे व कौपीनही गमवावी लागली .भगवान शंकर दिगम्बर झाले .त्या वेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले ‘,देवा हे काय ? एका स्री ने तुम्हाला हरवले? तुमचा महिमा फ़ुकट आहे .आता भक्तांना काय सांगाल ?’ते ऐकून रूसलेले भगवान शंकर लपून बसले .कोणालाही त्यांचा ठाव ठिकाना लागेना .पार्वतीने क़सून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयात एकांतात स्वानन्दसुखांत रममाण झाले होते .पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात त्यांच्या जवळ जाऊन नृत्य गायन केले . नेत्रकटाक्षांनी त्यांना घायाळ केले .तेव्हा त्यांनी तिला विवाह विषयी विचारले असता तिने पर्वतीचा विषय काढला .त्यावर त्यांनी ,’मला तीचे तोंडही पहायचे नाहीं .असे सांगीतले तेव्हा ,’विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठया खुबीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे स्वरूप प्रगट केले . त्यावेळी तीचे प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतले .
पूढील कथा सांगताना सूत म्हणाले ,नारदा कड़ून कांतीनगराचा राजा श्रियाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी वेष बदलून त्याच्या द्वारी गेले व म्हणाले ,इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो .त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य श्रियाळ व त्याची पत्नी चांगुणा यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली . ते म्हणाले , मला नरमांसाचे भोजन हवें आहे व तेही तुमच्या चिलया बाळाचे .ते शिजवताना तुम्हीं रडाल तर मी निघून जाईन . ते ऐकून ती दोघे बधिर झाली ,पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करुन त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले ,तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाहीं असे म्हणून अतिथीने चांगूणेला बाळाला हाक मारण्यास सांगीतले .तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी मायारूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रियाळ व चांगुना यांस दिव्य विमानातून शिवलोकी नेले.



दक्षाची कथा व कार्तिकस्वामीचे जन्मवृत्त

दक्षाचीकथा व कर्तीकस्वामींचे जन्मवृत्त
शिवलीलामृत
अध्याय 13 वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
प्रजापती दक्ष हा भगवान शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करी.त्यांना हविर्भाग ही देत नसें .त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले त्यावेळी आमंत्रण नसतानाही देवी भवानी माहेरी यज्ञाला गेली .तेथे सर्वांनी तीची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञ कुंडात उड़ी घेतली व आत्मसमर्पण केले .या वृत्ताचे संतापलेल्या भगवान शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले .त्याने दक्षयज्ञाचा विध्वंस केला व दक्षाचे मस्तक धडावेगळे केले.तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करुन त्याला शांत केले आणि बोकडाचे मस्तक दक्षाच्या धड़ाला लावले .त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकरांच्या कड़क व्रत करू लागली .
तारकासूराच्या पूत्र तारकाक्ष ,विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढ़ाई केली . पण मदनाला बोलाऊन शंकरांचा तपोभंग करून त्यांचे उमेशी ऐक्य करण्यास सांगीतले . त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच भगवान शंकरांनी तृतीय नेत्र उघड़ून त्याला भस्म केले .त्यानंतर सप्तर्षींच्या सांगण्यावरुन शंकर बटुवेषात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करु लागले .तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रगट केले .त्या नंतर एका समुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले .पुढ़े त्यांना पुत्र होत नाहीं म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठवले .पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले .ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला .तो त्याने गंगातीरावर बसलेल्या सहा ऋषीपत्नींच्या उदरात घातला ,पण त्यांनीही तो गर्भ काढ़ून गंगेत टाकला .त्यानंतर ते सहाही भाग एकत्र होऊन सहा तोंडांचा व बारा हातांचा मुलगा जन्मास आला .तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले .त्याचे ‘कार्तिकस्वामी’ नाव ठेवले याच शिवपुत्राने पुढ़े तारकासुराचा वध केला .



बहुलेची व भस्मासुराची कथा

बहुलेची व भस्मासुराची कथा
शिवलीलामृत
अध्याय १२ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
दक्षिणेकडील अमंगल गाव नावाप्रमाणे अमंगल होते .तेथे राहनाणारे विदुर व बहुला हे ब्राम्हण दांपत्यही व्यभिचारी होते .विदुराच्या मृत्यु नंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच योनीत टाकले.विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहानभुकेने व्याकूळ होऊन तो पिशाच्य रूपाने भटक़ू लागला .विधवा बहुलेला एक मूलगा झाला .पण तो कुणाचा आहे हे तिला माहीत नव्हते.एकदा तो गोकर्ण क्षेत्री गेली असता पूराण ऐकण्यास बसली असताना .पुराणिकबुवांनी व्याभिचारी स्रीयांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली तिने बुवांची भेंट घेऊन त्यांना आपल्या पापकृत्यांची कथा सांगिताली व त्यांच्या चरणावर डोके ठेऊन यातून सोडवा असे विनविले .बुवांनी तिला ॐ नम: शिवाय या मंत्राचा उपदेश केला व शिवलीला ऐकविल्या.त्या त्या मुळे ती शिवभक्ती करु लागली .भक्तीने पवित्र झाली .शंकरांनी तिला शिवलोकी नेले .तिथे तिने उमामहेश्वराची स्तुती केली .त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगीतले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली .त्या नंतर पार्वतीच्या सांगण्यावरुन भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला .
सूत पुढ़े म्हणाले ,एकदा प्रदोष काळी अंगाला भस्म लावत असताना भगवान शंकरांना त्यात एक खड़ा सापडला . त्या पासून जो असूर उत्पन्न झाला त्यांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले.त्याला नित्य नवें चिता भस्म आणून देण्यास सांगीतले .ते आणण्यासाठी त्याला खूप पायापीट करावी लागे म्हणून शंकरांकडे ‘मी ज्याच्या दोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे’ असा वर मागीतला .सर्व देवतांनी त्याला विरोध केला परंतु भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हाणून भगवान शंकारानी कोणाचे न ऐकता तो वर भस्मासूराला दिला .त्यामुळे तो राक्षस उन्मत्त झाला .सम्पूर्ण त्रिभूवनावर राज्य करण्याचे मानसूबे रचू लागला .त्याने पृथ्वीवर थैमान घातले. त्यावेळी प्रजाजनांनी विष्णुकड़े धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले .तेव्हा भस्मासूर तेथे आला .व भगवान शंकराच्या मस्तकावर हात ठेवन्यास धावला .तेव्हा शंकरानी तेथून पळ काढला.त्यावेळी विष्णूने मोहीनी रूप घेतले.आणि भस्मासूराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वत: समवेत नृत्य करावयास लावले .ते नृत्य करताना भस्मासूराने आपला हात डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले.



महानंदा ,सुधर्मा व तारक यांची कथा

महानंदा ,सुधर्म व तारक यांची कथा
शिवलीलामृत
अध्याय ११ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
कश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एक मेकांचे मित्र व शिवभक्त होते .त्यांना अंगाला राख फ़ासून ,रुद्राक्ष माळा घालूनएकांतात शिवस्मरण करायला आवड़ायचे .त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे .एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीला आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगिताली .तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करुन पराशर म्हणाले ,पूर्वी नंदी ग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे .तिने एक कोंबड़ा व माकड पाळले होते .ती त्यांना रुद्राक्षमाळा
घालून व भस्म लाऊन नृत्य करायला शिकवित असे .त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे.त्यांना पुराण श्रवणाचा लाभ होत असे .अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घड़त होते .
एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदाग़राच्या वेशात तिच्या घरी गेले .तिने त्यांचे स्वागत केले .मी तीन दिवस तुमचीच आहे ,असे सांगीतले ,तेव्हा सौदागराने आपल्या कडील दिव्य लिंग तिच्याकड़े दिले व म्हणाले ,हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे ते ज़पून ठेव .ते जळले वा भंगले तर मी अग्नीप्रवेश करीन .महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले.त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली.असता नृत्यशाळेस आग लागली व ते लिंग भस्मसात झाले.महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली.त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करुन आपली जीवनयात्रा संपवली .त्या वेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करुन पेटत्या चितेत उड़ी घेतली.तेव्हा शंकरांनी तिला वरचे वर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले.महानंदेकडील कोंबड़ा माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत . पण हे राजा !तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून सातव्या दिवशी मरणार आहे . हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संतत धार धरुन रूद्राध्ययाची पारायणे कर .राजा मनोमन घाबरला होता . त री ही त्याने ऋषिनी संगीतल्या प्रमाणे सर्व काही धर्याने केले.सातव्या दिवशी मृत्यु घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून ख़ाली पडला तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपून त्याला शुद्धीवर आणले.भान येताच त्याने शिवदूतानी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला .तेव्हा नारदांनी ही तेथे प्रगट होऊन त्याला दूजोरा दिला.मग भद्रसेनाने आनंदोत्सव करुन नारद व पराशरांचा सन्मान केला .आणि सुधर्म्याला गादीवर बसऊन प्रधाना सहीत तपासासाठी वनात गेला .शंकराने त्यांना ही निजकृपेने आपल्यात विलीन करुन घेतले .



शारदेची कथा

शारदेची कथा
शिवलीलामृत
अध्याय १०वा
सूत म्हणाले सज्जनहो !
अनर्त देशातील देवरथ नामक ब्राम्हणास शारदा नावाची कन्या होती .त्याने तिचा बाराव्या वर्षीच विवाह करून दिला.लग्नानंतर काही दिवस जावयास आपल्याकडेच ठेवून घेतले.एकदा शारदेचा पती स्नानसंध्या करून नदीवरून परतत असताना विषारी साप चावला व तो मरण पावला .त्यावेळी देवरथाने मोठया धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तर कार्य केले .
कलांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैध्रुव नामक एक अंध ऋषी देवरथाकड़े आले .शारदेने त्यांचा आदर सत्कार केला .त्याना संतुष्ट केले .तेव्हा त्यांनी तिला ,तुझे सौभाग्य वाढ़ून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला .त्यावर ख़िन्नपणे हसून तिने ऋशीना आपली कर्मकथा सांगीतली.तेव्हा नैध्रुव म्हणाले ,मी माझे शब्द खरे करुन दाखवीन .तू निश्चित रहा .ही गोष्ट तिच्या माता पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली .परंतू नैधृवांनी त्यांचे समाधान केले .
त्यानंतर देवरथाकड़े राहून नैधृवांनी शारदेला ॐ नम: शिवाय ।या मंत्राचा जप करायला सांगीतला शारदेकड़ून उमामहेश्वराचे व्रत करवून घे ऊन त्याचे उद्यापनही केले .असे एक वर्ष सरले .एका रात्री नैध्रूव आणि शारदा उमामहेश्वराचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले.तेव्हा नैधृवांनी तीची स्तुती केली व माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली .तेव्हा देवीने शारदेचे पूर्व जन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले हिचा पूर्व जन्मीचा पती द्रविड़ देशात असून अजुनही हिच्यासाठी तळमळतो आहे.तो हिला स्वप्नात भोग देईल त्यापासून हिला होणारा पुत्र शारदा नंदन म्हणून विख्यात होईल.असे बोलून देवी गुप्त झाली.
पुढे देवीच्या वचना नूसार शारदा गर्भवती झाली तेव्हा लोकांनी तिचा छळ केला .तेव्हा शारदा निर्दोष असून तीची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पड़तील अशी आकाश वाणी झाली एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली .पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदा नंदन ठेवण्यात आले .पुढे दैव योगाने शारदेची व द्रविड़ देशातील तिच्या पूर्व जन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिवरात्रीस भेंट झाली .पती पत्नी व पुत्र यांचे मीलन झाले कालांतराने पतिनिधना नंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलास लोकी गेली .



भस्ममहिमा

. भस्ममहिमा
शिवलीलामृत
अध्याय ९ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो ! या अध्यायात आपण भस्माचा महिमा पहाणार आहोत.ते कसे पाहु ,
वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाचा वनसंचार करीत असे .एकेदिवशी भुकेने कासाविस झालेल्या एका ब्रम्हराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोड़ेसे भस्म त्याच्याही अंगाला लागतें .त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला त्याला त्याचे पूर्वीचे जन्म आठऊ लागले.तो ज्ञानी झाला .त्यानी मुंनींचे दर्शन घेतले.तो म्हणाला,गुरुदेव ,तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे.आणि आता तुमच्या समोर माझे मनोगत सांगीतले तर मी शिवपदास प्राप्त होईन.मग त्या ब्रम्ह राक्षसाने वामदेवाला सांगीतले .स्वतःच्या दुष्कृत्याबद्दल त्याला कोणत्या नरक़यातना भोगाव्या लागल्या,कोणकोणत्या जीवकोटित जन्म घ्यावा लागला ते यामलोकि न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगीतले सिवप्रणित भस्ममहात्म्यही सांगीतले .भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रम्हराक्षसाला कैलासात स्थान मिळाले.
पूढील कथा सांगताना सूत म्हणाले ,-पांचाळ नरेश सिहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्याच्या समवेत होते .त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात ख़ाली पडलेले एक शिवलिंग दिसते.त्याने त्या राजा ला दाख़वले ,तो भिल्लाला म्हणाला ,हे घरी नेऊन याची नित्य पूजा कर .चिता भस्मा शिवाय याची पूजा करु नको.त्या प्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले.व तो त्याची पूजा करू लागला .एके दिवशी खूप हिन्डूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही.म्हणून तो चिंताग्रस्त झाला.तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले.त्या त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयी प्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली ,तर काय अश्चर्य ! दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेंऊन आली .पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहुन त्याला मोठे आश्चर्य वाटले.शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला . हे वृत्त कळताच सिंहकेत ही शिवभक्ती करु लागला आणि अंती शिवपदास पोचला .



भद्रायूचीं कथा

भद्रायूची ची कथा
अध्याय ८ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
भद्रायु बारा वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला . त्याचे आनंदाने स्वागत केले .त्यावेळी त्याने भद्रायुला न्याय नीति ,शास्राबरोबर शिवार्चन व शिवभक्तीही शिकविली,एक दिव्य शंख व खड्ग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला.पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोग्याने दिलेली आयुधे यांच्या साहाय्याने भद्रायूने आपला पिता ,वज्रबाहुस त्याचा शत्रु हेमरथ याच्या तावड़ीतून सोडवले.
काही दिवसानी त्या शिवयोग्याने चित्रांगद व सिमन्तीनीची भेंट घेंऊन ,तुमची कन्या कीर्तीमालीनीभद्रयूला दया असे सूचविले त्यास मान्यता देंऊन त्यांनी विवाहाची तयारी केली .सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह आले .निमंत्रितामध्ये वज़रबाहुही होता .त्याला भद्रायु आपलाच पुत्र आहे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला .भद्रायु व कीर्तीमालीनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहु आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेली .
एकदा भद्रायु पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राम्हण जोड़पे धावताना दिसले.एक वाघ त्यांच्या मागे लागला होता .भद्रायुला पाहुन ब्राम्हण त्याच्या पाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर .असे म्हणाला .भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला ,पण तो त्या ब्राम्हण स्रीला वाचवू शकला नाहीं .त्यामुळे तो त्याला दूषणे देऊ लागला .त्या घटनेने व्यथीत झालेल्या भद्रायूने त्याच्या शोकपरिहारार्थ त्याचे लग्न लाऊन राज्य देण्याची तयारी दर्शवली ,पण त्याचे दुःख कमी होईना .शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तीमालीनीचे संकल्पपूर्वक दान केले .तेव्हा कुठे तो शांत झाला.त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली. तेव्हा शिवपर्वतीने तेथे प्रगट होऊन त्याला ह्रदयाशी धरले आणि इष्ट वर मागण्यास सांगीतले .तेव्हा त्याने ब्राम्हणाची पत्नी आणून द्या ,अशी विनंती केली असता ती उभयता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्ही ती लीला केली होती .असे सांगीतले त्यानंतर कीर्तिमालिनीला त्याच्या हवाली करुन चित्रांगद ,सीमन्तीनी ,वज्रबाहु,सुमती,पद्माकर ,यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षय पद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले .भद्रायुने न्याय ,नीति ,धर्माने राज्य केले व अंती पत्नीसह शिवलोकी गेला .



सोमवंत आणि सुमतीची कथा

सोमवंत आणि सुमतीची कथा
अध्याय ७ वा************
सूत म्हणाले ,सज्जनहो ,! विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राम्हण रहात होते.त्यांचे पुत्र समेधा व सोमवंत हे ही मित्र होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वड़िलांनीत्यांना राजाकड़े पाठविले .त्यांची विद्वत्ता पाहुन राजा म्हणाला,नैषध राजा चित्रांगद व त्याची पत्नी सीमन्तीनी शिवव्रत दिनी दांपत्य पूजन करते म्हणूनतिच्याकड़े जावे .ती तुमची पूजा करुन तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मी ही अपार द्रव्य देईल.मग त्याने सोमवंताला स्री वेष देंऊन सुमेधा सह सीमंतीनीकड़े पाठविले.तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले.परंतु शिवपार्वती समजून त्यांची पूजा केली .व भोजन ,द्रव्य , वस्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला . मार्गामध्ये सोमवंताला आपण स्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकड़े रतीसुखाची मागणी करू लागला .सुमेधाने त्याची कानउघाड़णी करुन त्याला घरी नेले .तेथे आपला मूलगा स्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्या विषयी राजाला जाब विचारला .तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्रीच राहणार असे सांगुन त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यात आले
सूत दूसरी कथा सांगू लागले -आवंती नगरामध्ये मदन नावाचा व्याभीचारी ब्राम्हण पिंगला व्येश्येकड़े नेहमी जात असे.एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सीमन्तीनीची कन्या (किर्तीमालिनी)झाली तर मदनाने वज्रबाहु राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला .गरोदर पणी तिच्या सवतीनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या माय लेकरांच्या अंगावर भयंकर फोड़ उठले.उपचारानी ही उपयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले.त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीत आली .तेथीलपद्माकर। राज़ाला भेटून तिने आपली कर्म कहाणी सांगितली .राजाने तिच्या रहाण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली .पुढ़े एका व्याधीने तिचा मुलगा वारला .तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले .त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला.ती दोघे निरोगी व सुंदर झाली .शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायु नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला .



सोमवंत आणि सुमतीची कथा

सोमवंत आणि सुमतीची कथा
अध्याय ७ वा************
सूत म्हणाले ,सज्जनहो ,! विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राम्हण रहात होते.त्यांचे पुत्र समेधा व सोमवंत हे ही मित्र होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वड़िलांनीत्यांना राजाकड़े पाठविले .त्यांची विद्वत्ता पाहुन राजा म्हणाला,नैषध राजा चित्रांगद व त्याची पत्नी सीमन्तीनी शिवव्रत दिनी दांपत्य पूजन करते म्हणूनतिच्याकड़े जावे .ती तुमची पूजा करुन तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मी ही अपार द्रव्य देईल.मग त्याने सोमवंताला स्री वेष देंऊन सुमेधा सह सीमंतीनीकड़े पाठविले.तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले.परंतु शिवपार्वती समजून त्यांची पूजा केली .व भोजन ,द्रव्य , वस्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला . मार्गामध्ये सोमवंताला आपण स्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकड़े रतीसुखाची मागणी करू लागला .सुमेधाने त्याची कानउघाड़णी करुन त्याला घरी नेले .तेथे आपला मूलगा स्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्या विषयी राजाला जाब विचारला .तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्रीच राहणार असे सांगुन त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यात आले
सूत दूसरी कथा सांगू लागले -आवंती नगरामध्ये मदन नावाचा व्याभीचारी ब्राम्हण पिंगला व्येश्येकड़े नेहमी जात असे.एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सीमन्तीनीची कन्या (किर्तीमालिनी)झाली तर मदनाने वज्रबाहु राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला .गरोदर पणी तिच्या सवतीनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या माय लेकरांच्या अंगावर भयंकर फोड़ उठले.उपचारानी ही उपयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले.त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीत आली .तेथीलपद्माकर। राज़ाला भेटून तिने आपली कर्म कहाणी सांगितली .राजाने तिच्या रहाण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली .पुढ़े एका व्याधीने तिचा मुलगा वारला .तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले .त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला.ती दोघे निरोगी व सुंदर झाली .शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायु नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला .



सीमंतिनीची कथा

शिवलीलामृत
अध्याय ६. वा
सूत म्हणाले , सज्जन हो ! पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती.जन्म पत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्य सौख्य भोगणार होती. पण तीच पत्रिका तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याचे ही सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करु लागला . तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून यज्ञावलक्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्या वरून सीमंतिनी मोठया श्रध्देने सोमवारचे शिवव्रत करू लागली.
ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैशध देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला.त्या वेळीं दसरा दिवाळी चे निमित्त करुन चित्रवरम्याने आपली मुलगी व जावई यांना अपल्या पाशीच ठेऊन घेतले. त्यांची हौस मौज पुरवली. एकदा चित्रांगद यामुनेत नौका विहार करीत असताना. नौका बुडून तो त्या अथांग जलाशया मध्ये दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनी वर जणू आभाळच कोसळले . त्या परिस्थितीचा फायदा घेउन शत्रूंनी नैशध देशावर चढाई करुन इंद्रसेन राजाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले. याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले. तरीही सीमंतिनी ने आपले सोमवारचे शिव व्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेंव्हा तेथें क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्या नी त्याला पाताळात नेले . येथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करुन त्याला काही दिवस आपल्या पाशीच ठेऊन घेतले . पुढें चित्रांगदा ने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला बारा सहस्र नागांचे बळ . अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीला येईन असे वचन देऊन यमुना तिरी आणून सोडल . त्यावेळीं सीमंतिनी स्नानासाठी आली होती . तिने त्याला पाहिले . पण ओळखले नाही . त्याने तिला ओळखले . तिची चौकशी केली. व तुझा पती जिवंत असुन तिसऱ्या दिवशी तुमची भेट घडवून आणील. असे सांगून तो नैशद नगरीस गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या मतपित्यासह सीमंतिनी स भेटला .त्या वेळीं चित्र वर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला .चित्रांगद ने आपल्या नगरीत अनेक वर्षे राज्य केले. सीमंतिनी च्या शिव व्राता च्या प्रभावाने त्यांचें सर्वतोपरी कल्याण झाले.



राजा धर्मगुप्त ची कथा

शिवलीलामृत
अध्याय ५ वा

धर्मागुप्ता ची कथा
अध्याय पाचवा
सूत म्हणाले सज्जन हो !फार पूर्वी शालव देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करुन राजा सत्यरथाचा वध केला. हे कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले . तेथें एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राम्हणीने ह्या अनाथ राजपुत्रा चां सांभाळ केला. त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले.आपला मुलगा सुचिव्रत याच्या बरोबर त्यालाही प्रमाने वाढविले. एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेलीं असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असून ही भिक्षा मागत आहे.
असे सांगीतले तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली. असता शांडिल्य म्हणाले याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयी शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला . याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सुड घेतला. धर्मागुप्ताने पूर्वजन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला.त्यानंतर सुचिव्राता विषयी सांगताना ते म्हणाले ,याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले ,पण त्याच्या कडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला तेव्हा उमा दोन्ही पुत्रासह त्यांना शांडिल्य ऋषींनी दोन्हीं बालकांना शिव मंत्राचा उपदेश करुन प्रदोष व्रत अचरण्यास सांगितले.
ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोष व्रत करीत असतां चारमहिन्याने शुचिव्रताला नदिकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहराचा हंडा सापडला आणि त्यांची दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्त शी विवाह करुन दिला . त्याला अपार धन व सेना दिली.त्या सैन्य बळावर शलवाला मारून धर्म गुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले होते. त्याने शांडिल्य ऋषीचा मोठा सन्मान केला.अनेक वर्षे राज्य करुन त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविलेआणि दिव्य विमानात बसून तो अंशुमती सह शिवलोकी गेला.



राजा कल्माषपाद :

राजा कलमाषपाद :शिवलीलामृत

अध्याय तिसरा:
सूत म्हणाले ,”सज्जनहो ! पूर्वी इक्ष्वाकु वंशी मित्रासह राजा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला . मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले .म्हणून सूडाने पेटलेल्या त्याच्या( राक्षसाचाया )भावाने मनुष्य रूपात राजाची भेंट घेतली व त्याला आपले पाककला कौशल्य दाखवून त्याच्या राजवाडयात आचारी म्हनून नोकरी मिळवली .पुढे वसिष्ठ ऋषी राजाच्या भेटीला आले असताना त्याने भज्यामध्ये नरमांस शिज़वून भोजनास वाढ़ले .ही गोष्ट अंतरज्ञानी वशिष्टाना समजली त्यांनी संतापाने राजाला ‘तू निर्जन वनांतील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला .राजाने चौकशी साठी आचार्याला बोलावले ,परंतु तो तेथून पळाला होता .तेव्हा ऋशीनी विनाकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले,पण पट्टराणी मदयंती त्याला परावृत्त केले .राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले.त्यामुळे त्याचे पाय काळे पड़ून त्याला क़ल्माषपाद नाव पडले.सत्य प्रकार कळताच ऋषीनी त्याला तू बारा वर्षानी राक्षस योनीतून मुक्त होशील ,असा उशाप दिला . ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माषपाद भुकेने कासाविस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राम्हणास ख़ाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने (ब्राम्हणीने)त्याला ,तू शाप मुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होशील त्या वेळी मरण पावशील .असा शाप दिला .त्या नंतर ती सती गेली .शापमुक्त झालेला कल्माषपाद घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्रियांना सांगीतली.त्यामूळे त्यांना खूप दुःख झाले .
या सर्व घटनांनी बेचैन झालेला राजाने गृहत्याग करुन वनगमन केले .पुढे ग़ौतमांची भेंट झाल्यावर त्यांना स्वत:चे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे .अशी विनती केली तेव्हा गौतम ऋषिनीं त्याला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची पावन कथा सांगीतली .त्या क्षेत्राचे माहात्म्य विशद करताना एक अत्यंत पापीणी स्री गोकर्ण क्षेत्री कशी आली ,तिला शिवरात्रीस उपोषण ,जागरण व पूजन क़से घड़ले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी कशी गेली त्या विषयीची समग्र हकिगत सांगितली गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कलमाषपाद श्री क्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव -आराधनेस रममाण होऊन ब्रम्हहत्तेच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला.



महिमा महाशिवरात्रीचा -शिवलीलामृत अध्याय 2 रा

महिमा शिवरात्रीचा. :अध्याय दूसरा:
सूत म्हणाले,”सज्जनहो ! शिवरात्रीचे माहात्म्य अगाध आहे .या दिवशी अजाणता शिवस्मरण ,उपोषण,जागरण वा बिलवार्चन घड़ले तरी मोठें पुण्य प्राप्त होते .त्या विषयी एक कथा सांगतो ऐका
विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्ये सारखी पापे घड़ली होती .एका महाशिवरात्री दिनी तो शिकारी साठी निघाला असताना मार्गामधे शृंगारलेलेशिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहुन थांबला. तेथीलशिवपूजेचा सोहळात्याने पाहिला आणिलोकांच्या मूर्खपणाला हसत शिवशिव हरहर आसें थट्टेने म्हणत जंगलात प्रवेश केला .
त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाहीं .उपवासही घड़ला.सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढुनसावजाची वाट पहात बसला .वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बेलाचे पान खुडुन ख़ाली टाकू लागला . ती पाने ब्रम्हदेवाने त्या झाड़ाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पड़त होती .अशा प्रकारे त्याचाकड़ून नकळत उपोषण ,जागरण ,नामस्मरण व शिवर्चन घड़ून तो पापमुक्त झाला.
त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तेथे पाणी पिण्यास आली.तिला पहुन व्याधाने बाण रोखला.ते पाहुन हरिणी म्हणाली “कृपा करुन मला मारू नकोस. मी गर्भवती आहे.बाळांनां जन्म देवून उद्या सकाळी पर येण्याचे मी तुला वचन देते ,”तीचे मनुष्यवणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले.त्याने तिला तीची पूर्वथा विचारली ती म्हणाली ,”मी रंभा नामक अप्सरा असूनहिरण्य नावाच्या दैत्याशी राममाण झाले.शंकराचे भजन पूजन विसरले.म्हणून शिवशापाने मी,माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वानां मृगजन्म मिळाला आहे.बारा वर्षानी मी पुन्हा स्वर्गात जाईन “तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडु लागला .एकेक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी ,एक हरिण व आणखी एक हरिणी तेथे आली आणि आपापली कर्तव्ये करुन परत येण्याचे वचन देवून निघून गेली.अशा प्रकारे व्याधाला जागरण व चार प्रहरींचे शिवार्चन घडले.
सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला व शावकांसह ते सर्वजण व्याधाला , ‘आधी मला मार ‘ अशी विनती करु लागले.अशा प्रकारे व्याधाचे हृदय कळवळले .त्याने त्या सर्वांना नमस्कार केला .तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झाले .हरिणांना मूळचे स्वरूप मिळाले .तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले.त्यांनी व्याधासहीत त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले.



दशार्ह आणि कलावती : ।।अध्याय पहिला।। शिवलीलामृत

प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रातील शौनकदिकांच्या विनंतीवरुन महामुनी सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले .ते म्हाणाले सज्जन हो! शिवचरित्र अत्यंत अदभुत आहे त्याचे श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊ आयुरारोग्य,संतती व संपती प्राप्त होते.सर्व तीर्थे ,व महायज्ञांचे फल प्राप्त होते ॐ नम: शिवाय। या शिवमंत्राचे जपाने सर्व आधिव्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते.आता याविषयीची एक कथा सांगतो.
पूर्वी मथुरेत दशार्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला.काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी .एकेदिवशी बोलावून ती आली नाहीं म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगिताली.तेव्हा ती म्हणाली ,”नाथ,सध्यामी व्रतस्थ आहे तरी मला क्षमा करा” पण कामातुर राजाने तिला मिठित घेतले.तेव्हा त्याचे अंग अक्षरशःहोरपळले.त्या अनुभवाने थक्क झालेल्या राणीला हा काय प्रकार आहे असे विचारले.ती म्हणाली, “नाथ, मी दुर्वासाकड़ून ॐ नम: शिवाय । ही मंत्र दीक्षा घेतली आहे . त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झालें आहे .तुम्हीं जप ,तप,शिवार्चन यापैकी क़ाही करीत नाही .अभक्ष भक्षण,अविचार आणि पापाचारण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे.त्यामुळे तुमच्या नशीबी नरक यातना आहेत,” ते सर्व ऐक़ून राजाला पश्चाताप वाटू लागला .त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली.पण पती गुरुस्थानी असल्याने तिने त्याला मंत्र न देता गर्ग मुनीकड़े नेले.
गर्गमुनींनी राजाचा मनोभाव ओळखून त्याच्याकडून शिव पूजन करवून घेतले .आणि त्याला आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेऊन त्याला शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला .त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले.त्यामुळे राजा निष्पाप झाला,”आपण माझा उद्धार केलात .”असे म्हणूनत्याने मुनींना वन्दन केले.आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला.त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले .



सुभाषित चौदा रत्नाचे

सुभाषित :~
लक्ष्मी कौस्तुभपारिजातकसुरा:धनवन्तरिश्चन्द्रमा: गाव:कामदुभ:सुरेश्वरगजो रंभादिदेवांगना:।अश्व:सप्तमुखो विषं हरिधनु:शंखोऽमृत चाम्बुधे: रत्ननीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मंगलम्।।


देवदानवांच्या युद्धात देवांचा पराभव झाला हा सल देवामाध्ये होता यासाठी समुद्र मंथन केले तर अमृत मिळु शकेल आसें देवांना वाटले म्हणून दानवांना एकत्र घेऊन समुद्र मंथन करण्याचे ठरले व समुद्र मंथन झाले यामध्ये एकूण 14 रत्ने मिळाली याचे सुंदर वर्णन या सुभाषिता आहें मंगल प्रसंगी यांचा उल्लेख केला जातों या रत्नात लक्ष्मी ,कौस्तुभ ,प्राजक्त,दारू ,धनवन्तरी ,चंद्र,कामधेनु ,ऐरावत ,घोड़ा,विष ,विष्णूचे धनुष्य,शंख आणि अमृत अशी चौदा रत्ने मिळाली आहेत .ही शुभ चिन्हे हिंदू धर्मात फ़ार प्रिय आहेत जल किंवा समुद्र मानवाला काय देतो याचे सांकितिक हे उदाहरण आहें परंतु याचा मानवी उत्क्रान्तीशी सम्बन्ध आहें हे दिसून येते .यातील वस्तु समुद्रात असुशकतात का असे अनेक लोक़ानी प्रश्न केले आहेत .हिंदू धर्मात भवसागर आहें . सृष्टी हे सागर आहें ,जन सागर ही उल्लेख करतात.राजा रविवार्मा या थोरचित्रकारांचा प्रेस मावळ तालुक़्यातील मळवली येथे होता हे मावळाचे भूषण आहें रविवार्मा या जागतीक दर्जाच्या महान चिरकाराने केलेला शिला प्रिंट पहा हे आमच्या मळवलीच्या प्रेस चे आहें आणि दुर्मिळ आहें.
- [ ]



अरुणा आसफ़ अली

अरुणा असफ़ अली
अरुणा असफ़ अली यांचा जन्म 16 जुलै 1901 मध्ये बंगाल राज्यातील कालका येथे एका कर्मठ क़ुटुंबात झाला.त्यांच मूळ नाव अरुणा गांगुली त्यांचा स्वभाव स्वतंत्र विचार सरणीचा होता . सन 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाचा पुकारा केला सरकाराची पर्वा न कारताच सम्पूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केले .पारम्पारीक शिक्षण न घेताच लाहोरच्या ख्रिस्ती मीशनरी शाळेत शिक्षण घेतले.त्यांनी वयाच्या18 व्या वर्षी आपण देशासाठी काहीतरी करावे म्हणून असहकार चळवळीत उड़ी घेतली.पुढे असफअली यांच्याशी त्यांचा विवाह झाला.पतीचीं साथ मिळाल्याने 1930 ते1941 या काळात त्यांना ऐकवेळा अटक झाली परंतु त्या मागे हटल्या नाहीं नुसते तुरुंग भरुन उपयोग नाहीं ही त्यांच्या लक्षात आल्यावर त्या सुमारे चार वर्षे भूमिगत राहील्या.सन 1946 मध्ये त्यांचे वारंट रद्द झाले.स्वातंत्र्य मिळाल्यावर त्या यूनेस्कोच्या मेक्सिको येथील परिषदेस डॉ.
राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाख़ालिल शिष्टमंडळात सदस्य म्हणू गेल्या होत्या .सन 1956 मध्ये ते दिल्लीच्या पहिल्यामहापौर झाल्या.त्यांना सोवीएतलँड नेहरू पुरस्कार ,लेनिन पुरस्कार ,इंदिरा गांधी पुरस्कार एकात्मता पुरस्कार ,आंतरराष्ट्रीय सामंजस्याबद्दल नेहरू पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. देशासाठी अनेकांनी आपल्या जीवानाची आहुती दिली आहें . त्यांचे ही स्मरण आपण ठेवणे आवश्यक आहें.त्या साठी हा एक छोटा प्रयत्न .त्यांचा मृत्यु 30 ऑगष्ट१९९६ वयाच्या 97 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.



स्थितप्रज्ञ विदयार्थी प्रिय गुरुवर्य प्रा. सुधाकर चव्हाण

पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात चित्रकला शिक्षक शिक्षणालय(ए. टी. डी. व ए. एम. विभाग)
विभागाचे प्रमुख म्हणून श्री .सुधाकर चव्हाण सरांची ओळख सर्व शृत आहेच.परंतु सर जरी संपूर्ण आयुष्य पुण्यात गेले.परंतु खेडे गावातून आलेल्या विद्यार्थ्यांशी ते जे आपुलकीने बोलतात तेव्हा विशेष आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.यात मला कारुण्य जाणवले.

जे का रंजले गांजले |
त्यासी म्हणे जो आपुले||
तोची साधू ओळखावा |
देव तेथेचि जाणावा||

ही सरांची वृत्ती हे मी हनुमंत कुंभार,राजू गायकवाड,सनस ,यांनी व मी अनुभवले आहे. घरदार सोडून ही मुले पुण्यात रहात होती सरांचे मन फार संवेदनशील याचा आम्हाला पावलो पावली अनुभव आला. सरांच जग त्यामानाने वेगळेच.नेहमीच समोरच्याचा विचार करणार यात आपला किती फायदा तोटा होतो याचा विचारच नव्हता. मुलामध्ये सर अधिकच फुलत असतं.नवे नवे अनुभव ते लीलया सांगत.श्री.नारायण घोटकुलें हे आमचे शिक्षक भर दुपारी कॉलेजवर भेटलो.फार वेगळा अनुभव सरांनी आम्हाला दिलेला वेळा.कायम आठवणीत शाळेत घोटकुलें सर म्हणाले होते अरे तुला आमच्या चव्हाण सरांकडे नेतो.एका छोट्या गावातील शिक्षक जेव्हा हे सांगतो. आणि ती भेट झाल्यावर मला घोटकुलें सर किती भारी आहेत हे वाटले व इतरही मुलांना सांगितले. त्यांच्या विषयीचा आदर माझ्या मनात अजूनही वाढला.आणि जेव्हा मी श्री .शिंदे एकनाथ सर यांना भेटलो तर म्हणाले अरे चव्हाण सरांनी मला पेन्सिल टोक करायला शिकवले. ते आमचे आवडते सर होते.माझ्या मनात परत प्रश्न जर सर भेटले नसतेतर मागच्या आठ दिवसाची चर्चा गेली असती की पाण्यात?म्हणूनच चव्हाण सर वेगळे. आठ दिवस चव्हाण सर कसे असतील भेटतील का?त्यात शहरातील महाविद्यालय अनेक प्रश्न असो.म्हणूनच ते दुसऱ्याचे मन जाणतात.त्यासाठी बोलावं लागत नाही.हीच खरी संवेदना जेव्हा मला नोकरी लागली व मला नोकरी का करायची हे सांगितले नेहमी बोलताना ते तर्जनी समोर करून बोलायचे त्यात त्यांचा आत्मविश्वास वाटायचा.दररोज परिपाठ असायचा त्यानंतर कला इतिहास .मग रोजच्या असाईंमेंट असा दिनक्रम असायचा.त्या वेळी सहल काढायची ठरली कुठे पुरंदरला जायचे गाडी ठरली.भर पावसात आम्ही पायथ्याकदून वर चढणीला सुरुवात केली.पाऊस चालू होता. आमच्या बरोबर भिजतच सर चालले व ऐतिहासिक माहिती देत होते. आमच्यात विद्यार्थी म्हणूनच राहत. एखाद्याने काही खोड काढलीं तर आरे वा छान छान म्हणायचे.त्यामुळे तो विदयार्थी खजील व्हायचा.की सरांचं लक्ष आपल्याकडे आहे.कोणत्याही मुलांना बोलताना ते नावाचा उल्लेख करतात.मुलींना कन्या म्हणायचे.उदा. हनुमंत सर जाताय का वर्गावर.आडनाव कधीच ते घेत नसायचे.त्यामुळे एक कौटुंबिक वातावरण वाटायचे. आमच्या वर्गात दीदी देसाई म्हणून एक ज्येष्ठ विद्यार्थिनी होत्या.त्यांना ते दीदी च म्हणायचे.त्या सरांपेक्षा वयाने मोठ्या होत्या.दिदिंचा आमच्या वर्गावर धाक असायचा .आम्ही त्यांना मान द्यायचो.लोहगाव येथे शाळेत काम करत असताना चव्हाण सर म्हणाले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे चित्रकला शिक्षकांचे प्रदर्शन तुमची संस्था आयोजित करते.
मग कृतिसत्र का घेत नाही. संस्थेचे अध्यक्ष होते. प्रा.रामकृष्ण मोरे साहेब ,उपसचिव होते.शामराव जगताप साहेब सहा.उपसचिव होते के.के.निकम साहेब मी संस्थेत विषय काढला आणि आम्हाला यश आले. वाघोलीच्या मंगल कार्यालयात दोन दिवसांचे कृतीसत्र झाले व चित्र तयार करून त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले.
त्या नंतर एलिमेंटरी व इंटरमिजियट परीक्षेचे सुद्धा कृतीसत्र आयोजित करण्यात आले. पुढें त्याचा पायंडाच पडला पण प्रेरणा होती फक्त चव्हाण सरांची.

|कर्मण्ये वाधिकारस्थे मा फलेशू कादाचन .||

मुलांनो तुम्ही स्वतःला शिस्त लावा दुसर्याला शिस्त लावणे सोपे परंतु स्वतः ला लावणे अवघड.एकदा अगदी वर्गात खूपच गडबड झाली.मधली सुट्टी म्हणजे गोंधळच त्या गोंधळात शिरीष पण, शुभदा, अनिता बकरे त्या दिवशी दीदी नव्हत्या म्हणजे बेंच वाजवणे गाणी म्हणने अगदी ताल सुटला होता अगदी सर्वांचा सर अचानक वर्गात आले. म्हणाले,तुम्ही शिक्षक होणार आहात याची जाण ठेवा.कर्तव्य विसरलात.एवढा वेडेपणा झाला होता.शिरीष व मी एक मेकांकडे पाहिले.अगदी सरांनी शिक्षा केली असती तर बरं झालं असतं अस वाटायला लागलं.आम्ही लहानही नव्हतो. शनिवारी आऊटडोअर असायचे
मग आम्हाला. केळकर म्यु झि यं म् मध्ये नेल्याचे आठवते त्यावेळी डॉ. केळकर त्यावेळीं होते.त्यांना आम्ही पहिल्यांदाच पहिले.या माणसाने केवढे संग्रहालय उभारले त्यांची तपश्चर्या या विषयी माहिती दिली.ती अजूनही आठवते.
पुरातत्वशास्त्र या विषयावर डेक्कन कॉलेज पाश्चिमात्य कला , भारतीय कला सरांनी वीरगळची माहिती दिलेली आठवते.ती का उभारतात त्यातील वीर , युद्ध,व मृत्यूं याचे वर्णन खूप सुंदर करायचे. सतीची शिळा त्यांवरील हाताचे चिन्ह का असते.पुण्यात अशा शिळा कुठे आहेत ?याची ओघवत्या शब्दात माहिती त्यांनी दिली जायची, पट्टचित्र, कष्ठशिल्प इ. माहिती फार सुंदर देत आणि त्याचा फायदा आमच्या अध्यापनात झाला.तोच प्रयोग आम्हीं वर्गात केला.आणि त्याचा उत्तम परिणाम जाणवला.
बाल मानसशास्त्र हा त्यानी सांगितलेला विषय म्हणजे चित्रकलेतून मनाची अवस्था ओळखता येते. मुलांची चित्रे वाचा गोल रेषा का काढतात. टोकदार का काढतात. याची सुंदर महिती सरांनी दिली.सर फार उत्साही असायचे कधीच कंटाळलेले मी तरी पाहिले नाही. चेहरा कसा काढावा पेन्सिल काही दाबावी सॉफ्ट रेषा कशी काढावी हे त्यांच्या रेखाटनात दिसायचे. त्यांच्या चित्रात गोल तळ दाखवायचे. कमळ, पायऱ्या, चंद्र असायचा. प्रतिबिंब अगदी सहजगत्या ते रेखाटायाचे शक्यतो ग्रे कलर ,असायचा रचना विषयानुरूप जाणवायच्या
त्यांच्या एका स्क्रीनवर तयार केलेल्या चित्राला प्रदर्शनात प्राईज मिळाले होते ती बातमी सुद्धा पेपरला होती. त्यांच्या चित्रात काहीतरी गूढ वाटायचे. चारकोल अगदीं लीलया रेखाटताना दिसायचे. त्यांच्या या प्रभुत्वा मुले त्यांचे वेगळेपण लपत नव्ह्ते. सरांची सिरीज असायची.आठ दहा चित्रे त्या प्रकारची असायची.शिक्षक हा विद्यार्थ्याचा मार्गातला खरा मार्गदर्शक असतो ते त्यानी दाखवून दिले आहे.देशांतील अनेक संस्थाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.,ललित कला अकादमी व इतर खाजगी व राष्ट्रीयसंस्था.सरांचा अमृत महोत्सवी वाढदिवस बुधवार दि.१६ जून २०२१ रोजी आहे.सरांनी खूपच शैक्षणिक कार्य केले आहे.त्यांचा वारसा जपणे आवश्यक आहे.ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सरांच्या सारख्या सूर्याचे माझ्या सारख्या काजव्याने काय वर्णन करावे.सरांच्या भावी आयुष्याला कोटी कोटी शुभेच्छा.शेवटी येवढेच म्हणेन


सुगंध आपल्या कर्तृत्वाचा अखंड दरवळत राहिल
धाक कधी दाखवला नाही तरी आदर मात्र कायम राहिल
कर जोडोनी वंदितो गुरुराया जगात कीर्ती वर्धित राहिल
रमलो वर्गात मीही आपुले हृदयातही स्थान कायम राहिल
धन्यवाद ,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



पहिल्या दरवाजा पाशी गेला रुप्याचा दरवाजा तरी

||पद 08 ||
पहिल्या दरवाजा पाशी गेला रुप्याचा दरवाजा तरी
जरीच्या झालऱ्या आहेत पा या दारवाज्या वरी
होईस मंदील अंगावर शेले उभे शिपाई दोन दारी
आंतमधी घेऊन गेलो रामजीबाबांची स्वारी
दुसऱ्या दरवाजा पाशी गेला चांदीचा दरवाजा वरी
मोत्याच्या झालऱ्या आहेत पा या दरवाजावरी
होईस मंदील अंगावर शेले उभे शिपाई दोन दारी
आंतमधी घेऊन गेलो रामजीबाबांची स्वारी
तिसऱ्या दरवाजा पाशी गेला दडवाचा दरवाजा तरी
मोत्या व पवळ्याच्या झालऱ्यां आहेत पा या दरवाजावरी
लोड गादी सोन्याची खुर्ची सरकार खुर्चीवरी
सारकाराशी बोलते झाले कडेपठार मल्हारी ,
संकट काळी माझा भक्त जागा द्यावी देवद्वारी
देव करी परीक्षा खैऱ्या चाले इंगळावरी
भक्ती व मधी भक्ती केली तरी खैऱ्यानी खरी
रामजी बाबांनी भक्ती केली जन्म गेला तरी
रखमाबाई मातोश्वरी यांची पुण्याई खरी
रामजी व बाबा आमचे जन्मले यांच्या या उदरी
*********************************



पुण्य पवित्र पुण्यतीर्थ रामजी बाबांचा उत्सव

श्री संत रामजी बाबा यांची मूर्ती घडवली त्यावेळी लोकांची भावना
या पदामध्ये वर्णन केले आहे .मूर्तीचे सुंदर वर्णन केले आहे . समोर
येणाऱ्या अडचणी बाबांनी कशा दूर केल्या हे सांगीतले आहे .
या पूर्वी गावात माघ शु || द्वितीयेला धर्मनाथ उत्सव होत असे . त्याच पारावर रामजी बाबा उत्सव करावा असे समस्त गावकऱ्यांनी ठरवि ले . व पौष शु || पौर्णिमा या दिवशी उत्सव सुरू झाला .

पद ||10||
पुण्य पवित्र पुण्यतीर्थ रामजी बाबांचा उत्सव
मुंबई चे धनगर धरित्यात खुब मनांमधी निश्चय
कोळी वाड्यां मध्ये करून विचार गेले डोंगरीवर
नागोजी कुंभार धुंडाळी धोंडफोड्या तरी
नागोजी कुंभार गेले शिवडीवर
खाणी मध्ये चिरा पाहिला तो एक परमेश्वर
दोनशे रुपये देतो तुम्हाला मुरत करा तय्यार
रामजी बाबाची मुरत घडली जशी चंद्राची कोर
पेटी मध्ये घालून मिलाप भरून पेटी राव आणली स्टेशनावरी
आगीनगाडीचा हाशील भरलाय गाडी हालाना तरी
माल्हारीचा येळकोट गाता चालू झाली तरी
बोलत चालत निघून आले तळेगावावरी
तळेगावाच्या स्टेशनावरती गाडी बैल होती तैय्यार
चार बैल जुंपले गाडीला गाडी हालाना तरी व
मल्हारीचा येळाकोट गाता चालू झाली तरी
गावामधी मुरत येता आनंद घरोघरी
नागोजी कुंभार धोंडफोडे आले होते बरोबरी
ब्राह्मण बोलाऊनी तिथी पाहुनी बाबा बसवले सिंहासनांवरी
देव करी परीक्षा खैऱ्या चाले इंगळावरी
भक्ती व मध्ये भक्ती केली ती खैऱ्याने खरी
रामजी बाबांनी भक्ती केली जन्म गेला तरी
रखमाबाई मातोश्ररी यांची पुण्याई खरी
रामजी बाबा आमचे जन्मले यांच्या या उदरी
पाली न पेंबर गड तुझी सोन्याची जेजुरी
चांद खेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गडाला नऊ लाख पायरी
चांद खेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
******************************



आप्पासाहेबांच्या वाड्यात जन्मली बाबांची स्वारी

चांदखेड गावांमध्ये आपांसाहेबांचा वाडा आहे . या ठिकाणी रामजी बाबा त्यांचे बंधु रावजी व आई रखुमाबाई रहात होत्या त्यावेळेस संपूर्ण आयुष्य बाबांचे या वाड्यात गेले . त्यांना प्रपंचात रस नव्हता फक्त खंडोबाची भक्ती म्हणून ते कोऱ्हाळ्याच्या डोंगारात रहात असत . जेवणाचे भान नव्हते . मोठ्या भावाला त्यांना शोधून आणावे लागे . नामस्मरणात ते दंग झालेले असत . त्यामुळे आईचे बोलणे ऐकून घ्यावे लागे परंतु मल्हारीची भक्ती त्यांनी सोडली नाही. आणि म्हणूनच स्वत: मल्हारी प्रसन्न झाले व त्यांच्या बरोबर चांदखेडला आले . या वाड्यात आता सुद्धा उत्सवात मल्हारी ची पालखी येते . पारनेर गावचे हे कुटुंब माल्हारीच्या कृपेने येथे आले त्यांना दैवी स्वरूप प्राप्त झाले . आज त्यांच्या या अनेक पीढया येथे वास्तव्याला आहेत .

|| पद05||
आप्पासाहेबांच्या हो हो हो हो हो हो
आहो राघू साहेबांच्या वाड्यात जन्मली बाबांची स्वारी
वा मल्हार गर गर करी नं दाजी र जि जि जी
रखमाबाई हो हो .. ..
आहो बाई मातोक्षरी
यांची पुण्याई खरी जी नं दाजी र जी
रामजी बाबा हो .. रामजी बाबा आमचे जन्मले यांच्या उदरी
रामजी बाबा हो ..
रामजी बाबा हिरा प्रगटला गेला अंतरी ..
रामजी बाबा हो ..
चांदखेड नगरी अजाब गुजरी ,नांद देव मल्हारी .



लिओनार्दो द. व्हिंची यांच्या हेड ऑफ बीयर या चित्राला $ 16.7 मिलियन डॉलर

लिओनार्दो द व्हींची १५ व्या शतकातील रेनेसांस काळातील महान चित्रकार , शिल्पकार होते. कलेच्या इतिहासात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांचे नाव अग्रभागी राहिले. तरी त्यांचे नाव चित्रकार म्हणून अधिक घेतले जाते.मोनालिसा,द लास्ट सफर,मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्यांची जगप्रसिद्ध चित्र आहेत.आता त्यांच्या एका हेड ऑफ बीयर या चित्राचा लिलाव होत आहे.याची किंमत आहे $16.7 मिलियन डॉलर व याची साईज ३ इंच स्कवेर इंच आहे.याचा लिलाव ८ ज्युलै ला लंडन येथील क्रिस्टिज मध्ये होत आहे.त्याअगोदर या चित्राला लंडन,न्यूयॉर्क, आणि हाँगकाँग येथे प्रदर्शित होणार आहे.त्या चित्रावर लिवोनार्डोचे हस्ताक्षर आहे. क्रिस्टिज चे जुन्या चित्रांच्या चेअरमन बेन हॉल म्हणाले, लिओनार्दो चे हे अत्यंत महत्त्वाच्या कामापैकी हे चित्र आहे.ज्या माणसांकडे हे चित्र आहे ते २००८ पासून असल्याचे दिसते या अगोदर लिओनार्दो द विंची चे चित्र क्रिस्टिज मध्ये ४५०.३ मिलियन पाउंड ला विकले होते.या अस्वलाच्या चित्राला सुमारे १६.७ मिलियन डॉलर पर्यंत जाईल असे तज्ज्ञांचे मत आहे.या महान कलावंताला मानाचा मुजरा.



सत्यम शिवम सुंदरा

शाळेचे वातावरण म्हणजे पक्षांची किलबिल व फुलांचा सुगंध रम्य बालकांची शाळा आता दिसत नाही मुलांच्या सुंदर आवाजात सादर होणारी कविता ,खडू फळा,क्रीडांगणावर जमा होणारी मुले एका ओळीत उभे राहून सकाळच्या वेळी सादर होणारी प्रार्थना

नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा||ध्रु||
शब्दरूप शक्ती दे,भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ||१||
विद्या धन दे आम्हांस ,एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दया सागरा ||२||
होऊ आम्ही नीतिमंत , कला गुणी बुध्दीमंत
कीर्ती कळस जाई उंच अंबरा ||३||

सकाळचे वातावरण प्रसन्न करून सोडायचे प्रार्थना म्हणणाऱ्या मुली व मुले ताला सुरात हे गीत सादर करताना भान हरपून म्हणायचे
परंतु या कोविड वातावरणात ऐकणे दुर्मिळ झाले आहे.श्री संत तुकाराम विद्यालयात आम्ही सकाळच्या परिपाठात अनेक गीत म्हणववून घेत असे. गीते गाण्यासाठी मुलांची स्पर्धा असायची.



सर्वांनी काळजी घ्या लवकरच कोरोना जाईल व शाळा पहिल्या सारख्या सुरू होतील हीच शुभेच्छा.

धन्यवाद



वसे तो देव तुझ्या अंतरी

वसे तो देव तुझ्या अंतरी

इकडे तिकडे शोधिसी कारे फिरशी वेड्यापरी
वसे तो देव तुझ्या अंतरी ||ध्रु||
सरीते काठी डोंगर माथी ,
संत मुनी जन प्रभुगुण गाती,
या विश्वाचा जो निर्माता जो निर्माता जागा हो श्री हरी ||१||
मिळतो मानव जन्म एकदा ,
ईश्वर एकच असे सर्वदा ,
अज्ञानाचा सारूनी पदडा ये ई सन्मार्गाव री ||२||
असेल इच्छा जर मुक्तीची ,
कास धरावी सद्भक्ती ची ,
वाट खरी ही आत्म हिताची तुझीया धरती वरी ||३||



ईश्वर शोधण्यास आपण सर्वत्र फिरतो.परंतु तो आपली अंत:करणा त आहे.कधी नदीवर कधी डोंगरावर.संताच्या मुखात मुनींच्या नामस्मरणात.एकदाच मानव जन्म मिळतो जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो साठवला आहे.अज्ञान सोडून त्याचा शोध घ्या .त्यासाठी सन्मार्ग आवश्यक आहे.जर मुक्ती हवी असेल तर सदभक्ती करावी.हाच मार्ग खरा आणि सोपा आहे.



विठू माझा लेकुरवाळा :- संत जनाबाई

विठू माझा लेकुरवाळा

विठू माझा लेकुरवाळा,संगे गोपाळांचा मेळा ||१||
निवृत्ती हा खांद्यावरी ,सोपानाचा हात धरी||२||
पुढे चाले ज्ञानेश्वर,मागे मुक्ताबाई सुंदर||३||
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी||४||
बंका कडियेवरी,नामा करंगुळी धरी||५||
जनी म्हणे गोपाळा,करी भक्तांचा सोहळा||६||

अभंग रचना : संत जनाबाई

संत जनाबाई यांनी किती सुंदर अभंग रचना केली आहे.भक्ताची किती काळजी पांडुरंग घेतो.सर्व संत म्हणजे त्या पांडुरंगाची लेकरे आहेत.या मध्ये अभूतपूर्व शिकवण आहे.सर्व धर्म समभाव आहे.आणि अध्यात्मिक नेतृत्व करणारे संत यांचा एकोपा त्यामध्ये दिसतो.हीच खरी संत ज्ञानेश्वर यांची भिंत आहे.याच नेतृत्वामुळे त्यावेळच्या कर्मठ समाजाला जागृतीचा संदेश दिला.आहे.या मध्ये अध्यात्मिक ज्ञानच श्रेष्ठ आहे.हे दिसून येते.त्या वेळी संतांनी दिलेली शिकवण अजूनही आपणाला समजलेली दिसत नाही.



वाघजाई मंदिराला का जायचे

वाघजाई मंदिर

पुण्यापासून सुमारे 30 कि.मी.अंतरावर श्री संत तुकाराम साखर कारखाना जवळच आहे. अगदी आपण चालतच कारखान्याच्या जवळच असलेल्या रोड वरून चालतच आपण डोंगरावर जाऊ शकतो.आणि वर जाण्यासाठी फक्त अर्धातास लागतो.वाघजाई डोंगरावर दारुंब्रे , चांद खेड कुसगाव,पाचाने,आढले,साळुंब्रे,इत्यादी गावावरून लोक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात येतात.बऱ्याचदा आमच्या शाळेच्या सहली सुद्धा येथे सर घेऊन यायचे. मंदिरात जाण्यासाठी कासारसाई मार्गे रस्ता आहे त्याच प्रमाणे चांडखेड मार्गे सुद्धा वाट आहे.मंदिराचे विशेष म्हणजे चढण उत्तरे कडून आहे हे फार शुभ आहे.

सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणी नमोस्तुते
असे सुंदर अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती येते
असे सुंदर वातवणाची चाहूल लागते .अगोदर भैरवाचे मंदिर दिसताच वेगळी सृष्टी जाणवते येते. मंदिर छोटेखानी आहे समोर शिवलिंग आहे व आतमध्ये भैरवाची शेंदराची मूर्ती आहे आजूबाजूला घनदाट जंगल आहे.पूर्वी येथे तरस,कोल्हे रानडुक्कर यांचा वास असायचा .आता मात्र लोकवस्ती वाढली आहे.त्यामुळे भीती राहिली नाही.आजूबाजूला पक्षांचा किलबिलाट त्यामुळे फार आनंद होतो. पश्चिमेकडून वाहणारा थंडगार वारा मन मोहून टाकतो.
पुढे उतार लागतो खडकाच्या उंच प्रस्तरा पुढे मंदिराची रचना केली आहे.त्यामध्ये देवीची शेंदूर लेपित अधिष्ठान आहे.
त्याखाली गुहा आहे.आजही लोकांचा समाज आहे की देवी चे अस्तित्व गुहेत आहे गुहा खूप खोल आहे. त्यामध्ये वर्षभर पाणी आहे त्यामुळे आत मध्ये शेवट पर्यंत जाण्यास अडचण निर्माण होते.गुंफा म्हणजे नैसर्गिक आहे.तिथे कोणी मानव निर्मित नाही.जुने लोक सांगतात की जर गुहेत देवीचा नारळ व लिंबू वाहील तर खाली आळ्यात असलेल्या झर्यात ते लिंबू निघते.गावामध्ये रामजी बाबा चे मंदिर आहे रामजी बाबा याच गुहेत बसत असत याच ठिकाणी खंडोबा त्यांना दर्शन द्यायचं असा असे लोक सांगतात.याच गुहेच्या उत्तरेला बाबांचे पादुका मंदिर आहे.परंतु गुहे विषयीचे गूढ मात्र कायम आहे.

चंडखेड नागरी अजब गुजरी असां पोवाडा फार प्रसिद्ध आहे.शेवटी खंडोबा म्हणजे भैरव हे या वरून वडावडीलांना सुचवायचे असेल. नवरात्रात येथे घट स्थापना केली जाते.नाऊ दिवस लोक दर्शनाला येत असतात.दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी पालखी निघते.
मंदिराचे वातावरण अतिशय सुंदर आहे.पर्यटनास उत्तम ठिकाण आहे अवश्य भेट द्या.

शिवाजी नगर वरून एस टी ची सोय आहे तसेच निगडी ते चांद खेड बस चालू असून डोंगराच्या पायथ्याला बस थांबते. दिवसभर बस चालू असते.



जे.जे.स्कूल ऑफ आर्ट ,मुंबई कलापरंपरा

जे. जे. ची कलापरंपरा : पूर्वीच्या भारतीय कलाशिक्षण पद्धतीपेक्षा वेगळ्याच स्वरूपाचे कलाशिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टसारख्या इंगजांनी स्थापन केलेल्या कलाशाळांतून देण्यास सुरूवात झाली. भारतातील कलेचे स्वरूप त्यामुळे बदलून गेले. भारतीय परंपरेतील चित्रशिल्प साकार करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा, छाया-प्रकाशाचा वापर करीत व मानवी नजरेला जसे दिसते, तसा अनुभव देणारी ही कलानिर्मिती वेगळ्याच प्रकारची होती. वास्तववादी शैलीतील या कलाशिक्षणात मानवाकृतीच्या अभ्यासातून ‘व्यक्तिचित्र व व्यक्तिशिल्प’ हा विषय विकसित झाला तर वस्तूंच्या अभ्यासातून स्थिरवस्तुचित्रण (स्टिल लाइफ) व निसर्गाच्या अभ्यासातून निसर्गचित्र हे विषय वितकसि झाले. व्यक्तिचित्र, निसर्गचित्र व स्थिरवस्तुचित्र यांच्या संगमातून, तसेच एखादया प्रसंगाचा किंवा घटनेचा आधार घेऊन प्रसंगचित्रे तयार होऊ लागली. ही प्रसंगचित्रे धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा अनेक प्रकारची होती. काही विदयार्थ्यांनी व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण व प्रसंगचित्रण या तीनही प्रकारांत प्रावीण्य मिळविले तर काहींनी केवळ निसर्गचित्रण किंवा व्यक्तिचित्रण या प्रकारांचाच पुढील काळात कलावंत म्हणून व्यासंग व व्यवसाय केल्याचे आढळून येते. परंतु निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण व प्रसंगचित्रण यांतून रचनाचित्र (काँपोझिशन) हा प्रकार विकसित होऊन, या संदर्भात चित्र-शिल्पकलेच्या क्षेत्रांत विविध प्रयोग सातत्याल कामाने होत राहिले. या सर्वांची बीजे भविष्यात कलावंत म्हणून गाजलेल्या सुप्रसिद्घ चित्र-शिल्पकारांच्या विदयार्थिदशेतीत आढळून येतात.

व्यक्तिचित्रण व प्रसंगचित्रण : वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रण हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सुरूवातीपासूनचे वैशिष्टय होते. पेस्तनजी बोमनजी व रूस्तुम सिओदिया हे विदयार्थी सुरूवातीच्या काळात नावारूपास आले. नंतरच्या १८८५ ते १९०० या कालखंडांत जे. जे.त शिकलेल्या आबालाल रहिमान यांना छ. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ⇨ श्रीपाद दामोदर सातवळेकरांना श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानात व रामकृष्ण वामन देऊस्कर यांना निजामाने हैदराबाद संस्थानात राजचित्रकार म्हणून आमंत्रित केले. पूर्वी यूरोपमधील व इंग्लंडमधील चित्रकारांना पाचारण करून व्यक्तिचित्रे व प्रसंगचित्रे काढून घेतली जात. आता हेच काम प्रामुख्याने जे. जे. स्कूलमध्ये शिकून निष्णात झालेले चित्रकार करू लागले. एम्. एफ्. पीठावाला, एम्. व्ही. धुरंधर, ए. एक्स. त्रिंदाद, ए. एम्. माळी, ए. ए. भोंसुले, सा. ल. हळदणकर, एम्. आर्. आचरेकर, गोपाळ देऊस्कर, व्ही. ए. माळी, माधव सातवळेकर अशा जे. जे.च्या अनेक माजी विदयार्थ्यांनी ही परंपरा कायम ठेवली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र कौशल्यपूर्ण वास्तवादी व्यक्तिचित्रण व प्रसंगचित्रण यांपेक्षा कलाभिव्यक्तीच्या शक्यता शोधण्याचे एक माध्यम म्हणून शोध घेण्याचा प्रयत्न व्यावसायिक व्यक्तिचित्रणासोबतच झालेला आढळतो. एस्. बी. पळशीकर, बाबूराव सडवेलकर, संभाजी कदम, पद्मशाली, मृगांक जोशी इ. कलावंत त्यांच्या प्रयोगशील निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. ही परंपरा जोपासून सुहास बहुळकर, वासुदेव कामत, अनिल नाईक असे अनेकजण हा वारसा पुढे चालवीत आहेत [→व्यक्तिचित्रण].

निसर्गचित्रण : निसर्गचित्रणाच्या क्षेत्रात अत्यंत दर्जेदार काम सुरूवातीच्या काळात केले, ते कोल्हापूरच्या आबालाल रहिमान यांनी. त्यानंतरच्या काळात सा. ल. हळदणकर, एम्. आर्. परांडेकर, एल. एन्. तासकर, जी. एम्. सोलेगावकर, एम्. एस्. जोशी, एस्. एच्. रझा अशा अनेकांनी दर्जेदार निसर्गचित्रणपरंपरा निर्माण केली असून, आजही ती चालू असल्याचे आढळून येते [→निसर्गचित्रण].

भारतीयत्वाचा शोध व प्रयोगशील कालखंड : वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, प्रसंगचित्रे या क्षेत्रांत जे. जे. स्कूलच्या विदयार्थ्यांनी चांगल्या दर्जाचे प्रावीण्य मिळविले. त्यानंतर मात्र ‘स्व’ त्वाचा शोध घेण्याच्या प्रेरणेतून, तर काही वेळा भारताचा स्वातंत्र्यलढा व भारतीयत्वाचा शोध घेण्याच्या प्रेरणेतून १९२० ते १९३६ या काळात जे. जे. ते बाँम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल, नावाची कलाचळवळ अस्तित्वात आली. पाश्चिमात्य शैलीतील मानवाकृती, भारतीय शैलीतील लयदार रेषा व जलरंग माध्यमाचा वैशिष्टयपूर्ण वापर, ही या कलाशैलीची वैशिष्टये होती. आर. जी. चिमुलकर, व्ही. एस्. गुर्जर, जांभळीकर, ज. द. गोंधळेकर अशा अनेकांनी या शैलीत दर्जेदार चित्रे निर्माण करून तत्कालीन अखिल भारतीय प्रदर्शनांमधून पारितोषिक व नावलौकिक मिळविला. त्यानंतरच्या काळात असहकारितेच्या चळवळीपासून स्फूर्ती घेऊन अहिवासी, रतु शाह, यज्ञेश्वर, शुक्ल, वजूभाई भगत अशा अनेकांनी आपल्या निर्मितीने भारतीयत्वाची ही परंपरा जागृत ठेवली. स्वातंत्र्योत्तर काळात प्रबोधनकाळापासून यूरोपात होत आलेली स्थित्यंतरे, तसेच आधुनिक काळातील विविध कलाचळवळी व कलाप्रवाह यांबद्दल जागरूकपणे विचार सुरू झाला. ‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ या विषयांवर वादविवादही झाले. अपरिहार्यपणे त्याचे प्रतिबिंब जे. जे.मधील कलाशिक्षणावर व विदयार्थ्यांच्या कला-निर्मितीवर पडल्याचे आढळून येते. वास्तववादी शैलीत व माध्यमावरील प्रभुत्वाचे कौशल्यपूर्ण दर्शन घडविणाऱ्या कलानिर्मितीपेक्षा कधी भारतीयत्व जपणाऱ्या, तर कधी पाश्चिमात्य कलाचळवळीतून स्फूर्ती घेऊन विरूपी करणाच्या मार्गाने जाणाऱ्या विदयार्थ्यांच्या अभिव्यक्तिने चांगलीच खळबळ उडाली. या काळातील पी. टी. रेड्डी, रझा, सूझा, गाडे, बाकरे असे विदयार्थी पुढे निर्माण झालेल्या ‘यंगटर्कस्’, ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप, ‘बाँबे ग्रूप’ अशा चित्रकारांच्या टांचे सदस्य बनले. के. के. हेब्बर, डी. जी. कुलकर्णी, अकबर पद्मसी, तय्यब मेहता, रायबा गायतोंडे, साबावागला, लक्ष्मण पै असे चित्रकार आधुनिक कलाशैलीचे महत्त्वाचे चित्रकार म्हणून नावारूपास आले. या कलावंतांच्या नंतरच्या पिढीतील चित्रकार मोहन सामंत, अंबादास, प्रभाकर बरवे, लक्ष्मण श्रेष्ठ, मनू पारेख, प्रभाकर कोलते अशा अनेकांनी चित्रकलेत सुलभीकरण, विरूपीकरण, अलंकरण, केवलाकारी वा अमूर्त चित्रे अशी अनेक प्रकारची कलानिर्मिती करून जे. जे. स्कूलच्या लौकिकात भर टाकली आहे. आजच्या पिढीतील अतुल दोडिया, कृष्णम्माचारी बोस, रवी मंडलीक, जितीश कल्लट, अनंत जोशी, यशवंत देशमुख असे सुप्रसिद्ध चित्रकार जे. जे. स्कूलच्या परंपरेतून तयार झाले आहेत.

शिल्पकला : सुरूवातीच्या काळातील मुंबईच्या व तत्कालीन मुंबई इलाख्याच्या उभारणीतील जे. जे. स्कूलच्या योगदानाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. परंतु सु. १८९६ मध्ये मंदिरपथगामिनी हे शिल्प बनविणाऱ्या ⇨गणपतराव म्हात्रे (१८७९-१९४७) यांच्यापासून स्मारकशिल्पाच्या क्षेत्रातील जे. जे.च्या विदयार्थ्यांचे योगदान उल्लेखनीय असून, आजही स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात तो लौकिक कायम आहे. बी. व्ही. तालिम, गोरेगावकर, व्ही. व्ही. वाघ, ⇨ वि. पां. करमरकर (१८९१-१९६७), आर्. पी. कामत अशा अनेकांनी स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात मानदंड निर्मा णकेले. या परंपरेचा अभिमान बाळगून राम सुतार, सदाशिव साठे, नारायण सोनावडेकर असे शिल्पकार स्वातंत्र्योत्तर काळात नावारूपास आले. प्रयोगशील शिल्पकलेच्या क्षेत्रात पानसरे, बी. विठ्ठल अशा अनेकांनी नावलौकिक मिळविला. आजही मदन गर्गे, चंद्रजीत यादव, भगवान रामपुरे, अशोक सोनकुसरे, निलेश ढेरे असे शिल्पकार स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावीत आहेत. प्रयोगशील शिल्पांची परंपरा काहीशी खंडित झाली असली, तरी शिल्पकार उत्तम पाचारणे, रवींद्र साळवी, किशोर ठाकूर यांनी केलेले शिल्पकाम दर्जेदार आहे. [→शिल्पकला].

जे. जे. स्कूलच्या दीडशे वर्षांच्या वाटचालीत १८९० च्या दरम्यान या कलाशाळेत विदयार्थीनी शिकत असल्याचा पुरावा मिळतो. परंतु अंबुताई धुरंधर, अँजेला त्रिंदाद (१९३०), बी. प्रभा, प्रफुल्ल डहाणुकर (१९५५), नवजोत, शकुंतला कुलकर्णी (१९७२) असे काही अपवाद वगळता विदयार्थिनींची नावे क्वचितच दिसतात. १९८० च्या दशकापासून यात फरक पडला असून आजच्या अनेक आघाडीच्या तरूण चित्रकर्त्री जे. जे. च्या विदयार्थिनी असल्याचे आढळून येते.

जे. जे. स्कूल ऑफ आर्टने भारतीय कलाक्षेत्रात आपला ठसा उमटविला असून २००७ मध्ये झालेल्या १५० वर्षांच्या निमित्ताने जे. जे. स्कूलमधील १८७८ पासून उपलब्ध असलेल्या ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाच्या व अतिशय मौल्यवान अशा कलासंग्रहाचे संस्थेच्या आवारात, संग्रहालयात रूपांतर करण्याची योजना लवकरच आकारास येत आहे.

संदर्भ : १. Kelkar, N. M. Story of Sir J. J. School of Art ( Centenary Volume), Bombay, 1957.

२. धुरंधर, महादेव विश्वनाथ, कलामंदिरांतील एकेचाळीस वर्षे (जानेवारी ८–१८९० ते जानेवारी ३१–१९३१), मुंबई, १९४०.

३. धोंड, प्रल्हाद अनंत, रापण, मुंबई, १९७९.

बहुळकर, सुहास / भागवत, नलिनी



जे.जे.स्कूल ऑफ आर्ट ,मुंबई

🏛️ *जे. जे. स्कूल* 🏛️

🏛️ *२ मार्च २०२१ रोजी आपले कला विषयाचे विद्यापीठ समजलेले जाणारे "सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट" ला १६४ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने संस्मरणीय माहिती...*

🎨 *सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट :* भारतातील एक सुप्रसिद्ध कलाशिक्षणसंस्था. तिची १८५७ मध्ये मुंबईत स्थापना झाली. सर जमशेटजी जीजीभॉय (१७८३-१८५९) यांनी या स्थापनेसाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे नाव या संस्थेशी जोडले गेले. सर जमशेटजी हे ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ (१८४०) व लंडनच्या हाइड पार्कमधील कला प्रदर्शन (१८५१) या दोन्हींचे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी लंडनमध्ये जगभरातून आलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन पाहिले. व्यापाराच्या निमित्ताने ते चीनमध्येही जात होते. तेथील कारागिरी, व्यवसाय व व्यापार पाहून त्यांच्या मनात ⇨ कलाशिक्षण देणारे कलाविदयालय मुंबईतही असावे, ही कल्पना दृढमूल झाली. तिला चेन्नई येथील तंत्र-निकेतनच्या विदयार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन साहाय्यभूत ठरले (१८५२). त्याचे प्रवर्तक डॉ. हंटर यांनी द टेलिगाफ अँड कुरिअर ऑफ बॉम्बे या वृत्तपत्रात (१८५२) लेख लिहून अशी कलाशाळा मुंबईतही असावी, त्यासाठी सर जमशेटजी जीजीभॉय व जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट (१८०३-१८६५) यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. [→ जगन्नाथ शंकरशेट]. परिणामतः सर जमशेटजी जीजीभॉय यांनी एक लाख रूपयांच्या देणगीसोबत ही कल्पना तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांच्यापुढे ९ मे १८५३ च्या पत्राव्दारे मांडली. त्यानंतर मुंबईचे काही प्रतिष्ठित नागरिक व काही ब्रिटिश अधिकारी यांनी २२ ऑगस्ट १८५४ रोजी जमशेटजींच्या पत्रावर विचार करून योजना सादर करण्यासाठी सर डब्ल्यू. यार्डले (तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. सर जमशेटजी जीजीभॉय व सर सी. आर्. एम्. जॅक्सन हे या समितीचे उपाध्यक्ष होते. याशिवाय या समितीत दहा सदस्य असून त्यांतील हिंदी नागरिकांत विनायक वासुदेव, जगन्नाथ शंकरशेट, मागबा (महंमद इबाहीम), फामजी कासवजी, विनायक गंगाधर शास्त्री यांचा समावेश होता. या समितीने नऊ महिने विचारविनिमय करून ८ जून १८५५ रोजी आपला अहवाल सादर केला. अखेर ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँन्ड इंडस्ट्री’ ही संस्था २ मार्च १८५७ रोजी स्थापन झाली. या कलाशाळेचा उद्देश ‘चित्रकला, रेखन व अलंकरण, कलात्मक ⇨ मृत्पात्री (पॉटरी), धातुकाम व लाकडी कोरीवकाम शिकविणे ’ असा निश्चित करण्यात आला होता. यासाठी कारागिरी व तंत्रज्ञान यांत कुशल असलेले तज्ज्ञ कारागीर शिक्षक म्हणून नेमावेत, असाही उल्लेख होता.

(१) सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट : जुनी इमारत (१८७८). (२) शिल्पकला स्टूडिओ (सु. १९००). (३) ड्रॉइंग क्लास (सु. १९००).
(१) सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट : जुनी इमारत (१८७८). (२) शिल्पकला स्टूडिओ (सु. १९००). (३) ड्रॉइंग क्लास (सु. १९००).

सुरूवातीला या संस्थेचे कार्य एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये सुरू झाले व तेथील पेटन हे चित्रकार मुलांना शिकवू लागले. नियोजित योजनेनुसार २५ विदयार्थ्यांनाच प्रवेश देण्याचे ठरले असूनही अर्ज केलेल्या ४९ विदयार्थ्यांना समितीतील भारतीय सदस्यांच्या आगहामुळे प्रवेश देण्यात आला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जी. विल्कीन्स टेरी (कार. १८५७- ७७) नावाच्या लंडनवासी अभिकल्पक व काष्ठशिल्पकाराला शाळेचा प्रमुख नेमून मुंबईला पाठविले. मुंबईला आल्यावर टेरी यांनी कला-महाविदयालयाच्या स्वरूपाविषयी (रेखन-शाळा, सजावट व अलंकरण विभाग, वास्तुविभाग इत्यादींचा) स्थूल आराखडा तयार करून १८६० मध्ये चित्रकलेचे पूर्ण वेळ वर्ग सुरू केले. हे शिक्षण इंग्लंडमधील साउथ केन्झिंग्टन येथील कलाशाळेच्या शिक्षणपद्धतीवर आधारित होते. या अभ्यासकमाचे भारतातील व विशेषत: ‘बाँबे स्कूल’ परंपरेतील कला-शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले. परिणामी वास्तववादी शैलीत व शारीर-रचनाशास्त्रावर आधारित अशा चौकटीतच येथील कलावंत कलानिर्मिती करीत राहिले. सुरूवातीच्या काळात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री ही कलाशाळा विदयार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे सध्याच्या जे. जे. हॉस्पिटल जवळील बाबुला टँक परिसरातील इमारतीत भरू लागली. पुढे ती जागाही अपुरी पडू लागल्यावर इंग्रज सरकारकडे जागेची मागणी करण्यात आली. १८६३ च्या दरम्यान इंग्रज सरकारने या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले. १७ जून १८६५ या दिवशी ‘सर जे. जे. स्कूल’ सध्या ज्या जागेवर आहे, त्या जागी तात्पुरत्या छपऱ्या (शेड) उभारून त्यात वर्ग सुरू करण्यात आले. पुढे १८६९ मध्ये ही जागा सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेस कायमस्वरूपी देण्यात आली आणि त्याच जागेवर १८७८ मध्ये मोठी वास्तू बांधण्यात आली.

संस्थेतील विदयार्थ्यांची वाढती संख्या, अपुरी जागा व अपुरा शिक्षक-वर्ग या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर जमशेटजी जीजीभॉय यांचे चिरंजीव रूस्तुमजी जमशेटजी यांनी १८६५ च्या जानेवारी महिन्यात रूपये १,५०,००० एवढी देणगी संस्थेसाठी दिली याशिवाय साउथ केन्झिंग्टन येथील विभागप्रमुख मि. मूडी यांनी १,१०० पौंड एवढी रक्कम देऊन इंग्लंडहून भारतात येऊन शिकविण्यास तयार असणारे तीन शिक्षक शोधण्यास सांगितले. त्या नुसार मि.मूडीयांनी लॉक वुड किपलिंग (वास्तुशिल्पकार), मायकेल जॉन हिगीन्स (धातुकलाकार) व जॉन ग्रिफीथ्स (सजावट-चित्रकार) अशा तीन शिक्षकांची नेमणूक केली (१८६५). या तिन्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विदयार्थ्यांनी मोठाच नावलौकिक मिळविला. या कलाशाळेतील विदयार्थ्यांच्या कलाकृतींचे १८६८ मध्ये मुंबईत प्रदर्शन भरविण्यात आले. धातुकला, शिल्पकला व अलंकरणात्मक चित्रकला (डेकोरेटिव्ह पेंटिंग) या कलाप्रकारांतील कौशल्यपूर्ण कामांमुळे हे प्रदर्शन चांगलेच गाजले. सुरूवातीच्या काळातील या विदयार्थ्यांना पाठय्वेतन (स्टायपेंड) मिळत असे व त्यांना शिकाऊ उमेदवार (ॲप्रेंटिस) समजले जाई. परंतु उपजीविकेपुरते कौशल्य मिळताच, हे विदयार्थी शाळा सोडून जात असत. देणगीदार सर जमशेटजी जीजीभॉय व सर्व यूरोपीय शिक्षकांच्या कल्पनेतील शिक्षण या प्रकारचे नव्हते. परिणामी यावर उपाययोजना करण्यात आली व कारागिरांसाठी असणाऱ्या या शिक्षणकमाचे रूपांतर मुख्यत्वे चित्रकला व शिल्पकला या विषयांचे प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासकमात झाले. या बदलाला १८७३ मध्ये रीतसर मान्यता देण्यात येऊन ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’ या नावातून ‘इंडस्ट्री’ हा शब्द वगळण्यात आला. इंग्रज सरकारने ग्रिफीथ्स यांच्या मार्गदर्शनाखाली १८७२ पासून अजिंठयाच्या गुंफांमधील भित्तिचित्रांच्या प्रतिकृती करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. हे काम १२ वर्षे सुरू होते. कलाशाळेत शिकून तयार झालेल्या व शिकणाऱ्या निष्णात विदयार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली. सुरूवातीस सात विदयार्थी या योजने- अंतर्गत काम करू लागले व त्यांचे नेतृत्व ग्रिफीथ्स यांच्या गैरहजेरीत पेस्तनजी बमनजी मिस्त्री (१८५१-१९३८) या निष्णात तरूण कलावंताकडे सोपविण्यात आले. हे सर्व काम या तरूण कलावंतांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठया जिद्दीने पूर्ण केले. पुढे या सर्व प्रतिकृती लंडन येथे पाठविल्या गेल्या व ‘क्रीस्टल पॅलेस’मध्ये प्रदर्शित करण्यात आल्या. अजिंठयाच्या या प्रतिकृतींचे दुर्दैव असे की, त्याच दरम्यान लागलेल्या आगीत या प्रतिकृती जळून गेल्या परंतु १८८५ मध्ये ग्रिफीथ्स यांनी प्रयत्नपूर्वक प्रसिद्घ केलेले द पेंटिंग्ज इन द बुद्धीस्ट केव्ह टेंपल ऑफ अजंठा चे दोन खंड सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा पुरावा म्हणून आजही उपलब्ध आहेत. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षक व विदयार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक प्रत्यक्ष कृतीत आणलेल्या या प्रकल्पामुळे यूरोपचे कलाजगत भारतीय कलापरंपरेकडे अधिक लक्षपूर्वक व आस्थेने पाहू लागले. याच काळात मुंबईतील तत्कालीन इंग्रज सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या काळात बांधल्या जाणाऱ्या इमारतींवरील वास्तुशोभनाचे (आर्किटेक्चरल डेकोरेशन) काम ग्रिफीथ्स व किपलिंग या दोन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. स्कूलमधील विदयार्थ्यांना दिले. मुंबईत त्या काळात बांधल्या गेलेल्या क्रॉफर्ड मार्केट (महात्मा फुले मंडई), मुंबईचे हायकोर्ट, मुंबई विदयापीठ, व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन (छ. शिवाजी टर्मिनस), गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल अशा अनेक इमारतींवरील वास्तुशिल्पांचे काम या कलाशाळेत शिकणाऱ्या व शिकून तयार झालेल्या एतद्देशीय कलावंतांनी केले.

याच दरम्यान (१८७२) प्राचार्य टेरी यांनी कला महाविदयालयाच्या आवारात मृदापात्र-विभाग सुरू करून किपलिंगच्या मदतीने भट्टी बांधली, तसेच व्यावसायिक तत्त्वावर कलात्मक मृत्पात्रीची (आर्टिस्टिक पॉटरी) निर्मिती करण्यास सुरूवात केली. पुढील काळात या मृत्पात्रीची संकल्पना अजिंठयाच्या चित्रांवर आधारित अशी केली गेली (१८८०). या उपकमाला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळून, त्याची उत्तम विक्री देशात व देशाबाहेर झाली. यांतील काही दर्जेदार मृत्पात्रे ‘साउथ केन्झिंग्टन म्यूझीयम’ने विकत घेतली. तसेच ब्रिटिश सरकारतर्फे जगभरात विविध प्रदर्शनांमध्ये पाठविण्यात आली व ती प्रशंसेस पात्र ठरली. या मृत्पात्री व मृत्तिकाशिल्पे (सिरॅमिक्स) यांचा एक संच इंग्रज सरकारने रशियाच्या झारला भेट म्हणून पाठविला.

विल्किन्स टेरी निवृत्त झाल्यावर १८८० मध्ये ग्रीनवुड हे रेखन-शिक्षक म्हणून लंडनहून आले व ग्रिफीथ्स पाचार्य झाले (कार. १८८०-९५). स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षणकमात नवीन बदल करण्यात येऊन प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी वर्ग सुरू करून त्यांच्या परीक्षा दरवर्षी घेण्यात येऊ लागल्या. हे सर्व लंडन येथील साउथ केन्झिंग्टनमधील अभ्यास-क्रमानुसार होऊ लागले. शेवटच्या दोन परीक्षा ‘ब्लॅकबोर्ड’सहित उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना मुंबई इलाख्यातील सर्व शाळांत चित्रकला-शिक्षक म्हणून मान्यता मिळाली.

देशातील हस्तकला व कारागिरीच्या क्षेत्रांतील उपयोजित कलेच्या दुर्दशेकडे १८८९-९० च्या दरम्यान इंग्रज सरकारचे लक्ष वेधण्यात आले. तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांनी या विषयात लक्ष घातले व परिणामी या कलांचे शिक्षण देण्यासाठी कार्यशाळेची उभारणी रूपये ४५,००० खर्च करून करण्यात आली. या कार्यशाळेत खणी-कपाटनिर्मिती (कॅबिनेट मेकिंग) व काष्ठतक्षण (वुड कार्व्हिंग), गालिचा-विणकाम (कार्पेट वीव्हिंग), आलंकारिक लोहकाम (ऑर्न्मेंटल आयर्न वर्किंग), जडजवाहीर व धातुकाम (ज्वेलरी व मेटल वर्क) या विषयांचे शिक्षण देण्यात येऊ लागले. गव्हर्नर लॉर्ड रे यांनी या विषयात घातलेले लक्ष व ही कार्यशाळा प्रत्यक्षात येण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जाणीव ठेवण्याच्या तत्कालीन मनोवृत्तीतून या कार्यशाळेला ‘लॉर्ड रे आर्ट वर्कशॉप’ असे नाव देण्यात आले. त्यामध्ये शिकविण्यास कसबी कारागीर नेमल्यामुळे या कार्यशाळेतून एकापेक्षा एक सरस धातूच्या वस्तू व गालिचे निर्माण होऊ लागले. १८९५ मध्ये मृत्पात्री-कार्यशाळा (पॉटरी वर्कशॉप) निर्माण होऊन सुंदर मृत्तिकापात्रे तयार होऊ लागली. १९१० मध्ये जे. जे. स्कूलच्या आवारात स्थापन झालेल्या‘सर जॉर्ज क्लार्क स्टुडिओज अँड टेक्निकल लॅबोरेटरी’ विभागामुळे उत्कृष्ट तंत्रज्ञानाची जोड मिळू लागली. त्यातून वस्तू अधिक दर्जेदार तसेच आकार आणि रंगसंगती यांबाबतीत निर्दोष बनू लागल्या. १८९९-१९०० मध्ये पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनात स्कूल ऑफ आर्टने भाग घ्यावा, असे मुंबई सरकारने ठरविले. त्यानुसार चित्रकला (पेंटिंग), नमुनाकृती (मॉडेल) आणि रे आर्ट वर्कशॉपच्या सर्व वर्गांतून तयार झालेले कलाकौशल्याचे नमुने पॅरिसमधील प्रदर्शनासाठी पाठविण्यात आले व त्यांची वाहवा झाली.

शालेय कलाशिक्षणाचे प्रशिक्षण देणारा वर्ग १८८७ मध्ये सुरू करण्यात आला. मुंबई विभागात शालेय पातळीवरील परीक्षांची इंग्लंडमधील ‘सायन्स अँड आर्ट डिपार्टमेंट’च्या धर्तीवर आखणी करण्यात येऊन, त्यासाठी प्रोत्साहन म्हणून शाळांना आर्थिक मदत करण्यात आली. १९१५ साली या परीक्षा बंद होऊन त्याऐवजी एलिमेंटरी (प्राथमिक) व इंटरमीडिअट (माध्यमिक) अशा चित्रकलेच्या दोन परीक्षा शालेय पातळीवर घेण्यात येऊ लागल्या व आजही त्या घेतल्या जातात.

सेसिल बर्न्स हे चित्रकार १८९७ ते १९१८ या काळात प्राचार्य होते. त्यांच्या काळात शिक्षणकमात बदल होऊन मुक्त हस्तआरेखन (फी हँड ड्रॉइंग), यथादर्शन (पर्स्पेक्टिव्ह) आणि भूमिती (जिऑमिट्नी) या विषयांऐवजी निसर्ग आरेखन (नेचर ड्रॉइंग), भौमितिक रचनाबंध (जिऑमिट्रिकल पॅटर्न) व स्मरण आरेखन (मेमरी ड्रॉइंग) या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला. तसेच या काळात जलरंग-माध्यमात दर्जेदार काम करणारे चित्रकार निर्माण झाले. १९०२ मध्ये दिल्लीत भरलेल्या दरबारानिमित्त एक अखिल भारतीय औदयोगिक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या कलावंतांनी एक भारतीय कलादालन तयार केले होते. त्यात मांडण्यासाठी चित्रे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पुतळे, तऱ्हेतऱ्हेच्या धातूंच्या कलाकुसरींच्या वस्तू, लाकडी कोरीव कामाचे फर्निचर, चांदीच्या अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, पितळेची नक्षीदार मेजे, तैलरंग चित्रांचे कोरीव फर्माने (स्टेन्सिल) छापून तयार केलेले पडदे इ. वस्तू ठेवल्या होत्या. या ‘भारतीय कलादालना’तील सर्व कलाकृती विकल्या गेल्या. विदयार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृती पाहून तत्कालीन संस्थानिक अत्यंत प्रभावित झाले. अनेक विदयार्थी-कलावंतांना ते आपल्या संस्थानांत व्यावसायिक कामासाठी पाचारण करू लागले. ही परंपरा पुढेही कायम राहिली. याच दरम्यान ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’चे चित्रकार रोबाथम हे उपप्राचार्य पदावर रूजू झाले. त्यांनी सजीव-चित्रणाचे (लाइफ पेंटिंग) शिक्षण रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधील शिक्षणकमाप्रमाणे देण्यास सुरूवात करून चित्रकलेचा अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ असा चार वर्षांचा आखला (१९०७).

कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांची जे. जे. मधील प्राचार्य-संचालक पदाची कारकीर्द (१९१९-३६) विशेष संस्मरणीय ठरली. त्यांच्या काळात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या व त्यामुळे या कलाशाळेचे नाव भारतभर गाजू लागले. १९२० च्या दरम्यान चौथ्या वर्षाच्या विदयार्थ्यांसाठी सॉलोमन यांनी प्रत्यक्ष नग्न व्यक्तिप्रतिमानावरून (न्यूड मॉडेल) अभ्यास करण्यासाठी ‘न्यूड लाइफ-क्लास’ सुरू केला. त्यामुळे विदयार्थ्यांस शरीरशास्त्राचा प्रत्यक्ष मानवी शरीरावरून अभ्यास करण्याची संधी मिळाली. नग्न व्यक्तिप्रतिमान व त्याच्या अभ्यासामुळे प्राप्त झालेल्या अभ्यासाला दिशा व उत्तेजन देण्यासाठी सॉलोमन यांनी भित्तिचित्र-सजावटीचा (म्यूरल डेकोरेशन) वर्ग सुरू केला (१९२०). त्या वर्गाच्या विदयार्थ्यांकडून त्यांनी कलादेव्या: प्रतिष्ठा हे भित्तिचित्र जे. जे. स्कूलच्या मध्यवर्ती दालनाच्या भिंतीवर ३३’ X २२’ ( सु. १०·०५ मी. X ६·७० मी.) या आकाराचे करून घेतले. त्याचे उद्धाटन गव्हर्नर लॉर्ड लॉइड यांनी केले. गव्हर्नरला ते अत्यंत आवडले व त्यांनी रूपये ५,००० मंजूर करून ‘गव्हर्नमेंट हाउस’मधील कौन्सिल हॉलमध्ये याच विदयार्थ्याकडून एक भित्तिचित्र तयार करून घेतले. याशिवाय त्यांच्या काळात ‘भारतीय शैलीच्या पुनरूज्जीवनाची’ चळवळ सुरू करण्यात येऊन त्याव्दारे विदयार्थ्यांना भारतीय संस्कृती व कलाशैली यांच्याकडे जाणीवपूर्वक पाहण्यास उद्युक्त केले गेले. भारतीय शैलीच्या पुनरूज्जीवनाच्या प्रयत्नांतून ‘बाँबे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ संप्रदायाच्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सर जे. जे. स्कूलच्या विदयार्थ्यांनी चित्रे काढण्यास सुरूवात केली. पाश्चिमात्य शैलीतील मानवकृती, भारतीय शैलीतील लयदार रेषा व जलरंगांचा वैशिष्टयपूर्ण वापर, ही या शैलीची वैशिष्टये होत. परिणामी या संस्थेतून तयार होणारे विदयार्थी पाश्चिमात्य, तसेच भारतीय शैलीतही दर्जेदार काम करण्यात निष्णात होऊ लागले. १९२२ पासून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टतर्फे ‘जी. डी. आर्ट’ ही पदविका प्रदान करण्यात येऊ लागली. दिल्लीच्या सेक्रेटेअरिएटमधील (सचिवमंडळ) प्रतिष्ठेचे काम १९२९ च्या सुमारास या संस्थेस मिळाले. तत्कालीन निवडक विदयार्थी व शिक्षकांनी ते यशस्वी रीत्या पूर्ण केले. यात विविध ललित कलांवरील भित्तिचित्रे व घुमटांत भारतातील आठ वेगवेगळ्या कालखंडांतील भारतीय शैलींच्या प्रतीकात्मक देवतांच्या आकृती रंगविल्या होत्या. या चित्रांच्या संकल्पना स्पष्ट करणारे म्यूरल पेंटिंग्ज ऑफ बाँबे स्कूल हे पुस्तक सॉलोमन यांनी लिहिले. १९२९ मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेस स्वतंत्र कलाविभाग म्हणून मान्यता मिळाली व तिचे प्रमुख प्राचार्यच (प्रिन्सिपॉल) संचालक (डायरेक्टर) या पदाचे मानकरी ठरले परंतु १९३२ साली ‘टॉमस कमिटी’ अहवालाच्या आधारे ‘स्कूल ऑफ आर्ट’ बंद करावे, असा ठराव झाला तथापि समाजाच्या सर्व थरांतून या ठरावाला विरोध होऊन अखेर तो रद्द करावा लागला. मात्र १८७२ पासून सुरू असलेला व प्रसिद्धीस आलेला मृत्पात्री विभाग मुंबई कायदे मंडळामध्ये ठराव होऊन १९२८ साली बंद करण्यात आला.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत १९२४ मध्ये प्रो. बॅटले यांच्या काळात वास्तुकलेचा (आर्किटेक्चर) तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला व १९३५ मध्ये उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर) चार्ल्स जेरार्ड यांच्या काळात ‘उपयोजित कला विभागा’चा वर्ग सुरू झाला.

कॅप्टन सॉलोमननंतर चार्ल्स जेरार्ड (कार. १९३७-४६) संचालक झाले. पाश्चिमात्य जगातील आधुनिक कलाचळवळींची व कलाप्रवाहांची ओळख त्यांनी येथे जाणीवपूर्वक करून दिली. त्यामुळे येथील कला विदयार्थ्यांना एक नवीन दृष्टी लाभली व यानंतरचा काळ हा कलाशिक्षण-प्रांतातील प्रयोगशील कालखंड ठरला. परिणामी वास्तववादी शैलीत चित्र-शिल्प करण्याच्या परंपरेसोबतच चित्र-शिल्प या दृक् माध्यमांकडे अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून पाहिले जाऊ लागले. कलाशिक्षण घेताना कौशल्य हे मिळवावेच लागते पण कौशल्य म्हणजे कला नव्हे, ही जाणीव विकसित झाली. यातूनच पुढील काळात कलाप्रांतात विविध प्रयोग होऊ लागले व चित्र-शिल्पकारांच्या गटाने एकत्र येऊन ‘ग्रूप’ स्थापन करून आपली अभिव्यक्ती व त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची परंपरा सुरू झाली. पुढील काळात झालेल्या अनेक प्रयोगांची व आधुनिक स्थित्यंतरांची पार्श्वभूमीच या काळात तयार झाली, असे म्हणता येईल.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षणपद्धतीत १९४० मध्ये हस्तमुद्रणकलेचा प्रवेश झाला. इटलीमध्ये शिकून आलेल्या यज्ञेश्वर (वाय्. के.) शुक्ल यांच्यामुळे प्रथम हस्तमुद्रणकलेचा सायंवर्ग सुरू झाला. त्यात अम्लकोरण (एचिंग) व जलच्छटा (ॲक्वाटिंट) ही दोन तंत्रे शिकविली जात. यात प्रथम तयार झालेले विदयार्थी म्हणजे रसिकलाल पारीख व वसंत परब. पुढील काळात यात लिनोकट, काष्ठ ठसा (वुडकट), काष्ठकोरीवकाम (वुडएन्गेव्हिंग), सेरीगाफ (रेशमी जाळीमुद्रणाच्या साहाय्याने निर्मिलेला मुद्रित आकृतिबंध), शिलामुद्रण (लिथोगाफी), उत्कीर्ण मुद्रण (इंटॅग्लिओ) इ. तंत्रांच्या अध्यापनाची भर घातली. त्यामुळे हा विभाग समृद्ध झाला असून सध्या तेथे पदव्युत्तर परीक्षेपर्यंत शिक्षण दिले जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात व्ही. एस्. अडुरकर हे पहिले भारतीय कला-संचालक सर जे. जे. स्कूलच्या प्रमुख पदी आले (१९४७-५०). त्यांनी देशात व परदेशांत कला व कारागिरीशी निगडित शिक्षण घेतले होते. स्वतंत्र भारतात प्रयोगशील कलानिर्मितीसोबतच कलेच्या इतर क्षेत्रांतील कौशल्यावर अधिष्ठित असलेल्या कलेच्या गरजेचे महत्त्व ते जाणून होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ज. द. गोंधळेकर हे बहुश्रूत व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार जे. जे.चे अधिष्ठाता (डीन, १९५३-५९) झाले. उत्तम चित्रकार, कलेतिहास व सौंदर्यशास्त्र यांचे अभ्यासक असणाऱ्या गोंधळेकरांच्या काळात, संस्थेत कलाविषयक अनेक उपक्रम राबविले गेले. पूर्वीच्या शिकविण्याच्या पद्धतीत त्यांनी प्रयत्नपूर्वक काही बदल घडवून आणले. चित्रकार ज. द. गोंधळेकर हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता असताना त्यांच्या कारकीर्दीत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची शताब्दी १९५७ मध्ये साजरी झाली. याचवेळी स्टोरी ऑफ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा इतिहास कथन करणारे अभ्यासपूर्ण पुस्तक जे. जे.चे माजी विदयार्थी व चित्रकार नी. म. केळकर यांनी लिहिले. यातून जे. जे. स्कूलची शंभर वर्षांची वाटचाल दिसून येते.

वास्तुकला व उपयोजित कला हे विभाग सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या मातृसंस्थेपासून विलग होऊन स्वतंत्र झाले (१९५८). या संस्था पुढे विकसित होऊन महाविदयालयाच्या दर्जाला पोहोचल्या आणि ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’, ‘सर जे. जे. इन्स्टिटयूट ऑफ ॲप्लाइड आर्ट’ व ‘सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ या तीन स्वतंत्र संस्था महाविदयालयांच्या स्वरूपात आजतागायत कार्यरत राहिल्या आहेत. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरच्या काळात इतर सर्व विषयांसोबतच कलेच्या विकासासंबंधीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दृक्कलेच्या विकासासाठी महाराष्ट्राचे कलासंचालनालय राज्यशासनातर्फे स्थापन करण्यात आले (१९६५). यानंतरच्या काळात महाराष्ट्र शासनाचे कलाविषयक निर्णय हे कलासंचालकांमार्फत घेण्यात येऊ लागले व सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता हे केवळ संस्थाप्रमुख म्हणून कार्य करू लागले. तेव्हापासून ते आजपर्यंत अनेकांनी संस्थाप्रमुखपदाची जबाबदारी प्रभारी अधिष्ठाता किंवा कायमस्वरूपी अधिष्ठाता म्हणून सांभाळली. त्यांतील प्रल्हाद अनंत धोंड (कार. १९५९-६८), एस्. बी. पळशीकर (कार. १९६८-७५) यांची कारकीर्द संस्मरणीय व उल्लेखनीय ठरली. कलाशिक्षणाचा पुनर्विचार करण्यासाठी कलासंचालनालयातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली (१९६५). त्यात कलाशिक्षणतज्ञ व्ही. आर्. आंबेरकर, चित्रकार ⇨ माधव सातवळेकर (१९१५-२००६), वि. ना. आडारकर व प्र. अ. धोंड यांचा समावेश होता. या समितीच्या शिफारशींनुसार तत्कालीन परिस्थितीला अनुरूप असा नवा मूलभूत कलाशिक्षणविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात आला व कलासंचालक माधव सातवळेकर यांच्या कारकीर्दीत (कार. १९६९-७५) महाराष्ट्रभर राबविण्यात आला. त्यानुसार सौंदर्यशास्त्र व कलेतिहास हे नवीन विषय चित्रकलेच्या इतर विषयांसोबतच नव्या अभ्यासकमात अंतर्भूत झाले.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व सर जे. जे. इन्स्टिटयूट ऑफ ॲप्लाइड आर्ट या दोन्ही संस्था मुंबई विदयापीठाशी संलग्न होऊन (१९८१) चित्र-शिल्प व उपयोजित कला या विषयांमध्ये ‘जी.डी. आर्ट’ या पदविकेऐवजी ‘बी. एफ्. ए’ ही पदवी विदयार्थ्यांना मिळू लागली. लवकरच ललित कला (फाइन आर्ट) या विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय होऊन सध्या चित्रकला, व्यक्तिचित्रण, भित्तिचित्रण व मुद्रानिर्मिती (प्रिंट मेकिंग)या विषयांतील‘एम्.एफ्.ए’ या पदवीपर्यंतचे शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत दिले जाते. १९८२ मध्ये या कलाशिक्षणसंस्थेस १२५ वर्षे पूर्ण झाली व त्यानिमित्ताने या संस्थेच्या संग्रहातील ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाच्या व मौल्यवान अशा चित्रशिल्पसंग्रहाचे प्रदर्शन संस्थेच्याच इमारतीत भरविण्यात आले होते. दि. २ मार्च २००७ रोजी या संस्थेस १५० वर्षे पूर्ण झाली व दि. १ मार्च ते १२ मार्च २००८ या काळात संस्थेच्या १५० वर्षांच्या वाटचालीतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भरविले गेले.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची शिक्षकपरंपरा : कोणत्याही शिक्षणसंस्थेला देण्यात येणाऱ्या शिक्षणाच्या दर्जामुळेच ख्याती प्राप्त होत असते. अनेक ज्ञात व अज्ञात शिक्षकांचे कष्ट, परिश्रम, त्याग व समर्पण यांमुळेच संस्थेला असा गौरव प्राप्त होतो. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसारख्या कलासंस्थेत तर शिक्षणासोबतच तेथील शिक्षकांचे कला-क्षेत्रातील योगदानही विदयार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आले आहे. या दृष्टिकोनातून पाहता या संस्थेची शिक्षकपरंपरा गौरवशाली असून यांतील काहींनी कलाशिक्षक व कलावंत म्हणूनही ख्याती मिळविल्याचे दिसून येते. १८५७ ते १९४६ या काळातील या संस्थेचे पमुख प्रामुख्याने इंग्रज असले, तरी संस्थेत शिकविणारे शिक्षक एतद्देशीयच होते. सुरूवातीच्या काळात गणपतराव केदारी, नारायणराव मंत्री, सोकरजी बापूजी, बापूजी दीनानाथजी अशा अनेकांनी तत्कालीन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या हाताखाली शिकलेले ए. एक्स. त्रिंदाद, एम्. व्ही. धुरंधर, एस्. पी. आगासकर, एल्. एन्. तासकर, जी. एच्. नगरकर, फर्नांडीस, अहिवासी, ए. ए. भोंसुले, के. बी. चुडेकर, आर्. डी. धोपेश्वरकर अशा अनेकांनी या संस्थेत कलाशिक्षणाचे काम करीत असतानाच स्वत:ही दर्जेदार कलानिर्मिती करून कलावंत म्हणून ख्याती मिळविली. स्वातंत्र्योत्तर काळात एस्. बी. पळशीकर, ⇨ बाबूराव सडवेलकर (१९२८-२०००), संभाजी कदम, एन्. बी. साबण्णवार, वि. मो. सोलापूरकर, नारायण सोनावडेकर अशा कलाशिक्षकांनी आपले योगदान दिले. पुढील काळात एम्. जी. जोशी, प्रभाकर कोलते, काशिनाथ साळवे, सुहास बहुळकर अशांनी ही परंपरा पुढे चालविली. आजही ही परंपरा कायम आहे.

जे. जे. ची कलापरंपरा : पूर्वीच्या भारतीय कलाशिक्षण पद्धतीपेक्षा वेगळ्याच स्वरूपाचे कलाशिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टसारख्या इंगजांनी स्थापन केलेल्या कलाशाळांतून देण्यास सुरूवात झाली. भारतातील कलेचे स्वरूप त्यामुळे बदलून गेले. भारतीय परंपरेतील चित्रशिल्प साकार करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा, छाया-प्रकाशाचा वापर करीत व मानवी नजरेला जसे दिसते, तसा अनुभव देणारी ही कलानिर्मिती वेगळ्याच प्रकारची होती. वास्तववादी शैलीतील या कलाशिक्षणात मानवाकृतीच्या अभ्यासातून ‘व्यक्तिचित्र व व्यक्तिशिल्प’ हा विषय विकसित झाला तर वस्तूंच्या अभ्यासातून स्थिरवस्तुचित्रण (स्टिल लाइफ) व निसर्गाच्या अभ्यासातून निसर्गचित्र हे विषय वितकसि झाले. व्यक्तिचित्र, निसर्गचित्र व स्थिरवस्तुचित्र यांच्या संगमातून, तसेच एखादया प्रसंगाचा किंवा घटनेचा आधार घेऊन प्रसंगचित्रे तयार होऊ लागली. ही प्रसंगचित्रे धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा अनेक प्रकारची होती. काही विदयार्थ्यांनी व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण व प्रसंगचित्रण या तीनही प्रकारांत प्रावीण्य मिळविले तर काहींनी केवळ निसर्गचित्रण किंवा व्यक्तिचित्रण या प्रकारांचाच पुढील काळात कलावंत म्हणून व्यासंग व व्यवसाय केल्याचे आढळून येते. परंतु निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण व प्रसंगचित्रण यांतून रचनाचित्र (काँपोझिशन) हा प्रकार विकसित होऊन, या संदर्भात चित्र-शिल्पकलेच्या क्षेत्रांत विविध प्रयोग सातत्याल कामाने होत राहिले. या सर्वांची बीजे भविष्यात कलावंत म्हणून गाजलेल्या सुप्रसिद्घ चित्र-शिल्पकारांच्या विदयार्थिदशेतीत आढळून येतात.

व्यक्तिचित्रण व प्रसंगचित्रण : वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रण हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सुरूवातीपासूनचे वैशिष्टय होते. पेस्तनजी बोमनजी व रूस्तुम सिओदिया हे विदयार्थी सुरूवातीच्या काळात नावारूपास आले. नंतरच्या १८८५ ते १९०० या कालखंडांत जे. जे.त शिकलेल्या आबालाल रहिमान यांना छ. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ⇨ श्रीपाद दामोदर सातवळेकरांना श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानात व रामकृष्ण वामन देऊस्कर यांना निजामाने हैदराबाद संस्थानात राजचित्रकार म्हणून आमंत्रित केले. पूर्वी यूरोपमधील व इंग्लंडमधील चित्रकारांना पाचारण करून व्यक्तिचित्रे व प्रसंगचित्रे काढून घेतली जात. आता हेच काम प्रामुख्याने जे. जे. स्कूलमध्ये शिकून निष्णात झालेले चित्रकार करू लागले. एम्. एफ्. पीठावाला, एम्. व्ही. धुरंधर, ए. एक्स. त्रिंदाद, ए. एम्. माळी, ए. ए. भोंसुले, सा. ल. हळदणकर, एम्. आर्. आचरेकर, गोपाळ देऊस्कर, व्ही. ए. माळी, माधव सातवळेकर अशा जे. जे.च्या अनेक माजी विदयार्थ्यांनी ही परंपरा कायम ठेवली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र कौशल्यपूर्ण वास्तवादी व्यक्तिचित्रण व प्रसंगचित्रण यांपेक्षा कलाभिव्यक्तीच्या शक्यता शोधण्याचे एक माध्यम म्हणून शोध घेण्याचा प्रयत्न व्यावसायिक व्यक्तिचित्रणासोबतच झालेला आढळतो. एस्. बी. पळशीकर, बाबूराव सडवेलकर, संभाजी कदम, पद्मशाली, मृगांक जोशी इ. कलावंत त्यांच्या प्रयोगशील निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. ही परंपरा जोपासून सुहास बहुळकर, वासुदेव कामत, अनिल नाईक असे अनेकजण हा वारसा पुढे चालवीत आहेत [→व्यक्तिचित्रण].

निसर्गचित्रण : निसर्गचित्रणाच्या क्षेत्रात अत्यंत दर्जेदार काम सुरूवातीच्या काळात केले, ते कोल्हापूरच्या आबालाल रहिमान यांनी. त्यानंतरच्या काळात सा. ल. हळदणकर, एम्. आर्. परांडेकर, एल. एन्. तासकर, जी. एम्. सोलेगावकर, एम्. एस्. जोशी, एस्. एच्. रझा अशा अनेकांनी दर्जेदार निसर्गचित्रणपरंपरा निर्माण केली असून, आजही ती चालू असल्याचे आढळून येते [→निसर्गचित्रण].

भारतीयत्वाचा शोध व प्रयोगशील कालखंड : वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, प्रसंगचित्रे या क्षेत्रांत जे. जे. स्कूलच्या विदयार्थ्यांनी चांगल्या दर्जाचे प्रावीण्य मिळविले. त्यानंतर मात्र ‘स्व’ त्वाचा शोध घेण्याच्या प्रेरणेतून, तर काही वेळा भारताचा स्वातंत्र्यलढा व भारतीयत्वाचा शोध घेण्याच्या प्रेरणेतून १९२० ते १९३६ या काळात जे. जे. ते बाँम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल, नावाची कलाचळवळ अस्तित्वात आली. पाश्चिमात्य शैलीतील मानवाकृती, भारतीय शैलीतील लयदार रेषा व जलरंग माध्यमाचा वैशिष्टयपूर्ण वापर, ही या कलाशैलीची वैशिष्टये होती. आर. जी. चिमुलकर, व्ही. एस्. गुर्जर, जांभळीकर, ज. द. गोंधळेकर अशा अनेकांनी या शैलीत दर्जेदार चित्रे निर्माण करून तत्कालीन अखिल भारतीय प्रदर्शनांमधून पारितोषिक व नावलौकिक मिळविला. त्यानंतरच्या काळात असहकारितेच्या चळवळीपासून स्फूर्ती घेऊन अहिवासी, रतु शाह, यज्ञेश्वर, शुक्ल, वजूभाई भगत अशा अनेकांनी आपल्या निर्मितीने भारतीयत्वाची ही परंपरा जागृत ठेवली. स्वातंत्र्योत्तर काळात प्रबोधनकाळापासून यूरोपात होत आलेली स्थित्यंतरे, तसेच आधुनिक काळातील विविध कलाचळवळी व कलाप्रवाह यांबद्दल जागरूकपणे विचार सुरू झाला. ‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ या विषयांवर वादविवादही झाले. अपरिहार्यपणे त्याचे प्रतिबिंब जे. ज??



थोर संत रविदास महाराज

संत शिरोमणी गुरु रविदास यांचा जन्म 15 फे ब्रू वारी 1398 मध्ये झाला . त्यांनी तर्या काळात कठीण सामाजिक संघऱ्ष केला त्यांच्या विचारा नुसार क्षत्रीय ब्राम्हण वैश्य शूद्र मौलवी शेख हिंदू मुसलमान ती सर्व माणसे सारखीच आहेत . त्या सर्वांचा निर्माता एकच आहे. सगळे हाडे मास चमड्या पासून तयार झालेली आहेत . कोणी कोणाला उच्च निच समजू नये . सगळे एकच आहेत . राम राहीम एकच आहेत . राम मंदीरात नाही रहीम मशीदीत नाही . म्हणून तुम्ही विनाकारण भांडू नका . आपण मंदीर किवा मशीदीत नतमस्तक होण्याची गरज नाही . परमेश्वर सर्व व्यापी आहे . तुम्ही त्याला शोध ण्या साठी द्वारका ,मथुरा काशी ,हरिद्वारला जायची गरज नाही . तो माझ्या शरीरात आत्माराम स्वरूपात आहे . पोथी पूराण यांच्या मागे लागू नका . त्यांच्या विचारांमुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली . अनेक लोक त्यांचे शिष्य बनले . त्यात चि तोंड गडाची राणी मीराबाई ,पिपाजी महाराज ,संपणा वीर,दिल्लीचा सुलतान सिकंदर शाह लोंधू कबीर ,गुरु नांनक त्यांच्या समकालीन .गुरु रविदासांचे 18 साकी ,101 पदे (डोहे)उपलबद्ध आहे. गुरु ग्रंथासाहेब मध्ये रविदासांची 40 पदे आहेत . गुरु रविदासांचा मृत्यू 10 ऑक्टोबर 1518 मध्ये झाला . संत मीराबाईनी त्यांच्या पडचिन्हावर मंदीर बांधले .



दिवाकर नाट्यछटा

शंकर काशिनाथ गर्गे
शंकर काशिनाथ गर्गे यांचा जन्म 18 जानेवारी 1889 रोजी झाला.रसिक स्व भाव भीडस्त पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक इंग्रजीवर प्रभुत्व होते.त्यामध्ये प्रा.वासुदेव राव पटवर्धन यांची मैत्री लाभली.ब्राऊनिंग मोनोलोग चे वाचन करत.आपले अनुभव,तत्वज्ञान.सुखदु:ख,आशानिराशा,संताप,उद्वेग,तिरस्कार इ.मनोविकार व्यक्त करणारा वाड़:म य प्रकार गवसला.भीडस्त वृती दिवाकराना फार आवडले.अंत प्रेरणेने 18.9.1911 रोजी महासर्प नावाचा मोनो लॉ ग लिहिला प्रा.पतवर्धनानी त्याला.नाटय छटा हे नामाभिधा न दिले.लवकरच केसरी व करमणूक मधून नाटय छटा प्रसिद्ध झाल्या.शालेय पाठ्य पुस्तकात त्यांच्या नाटय छ्टा घेतल्या आहेत.1 ऑक्टोबर 1931 रोजी त्यांचे निर्वाण झाले.



गणेश प्रतिष्ठापना

गणेश प्रतिष्ठापंना

गणेश चतुर्थी ला सर्वजण गणपती प्रति ष्ठा पना करतात.
असंख्य लोक गणपती बसवतात परंतू शास्र शुद्ध पद्धतीने प्राण प्रतिष्ठा पना होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र दिड,पाच,सात,अकरा दिवसांचा गणपती बसवतात.चौका चौकात सुद्धा गणपतीची प्राण प्रति ष्ठा पना करताना दिसतात.ही प्राण प्रति ष्ठा पना दुपार पर्यंत केलेली चांगली.गण पती
गणपती ची मुर्ती मातीची असते म्हणून तिला पार्थिव गणेश म्हणतात.त्याला पार्थिव गणपती पूजन व्रत म्हणतात.
अगोदर सुचिर्भू त हो ऊन धोतर नेसून खंद्यावर उपरणे घ्यावे.प्रथम कपाळावर गन्ध लावावा.देवासमोर विडा ठेवावा.नमस्कार करावा.घरातील आई वड़ीलाना नमस्कार करावा.सधेच्या पळिने तीन वेळा आचमन करावे.चौथ्या वेळी पाणी ताम्हनात सोडावे.प्रा णायाम व गायत्री मंत्र म्हणून सूपारीवर गन्ध फुले वहावे.
वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्ये षु सर्वदा
गणपती प्राण प्रतिष्ठा अशी सन्कल्पना करावी.
शुभंकरोती कल्याणं आरोग्यम धनसम्पदा
शत्रु बुद्धी विणाशाय दीपज्योती नमोस्तु ते
या मंत्राने सम ईची पूजा करावी.
आगमार्थ टू देवाना गमनार्थ तू र क्षसा म
ओम्ं गनपतयें नम: मंत्र म्हणावा
नवीन मुर्तीच्या डोळ्या ना तुप दुर्वानी लावावे.
मुर्तीच्या छातीवर उजव्या हाता च्या बोटानी प्राण ओतले जावेत अशी प्रार्थना करावी.15 वेळा ओन्काराचा जप करावा.श्री मंगल मूर्तीची सर्व कर्मे न्द्रिय,ज्ञानेंद्रिय जिवंत,सक्रिय व्हावीत ,त्यांचे कान,जीभ,नासिका,हात, वगैरे सर्व अवयव सक्रिय व्हावेत.अशी प्रार्थना करणे त्यांची वाणी,मन,त्वचा,नेत्र,वगैरे सर्व अचेतन क्रियाशील व्हावेत अशी प्रार्थना करणे.म्हणजे प्राण प्र ति ष्ठा होते पुन्हा गणेश मुर्तिवर गन्ध .अक्षदा ,फुले,वाहून,गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखऊन विडा नारळ यावर पाणी सोडून ते अर्पण केले.म्हणजे प्राण प्रति ष्ठा पना झाली.



गणेशाची प्रतिष्ठापना

गणेश प्रतिष्ठापंना

गणेश च्तुर्थिला सर्वजण गणपती प्रति ष्ठा पना करतात.
असंख्य लोक गणपती बसवतात परंतू शास्र शुद्ध पद्धतीने प्राण प्रतिष्ठा पना होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र दिड,पाच,सात,अकरा दिवसांचा गणपती बसवतात.चौका चौकात सुद्धा गणपतीची प्राण प्रति ष्ठा पना करताना दिसतात.ही प्राण प्रति ष्ठा पना दुपार पर्यंत केलेली चांगली.गण पती
गणपती ची मुर्ती मातीची असते म्हणून तिला पार्थिव गणेश म्हणतात.त्याला पार्थिव गणपती पूजन व्रत म्हणतात.
अगोदर सुचिर्भू त हो ऊन धोतर नेसून खंद्यावर उपरणे घ्यावे.प्रथम कपाळावर गन्ध लावावा.देवासमोर विडा ठेवावा.नमस्कार करावा.घरातील आई वड़ीलाना नमस्कार करावा.सधेच्या पळिने तीन वेळा आचमन करावे.चौथ्या वेळी पाणी ताम्हनात सोडावे.प्रा णायाम व गायत्री मंत्र म्हणून सूपारीवर गन्ध फुले वहावे.
वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्ये षु सर्वदा
गणपती प्राण प्रतिष्ठा अशी सन्कल्पना करावी.
शुभंकरोती कल्याणं आरोग्यम धनसम्पदा
शत्रु बुद्धी विणाशाय दीपज्योती नमोस्तु ते
या मंत्राने सम ईची पूजा करावी.
आगमार्थ टू देवाना गमनार्थ तू र क्षसा म
ओम्ं गनपतयें नम: मंत्र म्हणावा
नवीन मुर्तीच्या डोळ्या ना तुप दुर्वानी लावावे.
मुर्तीच्या छातीवर उजव्या हाता च्या बोटानी प्राण ओतले जावेत अशी प्रार्थना करावी.15 वेळा ओन्काराचा जप करावा.श्री मंगल मूर्तीची सर्व कर्मे न्द्रिय,ज्ञानेंद्रिय जिवंत,सक्रिय व्हावीत ,त्यांचे कान,जीभ,नासिका,हात, वगैरे सर्व अवयव सक्रिय व्हावेत.अशी प्रार्थना करणे त्यांची वाणी,मन,त्वचा,नेत्र,वगैरे सर्व अचेतन क्रियाशील व्हावेत अशी प्रार्थना करणे.म्हणजे प्राण प्र ति ष्ठा होते पुन्हा गणेश मुर्तिवर गन्ध .अक्षदा ,फुले,वाहून,गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखऊन विडा नारळ यावर पाणी सोडून ते अर्पण केले.म्हणजे प्राण प्रति ष्ठा पना झाली.



गणेशाची उपासना कशी करावी

गणेश उपासना

उपासना हा शब्द उप +आस=बसणे,प्रवेश करणे आपल्या इष्ट देवतेच्या सान्निध्यात जावे असा भावार्थ आहे.पूराणात भक्तीचा उपासनेचा प्राण मानलेले आहे.गणेशाची उपासना करणे म्हणजे त्याच्या जवळ जाणे किंवा त्याला जाणून घेणे.उपासना करताना गणेश पूराण वाचावे.उपासने मुले मन शुद्ध होते.आपणास अनिती,आळस ,अज्ञान ,अंध श्रद्धा ,आसक्ती,यापासून,दूर ठेवण्यासाठी उपासना फार मदत करते.निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करणे शक्य हॉट नाही म्हणून साकार गणेशाची पूजा करणे सोपे जाते.गणेश पुरान्त अनेक व्रते आहेत.1)वरद चतुर्थी व्रत -
श्रावण शुक्ल चतुर्थीस या व्रताचा प्रारंभ
2)दूर्वा गणपती व्रत _
विनायकी चतुर्थी रविवारी येईल त्या चतुर्थीस आरंभ पुढे सहा महिने हे व्रत करतात
3)21 दिवसाचे गणपती व्रत-
श्रावण शुक्ल चतुर्थी ते व्रत श्रावण कृष्ण दश मी पर्यंत हे व्रत करतात.
4)कपर्दी विनायक व्रत-
कवडी दान देत श्रावण शुक्ल चतुर्थी पासून हे व्रत करतात.
5)पार्थिव गणेश पूजा व्रत-
श्रावण शुक्ल चतुर्थी पासून भाद्रपद शुक्ल चतुर्थी पर्यंत हे व्रत करतात.
6)गणेश चतुर्थी व्रत-
प्रत्येक महिन्यात शुक्ल चतुर्थिला हे व्रत करतात.
7)वट गणेश व्रत -कार्तिक शुक्ल चतुर्थी पासून माघ शुक्ल चतुर्थी पर्यंत वडा च्या झाडाखाली हे व्रत करतात.
8)तिळी चतुर्थी व्रत-
माघ शुक्ल चतुर्थीस व्रत व उपवाद करु न पांढर्या तिलान्च्या 21 लाड वान्चा प्रसाद अर्पण करु न हे व्रत करतात.
9)संकष्ट चतुर्थी व्रत-माघ कृष्ण चतुर्थीस हे व्रत करतात.
10)अंगारकी चतुर्थी व्रत-
मंगळवारच्या सं कष्टी चतुर्थीस हे व्रत करतात.
11)21 चतुर्थी व्रत-
माघ किंवा श्रावण कृष्ण चतुर्थीस जर मंगळवार आला तर त्या दिवसापासून821 चतुर्थी हे व्रत करतात.
गणेश हा 14 विद्या ,64 कला न्चा अधिपती आहे.तो रंगभूमीवरील नटे श्वरही आहे.तो रणा न्गणात लढणारा आहे.तो गनाधिपती आहे.गणेश हा राजकारणपटू आहे.तो विघ्न हर्ता आहे.तो सुख कर्ता आहे.तो आबालवृद्ध स्री-पुरुषानां प्रिय आहे.तो भक्तांचा स्वामी आहे.म्हणून त्याची.उपासना करण्यास सांगण्यात आले आहे.श्री गणेशाने अनेक दुष्ट राक्षसान्चा नाश केला.आपल्यालाही.आपल्यातील.आज्ञान ,आळस, अंध श्रद्धा ,अविचार,आनीती इत्यादी राक्षसी वृतीचा नाश करायचा आहे.म्हणून पूराणातल्या गनेशाविष यी
अधिक ज्ञान प्राप्त करून घेऊन उपासना करायची आहे.पुढच्या पिढीला सन्मार्गाने वाटचाल करण्या सा ठी हे एक प्रेरणास्थान आहे.सात्विक वृत्ती ने उपासना करणे ही काळाची गरज आहे.



Mudgal puraan मद्गल पुराण

मुद्गल पुराण........
मद्गल पुराण हे गणेशपुराणाच्या नंतर रचले गेले आहे.श्री मद्गल पुराणातही गणेशाच्या उपासने बद्दल माहिती व गणेश पुराणातील कथा सारांश रुपाने सांगितल्या आहेत.तसेच अन्य पुराणातील गणेश विषायाक आख्याने यात आहेत.मद्गल पुराणातील नऊ खंड असुन अध्याय संख्या427 आहे.मद्गल ऋषि हा पुराणाचा वक्ता आहे.दक्ष हा श्रोता आहे.मद्गल पुराणाचा ऊद्देश गणेश पुराणा पेक्षा भिन्न आहे.गणेश कथा सांगणे हा गणेश पुराणाचा ऊद्देश आहे.गनेशतत्वाचे अध्यात्मिक स्पष्टीकरण हा मद्गल पुराणाचा ऊद्देश आहे.यात गणेश तत्वाची परब्रम्ह स्वरुपात सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.वक्र तुंड ,एकदंत,महोदय,गजानन,लम्बोदर,विकट,विघ्न्र राज,धुम्रवर्ण ,इत्यादी गणेशाचे अवतार या ग्रंथामध्ये
वर्णन केलेले आहे.या अवताराच्या कथा गणेश पुराणातील कथे पेक्षा वेगळ्या आहेत.या कथा म्हणजे काम,क्रोध ,लोभ,मोह,मद,आणि मत्सर या षड़ रिपूवरची रुपके,आहेत.संत ज्ञानेश्वरानी गणेशाचे रुप वर्णन करताना अष्टादश पुराणे तीची मनि भूषणे असे म्हणून पुरानान्चा गौरव केला आहे.



आठरा पुराणे

18 पुराणे
पुराणामुळे वेदां माधील तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या पर्यंत पोहोचले.पुराणे हा भारतीय साहित्यातील एक महत्वाचे साधन आहे.श्रुती स्मृती यांच्या नंतर पुराणा न्चा उल्लेख होतो.एक साधारण:पंथा: साक्षात कैवल्य सिद्धद:म्हणजे पुराणे हा सर्वाना मार्ग आहे.असे पद्म पुराणात म्हटले आहे.भारतीय संस्कृतिचा सामान्य जनतेत प्रचार करण्याचे काम पुराणा न्चे आहे सदाचार श्रद्धा नीती इत्यादी शिकवण पुराणा ंनी दिली.पुराणा मुळे धार्मिकता आहे.भक्तिमार्ग पुराणा न्नी जागरुक केला.सर्व सामान्य पणे पुराणे 18 आहेत.त्यामध्ये ब्रम्ह,पद्म,विष्णू,शिव,देविभागवत,नारदीय,मार्कडेय,अग्नी,भविष्य,ब्रम्ह्वैवर्त,लिंग,वाराह,स्क्ंद,वामन,कूर्म,मस्य,गरूड,आणि,ब्रम्हांड,अशी पुराणे आहेत.उपपुराणा ंची संख्या जास्त आहे.ती गाणपत्य महात्म्य वर्णन करणारी आहेत.तुम्ही गणेश पुराण व मद्गल पुराण वाचा.गणेशाची अतिशय सुंदर माहिती त्यात दिली आहे.ती अतिशय मनो रंजक आहे.वैज्ञानिक दृष्ट्या काही गोष्टी पटत नाही.परंतू धार्मिक आहेत.हे ध्यानात घ्यावे.



गणपती

श्री गणेशाची पूजा प्रथम कधी सुरु झाली
या विषयी मतभिन्नता आहे.डॉ.रामकृष्ण भानदरकरान्च्या मताने गणेश पूजा ही पाचव्या ते आठव्या शतकात सुरु झाली असावी.परान्तू काही सन्शोधकान्च्या मते गणपती अथर्वशीर्ष इतके जुने आहे त्या अर्थी गणेश पूजेचा प्रारंभ साडे तीन हजार वर्षापूर्वी वेद काळी ही प्रचलीत असावा.गणपती ही संपूर्ण देवता आहे.अथर्व वेदात गाणपत्य
अथर्व शीर्ष नावाचे एक उपनिषद आहे.गणपतीचे समग्र.स्वरुप त्यात दिलेले आहे.रुग्वेदातील ब्राम्हण स्प ती सुक्त हे गणपतीचे सुक्त आहे.असे संशोध काचे मत आहे.
काही इतर संशोध कान्चे म्हणण्या प्रमाणे गणपती ही मुळची आर्येतर देवता आहे.आर्येतर हात्तिची पूजा करत त्या.पूजेतू न गणेश पूजा विकसित झाली आहे.आर्येतरांची ही ग्रामदेवता पुढे स्विकारली गनाना.त्व गणपति हवामहे या वैदिक मंत्राने तिची पूजा सुरु झाली असावी
भारत हा शेतिप्रा धान देश आहे.भाद्रपद शुक्ल चतुर्थी ला पार्थिव गणेश पूजन करावे असे स्सन्गीतले आहे.पार्थिव मुर्ती म्हणजे मातीची मुर्ती होय भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार हॉट असते.शेतात धान्य निर्माण करनार्या पृथ्वी विषयी5 माती च्या गणेश मूर्तीची पूजा करू न कृतद्ज्ञता व्यक्त केली जात असते4.



स्मरण चित्र

आज इ .6 वी च्या विद्यार्थ्याना स्मरण चित्र हा विषय सांगीतला त्यानी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला.



Vighnhar

Ganesh



श्री संत तुकाराम विद्यालयाच्या शिक्षण संकुलात फटाके मुक्त दिवाळी साजरी

श्री संत तुकाराम विद्यलयाच्या विद्यार्थ्यानी शनिवारी दि 19 .10.2019 रोजी अनोखी दिवाळी साजरी केली. फटाके मुक्त दिवाळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लाडके एस.बी.यानी विद्यार्थ्यासंं फटाके मुक्त दिवाळी विषयी मार्गदर्शन केले श्री.झावरे बी.के.(उपमुख्याध्यापक,)श्री.कळमकर ए.टी.(पर्यवेक्षक), श्री.गायकवाड़ व्ही.बी.श्री.यादव डी.बी.श्री.वाघ एस.पी.श्रीमती दरेकर,श्रीमती.ससाणे,सौ.वाबळे,श्रीमती.इगुळकर,सौ.माहुरे,सौ.नेवासकर सौ.गुंड,सौ.हिरवे,श्री.चव्हाणश्री घुन्ड रे,,सौ.नहारिया,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका,सौ.गायकवाड़ शैलजा,बालवाडीच्या सौ.गायकवाड सुलभा,सौ.जाधव,श्रीमती.भुतकर,श्री.रायकर
यानी मार्गदर्शन केले.मुलानी पणत्या तयार केल्या,व आकाश कंदील तयार केले.व फटाके न वाजवण्याची शपथ घेतली.शिक्षकांनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.



वाचन प्रेरणा दिन श्री संत तुकाराम विद्यालयात साजरा

“ लोहगाव येथील श्री संत तुकाराम विदयालयात ग्रंथ दिंडीने उत्साहात वाचन प्रेरणा दिन संपन्न.”


श्री संत तुकाराम विदयालय लोहगाव येथे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन ग्रंथपुजन,सामुहिक वाचन,ग्रंथदिंडी,घोषवाक्य भित्तीपत्रके, रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा आदि उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.लाडकेएस.बी. उपमुख्याध्यापक श्री.झावरे बी.के., पर्यवेक्षक श्री कळ्मकर,जेष्ठ अध्यापक श्री.गायकवाड व्ही.बी.आदि मान्यवरांचे हस्ते डॉ. अब्दुल कलाम व सरस्वतीचे प्रतिमेंचे पूजन करणेत आले. यावेळी मुख्याध्यापक श्री.लाडके यांनी वाचनाचे महत्व आणि होणारे संस्कार याबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षिका श्रीम.दरेकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांची जीवन गाथा विषद केली. उपमुख्याध्यापक श्री.झावरे बी.के यांनी आभार मानले.
यानंतर विदयालयातुन श्री संत तुकाराम महाराज मंदिरापर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल श्री.जगतापव्ही.एस. उपशिक्षक श्री.वाघ एस.पी.श्री.गायकवाड व्ही.बी.,श्री.यादव,सौ.गुंड एस.ए.सौ.वाबळे,सौ.शिवले,सौ.हिरवे,
श्रीम.दरेकर,सौ.इंगळूणकर,सौ.ससाणे सौ.माहुरेएस.आर सौ.नेवासकर.एस..श्री.सुपेकर,श्री.भिसे आदि सर्व शिक्षक/शिक्षकेतर यांनी केले.



ए पी जे अब्दुल कलाम

डॉ ए पी जे अब्दुल कलाम (जन्म 15.10.1931)
अब्दुल पाकिर जैनुलाबदीन असे त्यांचे नाव दक्षिण भारतातील रमेश्वर या गावी त्यांचा जन्म झाला.बिकट परिस्थितीतील एका नावाड्या च्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.गरिब परिस्थिती ,बिकट पार्श्वभूमी यावर मात करुन अब्दुल कलाम आपले श्रेष्ठ स्थान निर्माण केले.सर्वच समाजाशी त्यांची समान वागणूक ते देत असत.प्राथमिक शिक्षण पुर्ण झाल्यावर आपण हवाई दलात जावे असे त्यांचे स्वप्न होते.भौतिक शास्राची पदवी प्राप्त केल्यावर त्यानी चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नऑ लॉजि मध्ये प्रवेश घेतला.तेथे त्यानी एरोडाय नेमेक्स चा परिचय करुन घेतला.उद्दानाच्या क्षेत्रात जिवन7 व्यतीत करण्याचा निर्धार केला.परंतू हवाई दलात त्याना संधी मिळाली नाही.नंतर टे उत्पादन विभाग व संरक्षण विभागाचे प्रमुख होते.पुढे 1958 मध्ये ते ज्येष्ठ वैज्ञानिक सहाय्यक बनले.संपूर्ण देशांतर्गत.बनावटी चा हेवरक्रेफट चा
आराखडा तयार करून त्यावेळचे संरक्षणमंत्री व्ही के कृष्ण मेन न याना दाखवला.एकावर्षात त्यानी हेवरक्राफ़ट् त्यानीतयार केली.
अमेरिकेतील टिपू सुल्तानच्या युद्धतन्त्रातील अग्नी बाण पाहुन अग्निबाणा च्या संशोधनास प्रारंभ केला.रोहिणी,पृथ्वी नाग अग्नी,अशी विविध पाल्यांची क्षेपनास्रे तयार करून उपग्रहा पर्यंत त्यांची धाव होती.
डॉ सराभाई ,प्रा मेन न डॉ.वसंतराव गोवारीकर,डॉ.राजा रामन्ना डॉ.धवन यांचा आपल्या लेखनात उल्लेख केला आहे.
ते म्हणत मला भाषण करायला जमणार नाही पण ताशी 25000 कि.मी.वेगाने जाणारा अग्नीबाण बनवायला सांगा ते जमेल.त्यानी परमाणू बा म चे नेतृत्व केले.संपुर्ण जग अश्चर्य चकित झाले.तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेई फार खूष झाले.भारत सरकारने त्याना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.पुढे 25 जुलै 2002 मध्ये ते राष्ट्रपती बनले.अशा व्यक्तिमत्वास त्रिवार वंदन .



राम मनोहर लोहिया

राम मनोहर लोहिया
स्मृतिदिन 12 ऑक्टोबर 1967
अतिशय हुशार तीव्र बुद्धिमत्ता त्यांना जन्मत:लाभली होती.त्यांचे शिक्षण कलाकत्ता व मुंबई येथे झाले.त्याना बर्लिन येथे केलेल्या संशोधनात पी एच डी मिळाली.भारतात त्यानी स्वातंत्र्य संग्रामात स्वत:ला झोकून दिले.चांगली नोकरी मिळ वावी घर प्रपंच करावा हे त्यांच्या स्वभावातच नव्हते.आपण देशासाठी ,समाजासाठी काहितरी केले पाहिजे हे धोरण त्यांचे होते समाजातील अस्थिरता त्याना जाणवत होती.आपण जोपर्यंत पारतन्त्र्यात आहे तो पर्यंत हे शक्य नाही.याची जाणीव त्यानां होती.सन 1942 च्या चाले जाव चळवळीचे कार्य त्यानी उत्तम केले.रेडिओ वर भाषणे ते लिहुन देत.भाषेची ठेवण उपरोधिक पणा तर्क कठोरपणे व्यक्त होणे त्यांच्या इतके केवळ इतरांना अशक्यच.गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.राजकारणात ते सक्रिय होते परंतू साहित्य क्षेत्राक डे त्यानी कधीच दुर्लक्ष केले नाही.त्यांचे ललित लेणी हे पुस्तक फार प्रसिद्ध आहे वयाच्य अवघ्या 57 व्या वर्षी ते काळाच्या पडद्या आड गेले.परंतू त्यांचे योगदान हा समाज कधीच विसरु शकत नाही हीच त्याना श्रद्धांजली होय.



दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा

दसरा हा सण आश्विन शुद्ध दशमिला येत असतो.अगदी पहिल्या दिवसापासून नवरात्र सुरु असते.त्यानंतर दहाव्या दिवशी दसरा येतो.महाराष्ट्रात या दिवसाला फार महत्व आहे.दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा अशी फार पुर्वी पासुन म्हण आहे.पराक्रमी पुरुषाला दसरा म्हणजे पर्वणी होय.मराठ्यां चे महत्वाचे अनेक सण आहेत परंतू दसरा म्हणजे वेगळाच.या दिवशी समाजाच्या सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन साजरा करतात.ब्राम्हण सरस्वती पूजन करतात.क्षत्रिय सीमोलंघन व
शस्र पूजा करतात.शेतकरी शेती वैश्य वही पूजन करतात.अश्या रितीने सण साजरा करतात.सुमारे त्रेता युगापासून या सणाची परम्परा आहे.याच दिवशी देवी अदिमाया शक्तीने महिषा सुराचा वध केला आहे.श्री रामचंद्र प्रभुं यानी याच दिवशी रावणावर स्वारी केली अहे.पाच पांडव
अज्ञातवासात असाताना विराताच्या नगरित त्यानी वास्तव्य केले.त्यामध्ये अनेक घटना आहेत.त्यामध्ये त्यानी आपली शस्रास्रे शमिच्या वृक्षावर ठेवली होती अज्ञातवास संपल्यावर त्यानीआपली शस्रे घेताना त्या वृक्षाची पूजा केली.छत्रपती शिवाजी महाराजानी याच दिवशी प्रताप गडावर भवानी मातेच्या उत्सवास प्रारंभ केला.बाजीराव पेशवे शनिवार वाड्यात स्वारिचे नियोजन करीत असत.याच दिवशी सिमो लंघन करण्याची प्रथा दिसून येत आहे.विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा सण होय.पुर्वी वरतंतू नावाचे
ऋषीं होते त्यांचा कौत्स नावाचा विद्यार्थी होता विद्या अभ्यास करण्यासाठी आला होता.विद्या अभ्यास झाल्यावर गुरु दक्षिणा देण्याची वेळ आली.आहे.गुरुनी त्याला एका विद्येवर एक कोटी सुवर्ण मुद्रा दक्षिणा मागितल्या.म्हणजे 14 विद्यावर 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या.कौत्स ही ऐकून रघुराजाकडे गेला.परंतू त्यावेळी विश्वजीत यज्ञ केल्या मुळे खजिना सम्पला होता.तरी सुद्धा राजाने कौत्साकड तीन दिवसाची मुदत मागितली.त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले.इंद्राला राजाचा पराक्रम माहित होता.त्याने कुबेराचा विचार घेतला.इंद्राने आपट्याच्या पानांची आकाराची सोन्याची नाणी बनवून ती नाण्यांचा पाऊस पाडला.कौत्स त्या सोन्याच्या मुद्रा घेऊन गुरुदक्षिणा द्यायला गेला.उरलेल्या सुवर्ण मुद्रा राजाने परत घ्यायला नकार दिला.त्या मुद्रा कौत्साने आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या व लोकाना लुटायला सांगितल्या.त्या दिवसापासून आपट्याची पाने सोन म्हणून लुटतात.साडेतीन मुहुर्तापैकी हा महत्वाचा मुहूर्त आहे
.



शीख धर्मगुरू गोविंदसिंग स्मृतिदिन

शीख धर्मगुरू गोविंदसिंग स्मृतिदिन
७ .१०.१७०८रोजी मृत्यू आला. शिखामध्ये वीर वृत्ती जागृत करून शिखांचे जीवन युद्ध प्रवण करण्यात त्यांनी आपली सारी हयात घालवली .वयात केवळ पाचव्या वर्षी त्यांचे वडील शिखांचे नववे गुरु तेज बहादूर सिंग यांचा औरंगजेब याने जाहीर शिर छेद करून शीख जमातीच्या छळा साठी आपले सामर्थ्य वापरण्यास सुरुवात केली .तेव्हा पासून धर्म हा केवळ शांतते साठी नाही तर मुख्य:रक्षणासाठी आहे हे ओळखून शिखा नी लढाऊ संघटना उभी केली.कधी उघडपणे तर कधी भूमिगत राहून सातत्याने औरंगजेबाशी संघर्ष जारी ठेवला.त्यात त्यांचे चारही पुत्र कामी आले.आपल्या नंतर धर्मगुरूंच्या वादाला कायम मिटावा म्हणून ग्रंथ साहेब हाच गुरु मानावा .पंचाकाफरांचे आणि वीर वृत्ती चे पालन आजन्म करण्यासचा आदेश दिला.पंजाब हा वीर भूमी बनली याचे बीज गुरु गोविंद सिंहाच्या आजन्म लढाऊ समर्पण वृत्ती त आहे.



आदिशक्ती

मानवी जीवनात जगामध्ये प्राचीन काळा पासून आदिशक्ती उपासनेला फार महत्त्व असलेले दिसते समाजातील असलेले स्रीचे महत्त्वाचे स्थान हे याचे मुख्य कारण असावे. भारत व भारताबाहेरही कित्येक उत्खननात आदिमाता,मस्त्रुदेवी, महिमा ता
आदी नावाने प्रसिद्ध आहेत.अशा प्रतिमा बलुचिस्तान, इराण,मेसोपोटेमिया,तुर्कस्तान, बाल्कन राष्ट्रे सिरीयस पेलेस्टा इन ,कित आणि इजिप्त येथे मिळाल्या आहेत.ताम्र पाषण्युगात सिंधूनदीच्या खोर्यामध्ये शकतो उपासनेचे धागे दोरे आढळून येतात. ई.स.पू.2500ते ई.स.पू.तिसऱ्या शतकात मातृदेवता मूर्ती स्वरूपात मिळतात.यामध्ये कडेवर बालक्र असलेल्या मातृदेवता ही आढळतात. डॉ.वाकणकर याना जवरा येथे वैशिष्ट पूर्ण मूर्ती सापडली.(जावरा आय.बी.,-९) अशा अनेक प्रकारात आढळलेल्या मूर्तीत कौशंबी येथे व्याघ्रमुखी देवी आढळली आहे(अलाहाबाद स.स.ब्राँझ न.२३) काही दगडी चकत्यावर
अनेक प्रतिमा आढळलेल्या आहेत.डॉ.वासुदेव शरण अग्रवाल यांनी भारतीय कला या ग्रंथात सुंदर वर्णन केले आहे.काळाच्या दृष्टीने या मौर्य कालापुवीच्या होत्या. ऋग्वेदाच्या खिल सुक्तात श्री देवीचे गायन आहे.(खील.२.६)वरील सूक्तात कमळ, सूर्य चंद्र गरजणारे हत्ती ,समुद्राचा प्रतिनिधी मगर निरनिराळे पशू वगेरे अभिप्राय या चकत्या वर दिसतात.तालवृक्ष , नंदी पदचींन्ह वगेरे चां उपासनेचा जवळचा संबंध आहे.
वैदिक उपासनेत देवापेक्षा देवीचे महत्त्व कमी आहे.देवमाता,अदिती, उषा, पृथ्वी,वाक श्री,आढळतात. आंबिका,उमा,दुर्गा,काळी,ही नावे ऋग्वेदात दिसत नाहीत. तैतरिय अरण्याकात रुद्राची बायको म्हणून सांगते.अग्नीच्या सात जिभांच्या रुपात काळी आणि कराली यांचा उल्लेख करते.भद्रकाली,भवानी,दुर्गा वगेरे देवी नावे तैतरीय आरण्याकात उत्तर वैदिक कालीन ग्रंथात सापडतात.
रामायणात ,गजलक्ष्मी चां उल्लेख आहे.तर महाभारतात शकतो स्तवन आढळते.कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात देवीच्या स्थापनेची चर्चा केले आहे.
अगदी प्राचीन काळापासून शक्तीची उपासना केलेली आहे. समाजाचा जीवन रहाटी चां भाग बनलेला आहे.जुन्या भारतात नाण्यामध्ये लक्ष्मी ची रूपे दिसतात. त्याना श्री लक्ष्मी, गजलक्ष्मी नावाने ओळखतात.(भारतीय मूर्ती शास्त्र,जोशी. )



भरतनाट्यम

शास्त्रीय नृत्य
शास्त्रीय नृत्य म्हणजे असे नृत्य जे विविध तालामध्ये हातापायांच्या आणि शरीराच्या ठराविक ,नियमबद्ध हालचालींनी केले जाते.त्याच बरोबर भाव प्रदर्शनाला शास्त्रीय नृत्य अत्यंत महत्त्व असते .भारतीय संस्कृतीला अनेक शास्त्रीय नृत्यशैली चा वारसा लाभला आहे.त्यामध्ये भौगोलिक व भाषिक दृष्ट्या फरक असला तरी सर्व नृत्यप्रकारांची मूलतत्त्वे सारखी आहेत.
काही महत्त्वाच्या नृत्यात भरतनाट्यम येते .हा नृत्यप्रकार पुर्वी दासि अट्ट म म्हणून ओळखला जायचा भरत नाट्यम् नावात भरत या शब्दाला महत्त्व आहे.या नृत्यात भाव,राग आणि ताल यांचा मेळ घातला आहे.यानृत्याची रचनाच मुळात स्रिया साठी केली आहे असे दिसून येते.सध्याच्या काळात पुरुष सुद्धा यात सहभाग घेताना दिसत आहेत.मुली यानृत्या प्रकारात सादरीकरण करताना वैशिष्टय पूर्ण साडी नेसतात.या नृत्यात डौलदारपणा दिसणे,सौदर्य, आविष्कार म्हणजे अभिनयाला फार महत्त्व आहे.या नाट्यात कर्नाटकी संगीताचा वापर असतो शिवाय मृदंग टाळ हार्मोनियम व्हायोलिन घटंम या वाद्यांचा अधिक वापर असतो.
या नृत्यप्रकार मध्ये रुक्मिणी देवी,बालासरस्वती, पदामा सुबरह्मण्यम्,यामिनी कृष्णमूर्ती , मृणालिनी साराभाई रुक्मिणी विजयकुमार यांनी सुप्रसिद्ध नृत्य प्रकार सादर करून जगात नाव मिळविले आहे.



राष्ट्रीय साक्षरता दिन २०१९

आज रविवार विद्यालयात राष्ट्रीय साक्षरता दिं न साजरा करण्यात आला यामध्ये विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री झावरे बी.के. ज्येष्ठ अध्यापक श्री गायकवाड व्हि बी.सौ महाले सौ शिवले विद्यालयाचे विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी ग्रामपातळीवर प्रभात फेरी काढली गावामध्ये जनजागृती साठी घोषणा देण्यात आल्या श्री संत तुकाराम विद्यालयातून प्रभात फेरी गावामधून फिरून आणण्यात आली.



शालॆय गणेशोत्सव सन 2019

श्री सन्त तुकाराम विद्यालयात सुमारे १९८५ पासून गणॆशाची स्थापना करायला सुरुवात केली त्यावेळी मुख्याध्यापक मालुसरे व्ही एस.होते.ही परम्परा कायम आहे.गणपती विद्यार्थी मिरवणुक करून विद्यालयात बसवत होते.श्री पतंगे एस व्ही श्री मुरकुटे श्री पठाण सर श्री राणे सर श्री गंभीर सर इत्यादी सर्व शिक्षक वर्ग असायचे आता या गणपतीला 35 वर्पा सून हे विद्यार्थी व शिक्षक करीत आहेत.